Friday, November 15, 2013

नवा उच्चांक...आहे मनोहर तरीही...





ही केवळ आकडेवारी नाही. तिच्या आत लपलेले वास्तव आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम करते आहे. ते वास्तव कटू आहे. आपल्या देशात भरपूर संपत्ती असताना, निसर्गाची कृपा आणि १२२ कोटी लोकसंख्येच्या माध्यमातून मुबलक ऊर्जा आणि ग्राहक असताना आपल्या देशाची गाडी सुसाट धावलीच पाहिजे. मात्र आपला संसार परकीयांनी करावा, अशी आपली उरफाटी अपेक्षा आहे.


यूजीन फ़ामा, पीटन हान्सेन आणि रॉबर्ट शिलर या तिघांना अर्थशास्त्रातील २०१३ चे नोबेल पुरस्कार देण्यात आले त्याचे कारण त्यांनी शेअर्सच्या किंमतीविषयी संशोधन केले आणि त्याविषयीचे काही ठोकताळे जगाला सांगितले. कंपन्या चालविण्यासाठी भांडवल लागते आणि ते उभारण्यासाठी शेअरबाजार हा मार्ग जगभर वापरला जातो. त्याची सुरवात युरोप अमेरिकेत झाली असली तरी भारतासह सर्व जगाने तो मार्ग आता स्वीकारला आहे. शेअरबाजारातील तेजी मंदी ही काही त्या देशातील आर्थिक स्थितीचा एकमेव निकष नाही, मात्र त्यावरच त्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, याचे अनुमान काढले जाते, हे नाकारता येत नाही. जगातील जवळपास सर्व श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होण्यासाठी शेअरबाजाराचा आधार घेतात त्याचे कारण जगातील इतका पैसा शेअरबाजारात गुंतला आहे की त्याकडे दुर्लक्ष करून अतिश्रीमंत होता येत नाही. भारतात मात्र शेअरबाजार आजही बहुतांश भारतीयांनी स्वीकारलेला नाही. अर्थात त्यांनी स्वीकारलेला नसला तरी त्यांच्या नावाने जे व्यवहार होत आहेत त्याचे भलेबुरे परिणाम कोणीच टाळू शकत नाही, अशी आजची स्थिती आहे.

आज शेअरबाजाराची चर्चा करण्याचे कारण म्हणजे गेले महिनाभर शेअरबाजारात जे सुरु आहे, त्याकडे कोणीही जागरूक भारतीय दुर्लक्ष करू शकणार नाही. गेल्या काही दिवसात शेअरबाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतीय गुंतवणूकदार त्यात सहभागी नसताना हे सर्व चालले आहे. रुपया का सुधारला तर डॉलरची मागणी कमी झाली म्हणून आणि शेअरबाजार का चढला तर परकीयांनी गुंतवणूक केली म्हणून. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या म्हणजे १२२ कोटी, सातव्या क्रमांकाची जमीन, बहुदा पहिल्या क्रमांकाचा सोन्याचा साठा, जगातील सहाव्या क्रमांकाची अब्जाधीशांची संख्या आणि असे आणखी बरेच काही असताना भारतीय शेअरबाजार मात्र परकीय चालवितात, अशी ही विचित्र परिस्थिती आहे. भांडवलनिर्मितीशिवाय व्यापार उद्योग चालू शकत नाहीत आणि ती निर्मिती परकीय गुंतवणूकदारांनी करावी, अशी आपली अपेक्षा आहे! अर्थात ती करताना परकीय आपल्याकडून दामदुप्पट नफा वसूल करत आहेत, हे विसरता येणार नाही. भारतीय शेअरबाजारात हे वर्षानुवर्षे असेच चालले आहे, मात्र गेल्या महिनाभरात त्याचा कडेलोट पाहायला मिळाला, म्हणून हे समजून घेतले पाहिजे.

गेल्या महिन्यात काय घडले, ते आपण पाहू. १. जानेवारी २०१३ पासून ७३ हजार ३९८ कोटी म्हणजे १३.७ अब्ज डॉलर तर एकट्या सप्टेबरमध्ये परकीयांनी १३ हजार कोटी रुपये म्हणजे दोन अब्ज डॉलर इतके पैसे आपल्या शेअरबाजारात ओतले. २. याच काळात त्यांनी ३६ हजार ९१४ कोटी म्हणजे ५.७ अब्ज डॉलर इतके पैसे डेट मार्केटमधून काढून घेतले. एकट्या सप्टेंबरमध्ये त्यांनी डेट मार्केटमधून सहा हजार १६ कोटी रुपये काढून घेतले. ३. जगभर पैशांचे जे खासगी ‘संस्थानीकरण्’ सुरु आहे, ते किती सर्वव्यापी आहे, यासाठी एक उदाहरण पाहू. जगातील काही आर्थिक संस्थांकडे जो पैसा आहे तो अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. ब्लॅकरॉक आणि स्टेटस्ट्रीट या संस्थांकडे प्रत्येकी दोन ट्रीलीयन डॉलर आहेत. ही रक्कम भारताच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे! या संस्था शेअरबाजारात पैसे कमावतात आणि जीडीपीपेक्षा अधिक पैसा असणाऱ्या संस्था त्या देशांच्या धोरणांवर दबाव आणू शकतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्याकडील श्रीमंत झालेली मुजोर घराणी गल्लीला आणि गावाला कसे वाकवतात, हे आपण दररोज पाहत आहोतच. ४. पैशाच्या खासगी ‘संस्थानीकरणा’मुळे छोटा गुंतवणूकदार भरडला जातो आहे. गुंतवणुकीचे महत्व सांगता सांगता काही संस्थांची मजल इथपर्यंत गेली आहे की तुमचा हा पैसा बुडाला तरी तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होणार नाही, याची तयारी ठेवा, असे काही जण सांगत आहे. याचा अर्थ असा की ज्या संस्थांच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करतो आहोत, त्या संस्था ‘संस्थानीकरणा’मुळे बुडाल्या तर आपला पैसा बुडाला आणि आपण काही करू शकत नाही, याची मानसिक तयारी ठेवा!

ही केवळ आकडेवारी नाही. तिच्या आत लपलेले वास्तव आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम करते आहे. ते वास्तव कटू आहे. आपल्या देशात भरपूर संपत्ती असताना, निसर्गाची कृपा आणि १२२ कोटी लोकसंख्येच्या माध्यमातून मुबलक ऊर्जा आणि ग्राहक असताना आपल्या देशाची गाडी सुसाट धावलीच पाहिजे. मात्र आपला संसार परकीयांनी करावा, अशी आपली उरफाटी अपेक्षा आहे. आपल्या देशाचा विकासदर चार राहील की पाच राहील आणि तो पुन्हा नऊ किंवा दहा केव्हा होईल, याची चिंता आज देश करतो आहे. ज्यात भारतीय गुंतवणूकदार सहभागी आहे, अशा शेअरबाजारासारख्या मार्गांनी भांडवलनिर्मिती करणे आणि १२२ कोटी भारतीयांना क्रयशक्ती दिल्याशिवाय दहाचा आकडा कसा गाठता येईल बरे?


कौटिल्याचे एक वचन
‘ निर्धन माणसांना शेकडो प्रयत्न केले तरी संपत्तीचा लाभ होत नाही. पाळलेल्या हत्तींच्या द्वारा ज्याप्रमाणे रानटी हत्ती बांधले जातात त्याप्रमाणे अर्थानेच अर्थाची प्राप्ती होते’.

No comments:

Post a Comment