Tuesday, May 31, 2011

नव्या वळणावरील मिलाप

पुण्याकडून मराठवाड्यात प्रवेश करताना आता नव्या पुलावरून कायगावात यावे लागते. किमान 50 वर्षांचा जुना पूल कमकुवत होऊन बंद पड्ला. मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाल्यापासूनचा काळ त्या पुलाने पाहिला. हा रस्ता आता आणि बराच उशिरा चौपदरी झाला असून याच रस्त्याने पूर्वी पुण्याला जायचे तर 5 ते सहा तास लागत. मराठवाड्यातील जनतेला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले, त्याचे परिणाम पुढे इतके दीर्घकाळ सहन करावे लागतील, अशी कल्पना कोणी केली नसेल. आता काही चालकवीर चारऐवजी तीन साडेतीन तासात पुणे गाठतात हा भाग वेगळा.
स्वामी रामानंद् तीर्थ, गोविंदभाईंनी मराठवाडा महाराष्ट्रात सामील करण्याची तर मागणी केलीच पण मुंबईसह महाराष्ट्र होण्याच्या मागणीला बळ दिले, याचा अर्थ भाषा आणि संस्कृती या अर्थाने मराठी समाज एकत्र नांदताना मुंबईला सोबत घेतल्याशिवाय आपल्याला नव्या जगात जाता येणार नाही, हेच जणू त्यांनी हेरले होते. पश्चिमेकडे जाणार्‍या या मार्गांनी आता किती बस, किती मालगाड्या आणि किती खासगी वाहने जातात त्याची गणती नाही. ( टोलवाले करतात म्हणा!) कायगावचा पूल नव्हता तेव्हा मोटारी तराफींवर ठेवून गोदावरी पार करावी लागत होती, म्हणतात. ‘पश्चिमेचे रस्ते’ मराठवाड्यासाठी असे रोखलेले होते तर ! त्या पुलाखाली आता 12 महिने पाणी दिसते, कारण तीथपासून 40 किलोमीटरवर पैठणला मराठवाडयातले सर्वात मोठे जायकवाडी धरण आहे. शंकरराव चव्हाण यांनी ही साईट कशी चुकीची निवडली, त्याविषयी बरेच काही बोलले जाते, हा आता इतिहास झाला. अर्थात त्यामुळेच औरंगाबाद्सारख्या 12 लाखाच्या वस्तीला खात्रीचे पाणी मिळते आहे. नसता हे शहर कशाच्या भरवश्यावर वाढते ! मलिक अंबरने एकेकाळी नहरे अंबरीद्वारे या शहराला पाणी पुरविण्याची एक अफलातून पद्धत शोधून काढली होती, पण आता ती कशी पुरी पडणार? तिचा अभ्यास सतत सुरुच आहे आणि ठेवावाच लागेल कारण असेच काही या मातीतले मॉडेल मराठवाड्याचा सर्वात कळीचा - पाण्याचा प्रश्न सोडविण्यास भविष्यात उपयोगी ठरणार आहे.
औरंगाबादच्या दक्षिणेला द्क्षिण काशी म्हणजे पैठण. या पालथ्या नगरीत सातवाहन घराण्याच्या काळातील समृद्धी दडलेली आहे. संत एकनाथांना भेटण्यासाठी हजारो वारकरी गोदाकाठी आजही एकत्र येतात. त्याच्या उत्तरेला गंगापूर आणि वैजापूर ही दुष्काळी भूमी. मात्र आता नांदूर मधमेश्वराचे पाणी काही भागात खेळू लागले आहे. पलिकडे कन्नडच्या गौताळा अभयारण्य आणि मराठवाड्याचे चाळीसगावकड्चे टोक म्हणजे ऑट्रम घाट. घाटाच्या वरच्या बाजूला पितळखोर्‍याची लेणी आणि खाली चाळीसगावचे जंगल. तेथे भास्कराचार्यांचे वास्तव्य होते, असे म्हणतात. किनवटनंतर मराठवाड्यातील गौताळा हे एकमेव जंगल, मात्र ते आज संकटात आहे. आणखी वर आलात की वेरूळ आणि अजिंठा लेणी. औरंगाबाद्च्या दिशेने दौलताबाद किंवा देवगिरी किल्ला. अनेक राजवटी यादवांच्या या भूमीच्या प्रेमात पडल्या. पश्चिमेचा वारा मनसोक्त पिणारा हा भाग जर्जरी बक्षांसारख्या सुफी संतांनाही आवडून गेला. शारंगदेव आणि गोपालनायकाचा आवाज याच डोंगरदर्‍यांनी ऐकला आणि हिंदुस्थानी संगीताची साधना येथूनच सुरू झाली. पाकिजासारख्या रोमँटिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खुलताबादशिवाय दुसरे लोकेशन असूच शकत नाही. खुलताबाद गेस्ट हाऊससारखे गेस्ट हाऊस नाही, असे आता आतापर्यंत म्हटले जायचे. हा भाग एवढा रम्य आहे की आताही शहराबाहेर जायचे म्हटल्यावर येथेच हुरडा पार्टया रंगतात. पैठणरोडच्या बरोबरीने याच भागात फार्महाऊससाठी जागा खरेदी केल्या जाताहेत. वेरूळला अगदी गावातून गेलात तर औरंगजेबची कबर खुलताबादेत पाहायला मिळते. पेरू, सीताफळ किंवा अंजीर खाल्ल्याशिवाय या रस्त्याने प्रवास करण्यास बंदी आहे !
वेरूळ आणि अजिंठा लेणी आयुष्यात एकदा तरी पाहिल्याच पाहिजेत. म्हणजे आपण आधुनिक काळात किती पराक्रम गाजवित आहोत, हा भ्रम दूर व्हायला मदत होते. विशेषतः कैलास लेणीमध्ये आधी कळस मग पाया असे काम कलाकारांनी केले , असे गाईड सांगतो तेव्हा नतमस्तक होण्याशिवाय आपल्या हाती काही राहातच नाही. पलिकडे घृष्णेश्वराचे दर्शन घेताना मंदीरावरील कलाकुसर पाहून पुन्हा नतमस्तक. नतमस्तक झालेच पाहिजे, अशी कितीतरी ठिकाणे मराठवाड्यात आहेत, मात्र काळ बद्लला, सत्ताकेंद्रे बदलली आणि एकेकाळी पैठणच्या पैठणीमुळे आणि व्यापार उदीमामुळे जगाला माहीत झालेल्या या भूमीची गेले आठ शतके मात्र पिछेहाट झाली.
दौलताबाद रोडने औरंगाबादकडे येताना रस्ता वळण घेतो तसे देवगिरी किल्याचे सर्व बाजूंनी दर्शन होत राहाते. आपण पाहू तिकडे राजेशाही खुणा अंगावर पांघरणारे खंडहर दिसायला लागतात. आधुनिक काळात उत्पादन, रोजगार हेच परवलीचे शब्द झाले आहेत. औरंगाबादला औद्योगिक शहराचा दर्जा मिळवून देणारी वाळूज – पंढरपूर एमआयडीसी दौलताबाद आणि पुणे रस्त्याच्या मधोमध बसली आहे. मात्र या अफाट प्रदेशाच्या मानाने ती अपुरी असल्याने तिला ओलांडून हजारो तरूणतरूणींनी आता पश्चिमेला म्हणजे पुणे आणि मुंबईला जवळ केले आहे. रफिक झकेरिया यांनी चिकलठाणा एमआयडीसी वसविली होती, मात्र सवलती संपल्या म्हणून तेथे आता रिअल इस्टेटचे मजले चढत आहेत. जालना रोडला शहरापासून 10 किलोमीटरवर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत झाली, मात्र तिचे ‘पाणी’ पश्चिमेकडूनच अडविण्यात आले आहे.
अजिंठा वेरूळने औरंगाबादला जागतिक नकाशावर नेऊन बसवले. शहरात असलेल्या चार दशकांच्या पंचतारांकित हॉटेल आणि विमानतळ ही त्याचीच देण आहे. आता मात्र ही या भागाची गरज झाली असून औरंगाबादच्या आकाशात विमाने वारंवार दिसू लागली आहेत. आधी विकास आंदोलन आणि नंतर रेल्वे रूंदीकरण आंदोलन. मराठवाड्याला लढल्याशिवाय काही मिळालेच नाही. रूंदीकरणाच्या मार्गावर आता तासातासाला गाड्या धावतात आणि मराठवाड्याला देशाशी जोडण्याचे प्रयत्न करतात. हैदराबादच्या निजामाने औरंगाबाद मुक्कामी उपराजधानी करून आपले मराठवाड्याकडे लक्ष असल्याचे त्यावेळी भासविले खरे, पण त्यावेळच्या कटू आठवणी आजही सांगितल्या जातात, इतक्या त्या कटू आहेत. एखाद्या भागाचे सांधे जुळण्यासाठी एवढा मोठा काळ लागतो तर !

आज मध्यभारतातील एक माध्यमसमूह महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या औरंगाबादनगरीत प्रवेश करतो आहे. मराठी भाषा, संस्कृतीचे माहेरघर असलेल्या या भूमीत त्याचे स्वागत यासाठी केले पाहिजे की 121 कोटी लोकसंख्या असलेल्या या वैविध्याने नटलेल्या देशात जागतिकरणाच्या रखरखाटातही भाषा संस्कृतीचा मिलाप अपरिहार्यच आहे. औरंगाबादने शतकानुशतके मराठी, हिंदी(दखनी) आणि उर्दू या भाषा आणि या भाषांच्या खांद्यावरील संस्कृती खेळविल्या आहेत. या त्रिवेणी संस्कृतीचे विस्तारीकरण ‘दिव्य मराठी’ च्या आगमनाने होते आहे. आधुनिक जग जसे सर्वांना सामावून घेत घेत पुढे जाते आहे, तसेच ही ऐतिहासिक भूमी या नव्या प्रवाहांचा स्वीकार करत गतवैभवाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

Sunday, May 1, 2011

150 रुपयांच्या नाण्याची दुसरी बाजू


दोन हजार तिनशे वर्षांपूर्वीच्या ‘कौटिलीय अर्थशास्र’ या ग्रंथात कौटिल्य म्हणतात, ‘जेव्हा फळ पिकते, तेव्हाच ते खुडावे आणि प्रजेकडे क्षमता असते, तेव्हाच महसूल वसूल करावा. जर फळ परिपक्व नसताना खुडले आणि महसूल परिपक्व नसताना वसूल केला, तर त्याचे मूळ कायमचे दुखावले जाऊ शकते आणि ते भविष्यात फारच त्रासदायक ठरू शकते’. ‘ज्याप्रमाणे जळू, वासरू आणि मधमाशा आपले अन्न हळूहळू ओढून घेतात, त्याच पद्धतीने राजाने आपल्या राज्यात वार्षिक कर गोळा करावा’, या अर्थाचा मनुस्मृतीत (अध्याय 6) श्लोक आहे.

250 वर्षांपूर्वी इंग्रजांनी भारताचा ताबा घ्यायला सुरवात केली तेव्हा या खंडप्राय देशाला चालविण्यासाठी त्यांना प्रशासकीय रचना करण्याची गरज वाटली तसेच 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचा सामना करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागला. तो खर्च भारतातूनच वसूल करण्यासाठी इंग्रजांनी प्राप्तिकराला जन्म दिला. त्यावेळी ही जबाबदारी ब्रिटनमधील अर्थतज्ञ जेम्स विल्सन यांच्यावर सोपविण्यात आली. विल्सन हे 54 वर्षांचे होते आणि ते प्रथमच भारतात येत होते. त्यामुळे त्यांना हा देश समजून घेण्यासाठी भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड केनिंग यांच्यासोबत दौरा आखण्यात आला. त्यांनी या दौर्‍याविषयी केलेल्या काही नोंदी अशा आहेतः

‘रोज 120 मैल प्रवास करण्याचे आम्ही ठरविले आहे. आमच्या दौर्‍यात 20 हजार लोक सामील आहेत. हा 20 हजार लोकांचा समूह दौर्‍यात दररोज हलत असतो. आमच्या विश्रांतीसाठी तंबू खूपच आरामदायक आहेत. त्यात मध्यभागी बैठकीची खोली आणि प्रत्येक दिशेला झोपायची खोली आहे. लॉर्ड कॅनिंग यांच्या तंबूजवळच माझा तंबू असतो. आमच्या दौर्‍यात सर्व वस्तूंचे दोन संच आहेत. त्यामूळे आम्ही ज्या तंबूत राहतो, अगदी तसाच, जणू तोच तंबू , दुसर्‍या दिवशीही मला मिळतो.’

या दौर्‍याचे वर्णन करणारी पत्र विल्सन यांनी (1859) आपल्या कुटुंबियांना लिहिली आहेत. त्यात भारतातील शेती, निसर्ग, लोकजीवनाचे वर्णन करत त्यांनी आपल्यातील अर्थतज्ञ जागा करताना भारताविषयी सूचकपणे म्हटलेः ‘ए गुड कंट्री टु टॅक्स’. इंग्रजांचा खर्च नेमका कशावर होत होता आणि इंग्रजांना नेमके काय हवे होते, हे आपल्याला यावरुन लक्षात यावे.

त्याच सुमारास पर्मनंट सेटलमेंट ऍक्ट लागू होता आणि त्यानुसार इंग्रज ‘लगान’ वसुली कसे करत होते, हे आपल्याला माहीत आहे. लगानचा आणि त्यावर्षी जमिनदार किंवा शेतकर्‍याला झालेल्या उत्पन्नाचा काही संबंध नव्हता. सुकाळ असो की दुष्काळ, विशिष्ट लगान भरावाच लागे आणि तो भरता आला नाही, तर जमिनीचा लिलाव करून लगान वसूल केला जात असे. या लिलावात मातीमोल किंमतीत जमिनी खरेदी करणारी मंडळी सरकारी अधिकारी असत. करांची व्यवस्था जाचक आणि गुंतागुंतीची करुन प्रजेला लुटण्याची पद्धत इतकी जुनी आहे तर!

आज 250 वर्षांनी जेव्हा जागतिक आर्थिक सत्ताकेंद्र बदलायला लागली आहेत, तेव्हा त्याच ब्रिटनच्या संसदेत काय चालले आहे पाहा. केवळ ब्रिटनच नव्हे तर अख्खा युरोप आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे, याच्या विचारविनिमयासाठी मोठमोठया परिषदा भरविल्या जात आहेत. आणि एक अनिवासी भारतीयच या पेचातून सुटण्याचा मार्ग ब्रिटीशांना त्यांच्या संसदेत सांगताहेत.( 25 मार्च 2011) त्यांचे नाव स्वराज पॉल. ते म्हणतातः ‘ चीन, भारत आणि ब्राझील यांनी उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन नव्या संधी घेतल्या आहेत. सध्याची करपद्धती, निवृत्तीवेतनाची रचना आणि मनुष्यबळाबाबत असलेले निर्बंध हे अनावश्यक इतके गुंतागुंतीचे आहेत. गुंतवणूक वाढविण्यासाठी संशोधन आणि विकास प्रक्रियेला चालना दिली पाहिजे. तसेच छोट्या उद्योगांना चालना मिळण्यासाठी भांडवल भत्ता आणि कर कमी करण्यासारखे उपाय केले पाहिजेत.’

आता पुन्हा 2300 वर्षापूर्वीच्या मनुस्मृतीचा दाखला येथे दिलाच पाहिजे. मनुस्मृतीतील एका श्लोकात ( अध्याय 7, श्लोक 128) म्हटले आहे, ‘ राज्यातील उद्योग आणि व्यापाराची भरभराट होईल आणि राजाचाही लाभ होईल, असे कर राजाने लावायला हवेत.’ कर हा सरकारी तिजोरीत प्रजेने केलेले सक्तीचे योगदान नसून राजाने प्रजेला संरक्षण पुरविण्याच्या आधारावरचे देणे आहे. जर राजाने आपल्या राजधर्मात कसूर केली तर प्रजा कर भरणे थांबवू शकते, किंबहुना भरलेला कर परतही मागू शकते, असेही कौटिल्यांनी म्हटले आहे.

मधल्या 300 वर्षांत असे काय घडले की 2000 वर्षांपूर्वी भारतीय अर्थतज्ञांनी सांगितलेल्या सर्वच व्यवस्थांचा आम्हाला विसर पडला? झाले असे की या व्यवस्थांचा आणि जगा आणि जगू द्या, या तत्वज्ञानाचा विसर पडावा, नव्हे ते कमी दर्जाचे आहे, ते मागासलेपण आहे, असा विचार इंग्रजांनी जाणीवपूर्वक रुजविला. हा कमी दर्जाचा वंश आहे, हा काही इंग्रजांचा ठपकाही आपण सहन केला. त्याचा परिणाम असा झाला की खरोखरच आम्ही स्वतःला कमी दर्जाचे समजायला लागलो. भारतावर राज्य करण्यासाठी आणि या देशाची लूट करण्यासाठी जी व्यवस्था त्यांनी बसविली, तिलाच आदर्श मानत आपण स्वतंत्र भारताच्या प्रवासाला निघालो. अर्थव्यवस्थेमध्ये कधी समन्यायी तर कधी गरजूंना मदत करणारी भूमिका घ्यावी लागते, करपद्धती संतुलित आणि त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांना समान महत्व देणारी असली पाहिजे, हे आम्ही विसरुन गेलो. सर्वसामान्य माणसाला चरकातून पिळून काढणारी व्यवस्था म्हणजे चांगला व्यापारउदीम, हे ‘मॅनेजमेंट’ आम्ही मान्य करून टाकले. या व्यवस्थेच्या आता आम्ही इतके आहारी गेलो आहोत, की माणसांचे आयुष्य महत्वाचे ठरण्याऐवजी भौतिक आकडेवारी अधिक महत्वाची ठरायला लागली. आजच्या भारतीय (खरे म्हणजे ब्रिटिश) करपद्धतीने आमच्या देशबांधवांचे कंबरडे मोडले आहे. त्यात सुधारणा करण्याचे ‘जीएसटी’ सारखे प्रयत्न होतात खरे, मात्र त्यासाठी जाणारा काळ लाखो लोकांचे आयुष्य अप्रत्यक्ष करांद्वारे करपवून टाकणारा आहे.

आपण सरकारी तिजोरीत भरतो ते कर आणि आपले दैनंदिन जीवन, सुखदुःखांचा इतका जवळचा संबंध आहे, आणि तो फार पुरातन आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सुदैवाने रिझर्व बँकेने परवा 150 रूपयांचे नाणे प्रसिद्ध करताना कौटिल्यांच्या करविषयक तत्वज्ञानाचा गौरव करण्यासाठी मधमाशी फुलावरील परागकण जमा करतानाचे चित्र या नाण्यावर कोरले आहे. (अर्थपूर्णचे यावेळचे मुखपृष्ठ तेच आहे) ज्या देशात कोठेही नोटांची बंडले सापडायला लागली आहेत, त्या देशात आता 150 रूपयाच्या नाण्याची गरज आहे काय, या प्रश्नाचे उत्तर ‘ अजिबात नाही’ हेच आहे. मात्र करविषयक कौटिल्यांचा विचार आपले सरकार मान्य करते, ही ‘नाण्याची दुसरी बाजू’ तरी या निमित्ताने समोर आली. करसंकलनातूनच देश चालतो, हे नाकबूल करण्याचे कारण नाही, मात्र महसूल कमी पडू लागला की बदल नाव आणि लाव नवा कर हे धोरणही चांगले नाही. आर्थिक व्यवस्थापनाचा विचार न करता करवसुली चांगली म्हणजे देशाची आर्थिक स्थिती चांगली, हा विचार घातक आहे. काही मोजक्या लोकांच्या ऐशआरामासाठी सरकारी महसूल खर्च होत असेल तर जनता कोणत्या थराला जावू शकते, याचा धडा इजिप्त, लीबिया, येमेन, सीरिया अशा डझनभर बंदिस्त मानल्या जाणार्‍या देशांमधील वर्षानुवर्षे पिडलेल्या जनतेने जगाला दिला आहे. भूकंपानंतरची ही सुनामी जगाला कोणते वळण घ्यायला लावेल, हे आज सांगता येणार नाही, मात्र जगाच्या रचनेत मूलभूत बदलांची वेळ जवळ आल्याची हाक हे लढे देत आहेत, एवढे नक्की!

जेम्स विल्सन यांनी ज्या भारताचे वर्णन ‘ए गुड कंट्री टु टॅक्स’ असे केले होते, ते ब्रिटिशांसाठी आणि भारतीय संपत्ती ब्रिटनमध्ये नेण्यासाठी केले होते, याचा भारतीय राज्यकर्त्यांना जणू विसर पडला आहे. आता देश स्वतंत्र झाला आहे आणि आता आपण आपल्या या महाकाय देशातल्या 120 कोटी जनतेच्या सुखदुःखाशी बांधील आहोत, याचे भान देण्याचे कर्तव्य आपल्या सर्वांना ‘अर्थक्राती’च्या प्रस्तावांद्वारे द्यायचे आहे. त्यासाठी हा विषय सर्वांनी समजून घेतला पाहिजे. ‘अर्थपूर्ण’चा हा आशय या उद्देशांना न्याय देईल, अशी खात्री आहे.
यमाजी मालकर / ymalkar@gmail.com / www.arthakranti.org संपादकीय ( ‘अर्थपूर्ण’ एप्रिल 2011 )