Friday, July 18, 2014

हे तर वास्तवाशी फारकत घेणारे आकडे !




एखादा देश, राज्य, प्रदेश, गाव आणि समूह हा गरीब, मागास किंवा श्रीमंत आहे, असे सरसकटपणे सांगणारी आकडेवारी नियोजनासाठी वापरण्याऐवजी तिचा आता वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची वेळ आली आहे. दारिद्र्यरेषा ठरविणारी आकडेवारी फसवी वाटते, ती त्यामुळेच. अशी ही आकडेवारी आता ढोबळ कडून नेमकेपणाकडे गेली पाहिजे.


भारतासारख्या खंडप्राय देशाचे नियोजन करायचे तर नागरिकांचे उत्पन्न आणि त्यांचे जीवनमान याचा अभ्यास आवश्यकच आहे, मात्र हा अभ्यास केवळ सरसकट आकडेवारीच्याच बाजूने होत राहिला तर नियोजनात किती विसंगती निर्माण होऊ शकते, याचे अनेक दाखले पाहायला मिळत आहेत. दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी आयोगांची स्थापना करण्यात येते, मात्र त्या आयोगांनी दिलेल्या अहवालाविषयी आपल्या देशात एकमत होत नाही, हे ओघाने आलेच. देशात किती काळा पैसा आहे, हे ठरविण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले मात्र त्याला यश येवू शकलेले नाही. अशा देशात दारिद्यरेषा निश्चित करणे ब्रम्हदेवालाही शक्य होणार नाही. कारण आजच्या विषमतेत आणि महागाईत प्राथमिक गरजा कशाला म्हणायचे आणि एका कुटुंबाला जगण्यासाठी महिन्याला किती उत्पन्न लागेल, हे ठरविणे अशक्यप्राय झाले आहे. त्यावरून समाजजीवनात प्रचंड विसंगती तर निर्माण झाल्या आहेतच, पण सरकारचा कोणताही निर्णय अधिकाधिक जनतेला पटला, असे आता होईनासे झाले आहे.

शहरात ज्यांचा खर्च दिवसाला ३३ तर गावात २७ रुपये आहे, ते दारिद्र्यरेषेत येत नाहीत, असा अहवाल तेंडूलकर समितीने दिला तेव्हा मोठा गदारोळ झाला होता आणि नियोजन आयोगाला नवा आयोग स्थापन करणे भाग पडले होते. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांच्यावर यूपीए सरकारने ही जबाबदारी सोपविली होती, त्या आयोगाचा अहवाल नव्या सरकारला नुकताच सादर झाला आहे. त्यानुसार शहरात दिवसाला ४७ आणि गावात ३२ रुपये खर्च करणारे दारिद्र्य रेषेखाली येत नाहीत. म्हणजे शहरात हा आकडा १४ तर गावात तो ५ रुपयांनी वाढला आहे. आजच्या महागाईचा विचार करता हे आकडे म्हणजे दारिद्र्यरेषेची थट्टा आहे, हे सहजच कोणाच्याही लक्षात येते. त्यामुळेच सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर टीका केली आहे. शहर किंवा गावात महिन्याला ८१० ते जास्तीत १४१० रुपयांत एखाद्याने सध्याच्या महागाईत राहायचे तर त्याला काय कसरत करावी लागत असेल, याची कल्पना करवत नाही. मात्र आज देशावर त्याची खुलेपणाने चर्चा करण्याची वेळ आली आहे. आम्हाला गरीब म्हणा, मागास म्हणा, पण सवलती द्या, असे म्हणण्याची वेळ मानवी समूहांवर का येते आहे, याचेही उत्तर यातून मिळते.

अगदी नियोजन आयोग आणि त्यासारख्या संस्थांच्या अशा आकडेवारीचाच आधार घ्यायचा तर इतकी टोकाची विषमता घेऊन आपला देश पुढे जाऊ शकेल काय, याचा विचार आपल्याला येथे करायचा आहे. ही आकडेवारी यासाठी महत्वाची असते की त्यावरून अनेकांना सरकारी सवलती मिळणार की नाही, हे ठरणार असते. तसेच अनेकांचे आर्थिक फायदे त्यावरून ठरतात. मात्र हे सर्व सरसकट पद्धतीने केले जाते आणि त्यामुळेच ते फसवे असते. ग्रामीण भागातील माणसाला शहरात येवून जीवन जगण्याची जी धडपड करण्यास आजच्या व्यवस्थेने भाग पाडले आहे आणि त्यातून कोट्यवधी भारतीयांची जी कोंडी होते आहे, त्याचा आणि या आकडेवारीचा संबंध आहे. तसेच शहरी गरीबांची या व्यवस्थेत कुतरओढ होणे आणि आर्थिक व्यवहार आटत चाललेल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहणे, हे कसे क्रमप्राप्त आहे, हेही ही आकडेवारी आपल्याला सांगते.

आता त्याची काही उदाहरणे पाहू. किमान १.७ ट्रीलीयन डॉलर म्हणजे १०५ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था असलेल्या भारताचे सरासरी दरडोई उत्पन्न आज ७५ हजार रुपयांच्या घरात आहे. मात्र त्याचा विचार राज्यवार करायचा तर काय समोर येते पहा. दिल्लीत ते सर्वाधिक दोन लाखांच्या घरात जाते तर महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक औद्योगिक विकास झालेल्या राज्यात ते एक लाख सात हजार आहे. आणि बिहारमध्ये ते केवळ २८ हजार तर मध्यप्रदेशात ते ४३ हजार आहे! आता आपण आणखी खाली आलो तर महाराष्ट्रात मुंबईत ते एक लाख ६७ हजार आहे, पुण्यात एक लाख ५१ हजार, ठाण्यात एक लाख ५७ हजार आहे. तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे गडचिरोली, हिंगोली, बुलढाणा, बीड जिल्ह्यात ते ५० हजारांच्या आसपास आहे. म्हणजे मुंबईच्या एक तृतीआंश! जेथे औद्योगिकीकरण झाले आहे, त्या नागपूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये ते नव्वदीच्या घरात आहे. पण त्यातही आणखी खाली गेलो तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूरचे उत्पन्न शहराच्या दरडोई उत्पन्नाशी स्पर्धा करू शकत नाही. तसेच मुंबई-ठाण्याशी शहापूर स्पर्धा करू शकत नाही.

विभागवार विषमता आणि एकूणच विषमता हा वर्षानुवर्षे चाललेला विषय आहे. त्यामुळे त्याविषयी आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत. मात्र आता त्याचे अतिशय विघातक परिणाम दिसू लागल्याने या निकषांकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची वेळ आली आहे. ती अशी की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीचे हे जे सरसकट सपाटीकरण करणे किंवा सरासरी काढून त्यावर निर्णय घेणे चालले आहे, ते थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ असा की आपण बिहार हा आर्थिक मागास आहे, असे म्हणत राहतो, मात्र तोच मागासपणा महाराष्ट्रासारख्या आकडेवारीने विकसित राज्यात विदर्भ मराठवाडाच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातही असतो. मात्र या सपाटीकरणात त्याच्याकडे तेवढे लक्ष दिले जात नाही. दुसरे उदाहरण मुंबईचे देता येईल. मुंबईने दिल्लीवर मात केली आणि दिल्लीने मुंबईवर मात केली, अशी बाष्कळ चर्चा सुरु होते. मात्र त्यात या दोन महानगरांतील गरीबांच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष केले जाते. अगदी जमिनीवर उतरून विचार करायचा तर मागास मानल्या जाणाऱ्या गावात एखाद्या श्रीमंत मानल्या जाणाऱ्या गावापेक्षा अधिक उत्पन्न असलेले श्रीमंत असतात आणि मागासलेल्या गावाला सरकारकडून मिळणारे फायदे त्या गावातील गरीबांच्या नावाने ते लाटत असतात. हे थांबविण्यासाठी आकडेवारीचे हे सपाटीकरण थांबविण्याची गरज आहे.

आकडेवारीच्या या परिमाणात स्थलांतरित कसे भरडून निघतात, हे पहा. जेव्हा बिहारचा एक मजूर मुंबईत रोजगारासाठी येतो, तेव्हा तो २८ हजारच्या दरडोई उत्पन्नाच्या चौकटीतून एकदम त्याच्या पाचपट दरडोई उत्पन्न असलेल्या माणसांच्या समूहात येतो. त्यामुळे सुरवातीच्या काळात त्याची प्रचंड कोंडी होते, एवढेच नव्हे तर कमी उत्पन्न असतानाच्या मानसिकतेतून बाहेर यायला त्याला मोठा काळ जातो, ज्यातून समाजात गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते. स्थलांतरितांची ही कुतरओढ ही मुंबई आणि बिहारपुरती मर्यादित नाही. ती आदिवासी भागातून नासिकला, दुष्काळी भागातून औरंगाबाद, पुण्याला, आणि शेती परवडत नाही म्हणून ती सोडून नागपूरला मजुरीसाठी येणाऱ्या शेतकऱ्याला तशीच लागू होते.

तात्पर्य, जसे भारताला आता सरसकट अविकसित देश म्हणणे बरोबर नाही, तसेच एखाद्या राज्याला, प्रदेशाला, भागाला किंवा गावाला गरीब किंवा श्रीमंत म्हणण्यापेक्षा त्यातील ज्याला गरज आहे, त्याच्यापर्यंत मदत पोचण्यासाठी आकडेवारीच्या संकलनाचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची वेळ आली आहे. आकडेवारी तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत नवी तर असेलच पण ती त्या त्या भागाचे अधिक चांगले नियोजन शक्य करणारी असेल. तेवढेच महत्वाचे म्हणजे समुहावर शिक्के मारण्याची जी सवय आपल्याला लागली आहे, ती सवय त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक मोडायला लावणारी असेल.

Friday, July 11, 2014

हे असे कितीक खेळ..!


मराठी भाषा (न) बोलण्याच्या या ‘इश्यू’ ने मराठी समाजात एक वेगळेच दालन खुले झाले आहे. हा असा खेळ आहे, ज्यात कोणीच हरत नाही. इंग्रजीत त्याला ‘विन विन सिच्युएशन’ म्हणतात. मराठीत त्याला म्हणे शब्दच नाही. कारण अशा सर्व प्रसंगांत नेहमीच इंग्रजी जिंकली आहे!

भोसरी असे मराठमोळे नाव असलेल्या आणि मराठीचे माहेरघर मानल्या गेलेल्या पुण्यनगरीच्या आहारी गेलेल्या नगरातील ही घटना. तेथे प्रियदर्शनी असे छान शंभरटक्के भारतीय नाव असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत ही घटना घडली. त्या शाळेत, जो आठवीचा वर्ग आहे, त्यातील काही मित्र आपले म्हणणे आपल्या मित्रांना कळावे म्हणून, त्यांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत बोलताना रंगेहाथ पकडले गेले. नाहीतर ती लपूनछपून मराठी बोलतातच. कारण त्यांना अजून चांगली इंग्रजी बोलता येत नाही आणि मराठी बोलताना आता आता ती अडखळू लागली आहेत. म्हणजे ‘थर्ड लँगवेज’ मराठीही त्यांना आता नीट बोलता येत नाही. आपल्या इंग्रजी शाळेतील मुले अशी मराठीत बोलू लागली तर आपल्या शाळेचा लौकिक कसा वाढणार आणि आपल्या शाळेतील मुले साहेब कशी होणार, या चिंतेने सिंग नामक कदाचित हिंदी ही मातृभाषा असलेल्या मात्र ती त्यांना अजिबात येत नसलेल्या संचालकाने मुलांना सडकून काढले. मुलांच्या हातापायावर काळेनिळे वळ उमटले म्हणे. हे पालकांना कळाले तेव्हा त्यांना घडीभर वाईटच वाटले, मात्र मनातून त्यांना आनंदच झाला की छडी लागे छम, विद्या येई घम घम, असे शिक्षण देणारे कोणीतरी आहे तर ! पण ही बातमी कसे कोणा ठाऊक, पण निवडणुकीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या काही उतावीळ पुढाऱ्यांना कळाली आणि एकच हल्लागुल्ला सुरु झाला. जमाव जमला आणि शाळेत मागील दराने घुसून सिंगला पकडून धडा शिकविण्याची भाषा सुरु झाली. पण तो काही सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या अटकेचे आश्वासन दिले तेव्हा कोठे हा गदारोळ थांबला. आता पुढे काय होते, ते पाहायचे.

आमचे मत विचाराल तर त्या सिंगाचा जाहीर सत्कार आयोजित करून पालकांनी त्यांना एक भोसरीरत्न पुरस्कार देऊन टाकला पाहिजे. त्याची दोनतीन कारणे आहेत, त्यातील पहिले असे की ही घटना ज्यादिवशी घडली त्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचे केंद्रात शिजत होते म्हणे. त्या मुहूर्तावर सिंगांनी मुलांना मराठी बोलल्याबद्दल मारहाण करणे, हा जो योगायोग त्यांनी जुळून आणला आहे, त्याला मराठी भाषेच्या इतिहासात तोड नाही. ज्या भारतीय भाषेला अभिजात दर्जा दिला जातो, तिची गत काय होते, हे सिंगांइतके कोणास ठाऊक असणार? तो काय साधासुधा मराठी माणूस हाय? तो एका इंग्रजी शाळेचा पैसा मोजणारा संचालक आहे! दुसरे कारण म्हणजे या देशात इंग्रजी बोलण्याचे काय महत्व आहे, हे आता त्या मुलांना कोणी सांगण्याची गरजच नाही राहिली. त्यांच्या हातापायावरचे काळेनिळे वळ आयुष्यभर त्यांच्या कायम लक्षात राहतील. त्यांच्या पालकांना खूप वाटते, आपल्याला नाहीतर आपल्या मुलांना तरी इंग्रजी बोलता आले पाहिजे. पण मराठीत कितीही आरडाओरडा करून ती ऐकतच नव्हती! आता पालकांना आयुष्यभर या कारणासाठी आरडाओरड करावी लागणार नाही.

या घटनेचा आणखी एक पैलू आहे, तो असा की सिंगांनी या ‘केस’ मध्ये ओरडा करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांना आणि पालकांना मानाने शाळेत बोलावून त्यांना हारतुरे दिले पाहिजेत. त्याचे कारण म्हणजे भोसरीच्या प्रियदर्शनीमध्ये मुलांना एकमेकांत मराठीत बोलण्यास मज्जाव आहे, त्यामुळे तेथेच आपली मुले भडाभडा इंगजी बोलणे शिकू शकतात, अशी कीर्ती याच आरडाओरडयामुळे सर्वत्र पोचणार. त्यामुळे आता पुढील वर्षी त्या शाळेत आपल्या लाडक्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून मध्यरात्रीपासून रांगत रांगा लागतील आणि प्रवेश मिळाल्यावर धन्यता वाटेल. इतकी की सिंग किती जास्त फी मागतात, याचेही भान पालकांना राहणार नाही. या आरडाओरडीने सिंगसाहेबांचा हा जो फायदा झाला आहे, तो किती पैशांत मोजला जाणार, हे कोणीही सांगू शकणार नाही! राहिला प्रश्न पुढाऱ्यांचा. तर त्यांचे सिंगसाहेबांना फोन येतील की आमच्या मुलांना प्रवेश द्या, आम्ही काही मध्यरात्री रांगत रांगेत उभे राहणार नाही. आमचाही काही मान आहे! पण आमच्या मुलांना इंग्रजी भडाभडा ओकता आली पाहिजे. आमची जी अडचण झाली ती आमच्या मुलांची होणार नाही, एवढे बघा सिंगसाहेब! पोलीसकेसचे काय करायचे, असा एक प्रश्न अनिर्णीत राहील, पण तो किरकोळीत चिरीमिरीने सुटू शकतो.

मराठी भाषा (न) बोलण्याच्या या ‘इश्यू’ ने मराठी समाजात एक वेगळेच दालन खुले झाले आहे. हा असा खेळ आहे, ज्यात कोणीच हरत नाही. इंग्रजीत त्याला ‘विन विन सिच्युएशन’ म्हणतात. मराठीत त्याला म्हणे शब्दच नाही. कारण अशा सर्व प्रसंगांत नेहमीच इंग्रजी जिंकली आहे! ते पहा, तिकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर होतो आहे! (जय महाराष्ट्र...वाजवा तुतारी)

(सौजन्य - दैनिक दिव्य मराठी)

Thursday, July 3, 2014

कधी संपणार करांचा दहशतवाद ?



जगासमोर दहशतवादाचा धोका आहे, असे आपण म्हणतो. तसा धोका सध्या भारतीय नागरिक अनुभवत आहेत आणि त्या धोक्याचे नाव आहे- करांचा दहशतवाद. किमान ३२ प्रकारच्या करांनी त्याचे जगणे कठीण आणि कटकटीचे करून टाकले आहे. आधुनिक जगात साऱ्या जगाशी स्पर्धा करण्यास सांगितले जाते, मात्र भारतीय नागरिक या स्पर्धेत केवळ करांच्या जंजाळात फसल्याने मागे पडतो आहे. एवढेच नव्हे तर त्याची बचत आणि खर्च करण्यावरही करांमुळे मर्यादा आली आहे. व्यवहार का वाढत नाहीत आणि मंदीसदृश्य स्थिती का बदलत नाही, याचे एक प्रमुख कारण हा करांचा दहशतवाद आहे. करपद्धतीत बदल केल्याशिवाय देशातील इतर बदल गती घेऊ शकणार नाहीत, हे आता अनेकांना पटू लागले आहे.

उद्योग व्यवसाय करण्यास कोणते देश चांगले आहेत, याची जी १८५ देशांची यादी जागतिक बँकेने तयार केली आहेत, त्यात भारताचा नंबर १५२ इतका खाली आहे. अर्थात ही गोष्ट आपल्याला जागतिक बँकेने सांगितली पाहिजे, असे अजिबात नाही. आपण आपल्या मालमत्तेचा व्यवहार करण्यास, पासपोर्ट काढण्यास किंवा महापालिकेचा कर भरण्यास बाहेर पडलो तरी हा दहशतवाद कसा काम करतो, याची चुणूक पाहायला मिळते. सर्व ३२ करांना आपण एकाचवेळी हात लावू शकत नाही, मात्र किमान उद्योग व्यवसायांना तरी त्यातून लवकर मोकळे केले पाहिजे, असा विचार करून जीएसटीवर (वस्तू आणि सेवा कर) विचार सुरु झाला. हा कर सध्या जगातील १४० देशांत अस्तित्वात आहे आणि फ्रांसमध्ये ५० वर्षांपूर्वी तो सुरु झाला आहे. भारताला खरे तर अर्थक्रांती सांगते तशा बँक व्यवहार कराचीच गरज आहे, मात्र एक मधला मार्ग म्हणून आपण जीएसटीकडे पाहू शकतो. पण जीएसटीची अमलबजावणी कधी होईल, हे आज कोणीच सांगू शकत नाही. एप्रिल २०१० पासून देशभर जीएसटी लागू होईल, असे त्यावेळचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००९ च्या अर्थसंकल्पात म्हटले होते. त्याला आता पाच वर्षे झाली. मधल्या काळात भारतीय नागरिक, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार किचकट करपद्धतीमुळे त्रस्त झाले आहेत आणि त्यातून सुटका होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.

करविषयक विषय आता कसे महत्वाचे ठरू लागले आहेत, याचे आणखी एक उदहारण म्हणजे टोल आणि एलबीटी. सरकारकडे पैसे नाहीत म्हणून सरकारने खासगीकरणाला इतका वेग दिला आहे की आता रस्तेही खासगी उद्योजक बांधू लागले आहेत. पण रस्त्यात अडवून घेतला जाणारा टोल भरणे जनतेला मान्य नाही. त्यामुळे त्यावरून राज्याराज्यात गदारोळ सुरु आहे. जकातीच्या विरोधात असाच राग व्यक्त झाला आणि मुंबईबाहेर जकात बंद झाली. त्याची जागा आता एलबीटीने घेतली आहे. पण त्यावरूनही वाद सुरु झाला असून आगामी निवडणुकीपूर्वी तोही कर रद्द होऊ शकतो. पण कर वसूल करणे हा सरकारचा घटनात्मक अधिकार असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व सरकारे करांच्या महसुलावरच जिवंत असल्याने करांची नावे तेवढी बदलून नवे काही केल्याचा देखावा उभा राहतो आहे. या विषयावर करदात्यांचे शिक्षण करण्याऐवजी सरकार तात्पुरते मार्ग अवलंबत आहे. यातून प्रशासनाची घडी तर विस्कटणार आहेच, पण नागरी सेवांवर विपरीत परिणाम होणार आहेत. आम्ही कर भरायला तयार आहोत, मात्र करांच्या जंजाळातून आमची सुटका करा, कर सुटसुटीत करा, असे म्हणणारे आपल्या मागणीशी प्रामाणिक असतील तर त्यांनी सर्व व्यवस्था आणि देशाचे भांडवल शुद्ध करणाऱ्या अर्थक्रांतीच्या बँक व्यवहार कराची मागणी केली पाहिजे. या कराने करपद्धतीतील सर्व दोष तर दूर होतातच पण सरकारला प्रचंड महसूलही मिळू शकतो.

करपद्धतीत नेमके काय बदल केले पाहिजेत, याचा अभ्यास करण्यासाठी पार्थसारथी शोम आयोग स्थापन करण्यात आला होता. त्या आयोगाच्या शिफारशी नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. करपद्धतीत झालेला गुंता कसा सोडविता येईल, हे त्या आयोगाने लक्षात आणून दिले आहे, मात्र हा गुंताच होऊ नये, यासाठी ठोस काही आयोग सांगू शकलेला नाही. रिफंड कसा आणि कधी मिळावा आणि पॅन कार्डचा वापर कसा परिणामकारक करता येईल, इतक्या प्राथमिक सूचना करण्याची वेळ आयोगावर आली आहे. या ज्या काही शिफारशी आहेत, त्या प्रत्यक्षात कधी येणार, हेही सांगता येत नाही. या शिफारशींचा प्रवास जीएसटीसारखाच होऊ शकतो.

याचा दुसरा अर्थ असा की करपद्धतीत अशाच कासवगतीने सुधारणा होत राहिल्या तर आपला देश मोठ्या संकटात सापडू शकतो. ज्या संकटात देशात पैसा भरपूर असेल, मात्र तो काळ्या व्यवहारात लोळणारा असेल. सार्वजनिक सेवा सुविधांचा दर्जा असाच खालावत जाईल. आपले उत्पन्न वाढेल, मात्र ते पुरेसे आहे, असे आपल्याला कधीच वाटणार नाही. जगण्यासाठीची केविलवाणी धडपड, असेच ते जगणे असेल. आणि व्यवस्थेचा दोष लक्षात न आल्याने अशा किती पिढ्या स्वत:ला दोष देत संपून जातील.

या दुष्टचक्रातून सुटकेचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे बँक व्यवहार करासारख्या सुटसुटीत पद्धतीने कर भरण्याच्या पद्धतीची मागणी करणे आणि वडिलांची भूमिका निभावणाऱ्या सरकारलाही महसूल कमी पडणार नाही, याची या कराद्वारे काळजी घेणे. करासारख्या निरस व्यवहारापासून सुरु होत असलेला माणसाच्या अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनापर्यंतचा प्रवास कसा पुढे नेता येईल, याचे असे काही थांबे तुम्हाला या ‘अर्थपूर्ण’ मध्येही सापडतील.
(अधिक माहितीसाठी पहा www.arthakrnati.org)