Monday, August 15, 2011

‘कलियुगातील वैकुंठा’ वरचे आनंदी जग







तिरुपती बालाजी देवस्थानासंबंधीच्या पुराणकथांपेक्षा मला तेथील नैसर्गिक सौंदर्य, आनंदी वातावरण आणि प्रशासनाने दिलेली सुरक्षितता महत्वाची वाटली. लाखो लोक एका ठिकाणी एकत्र येतात तर तेथे अनेकांची थोडी गैरसोय होणार, हे ओघाने आलेच पण एरवी इतर कोठे इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले असते, तर अराजकच माजले असते. मग तिरुपती शहरापासून अवघ्या 27 किलोमीटरवर जणू वेगळे जगच आपल्याला का पाहायला मिळते?





श्री वेंकटेश्वर चरित्र महात्म्य या धार्मिक पुस्तिकेत एक कथा आहे. भद्र नावाच्या ब्राम्हणास सहा बायका होत्या. त्यामुळे मोठा गोतावळा, पण हे कुटुंब फारच गरीबीत दिवस काढत होते. अन्नपाण्याची व्यवस्था करता करता ब्राम्हण थकून गेला आणि आजारी पडला. एका बायकोने त्याला सांगितले की वेंकटाचलाच्या म्हणजे बालाजीच्या पापनाशन तीर्थात आंघोळ करून पवित्र ब्राम्हणास भूदान केल्यास सर्व पापे तर नष्ट होतातच पण सर्व प्रकारची संपत्तीही मिळते. ब्राम्हणाने सल्ला ऐकला आणि एका श्रीमंत माणसाकडून जमीन मिळवून बालाजी दर्शनास गेला. तीर्थात स्नान केले. पूजा केली आणि जमीन दानही केले. हे सर्व करून तो घरी परतला तर काय आश्चर्य! त्याला झोपडीच्या जागी एक मोठे घर दिसले. त्याच्या सहाही बायका सुवर्णालंकारांनी नटल्या होत्या. त्याच्या मुलांनी नवे, महागडे कपडे घातले होते. आणि शेवटी म्हटले आहे, की हे सर्व पाहून सर्व कुटुंब एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली !

ही कथा आज आठवण्याचे कारण ज्या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आज दररोज लाखो भक्त जातात, त्यांच्याही मनात आपल्याला समृद्धीत जीवन जगता यावे, अशी आशा असते. त्यामुळे असलेल्या संपत्तीत वाढ व्हावी, अशी प्रार्थना श्रीमंत भक्त तर दारिद्रयातून बाहेर काढण्याची प्रार्थना गरीब भक्त करतात. प्रत्यक्षात काय होते, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि अनुभवाचा विषय आहे. मात्र एक गोष्ट खरी की कलियुगातील वैकुंठ म्हणून या संस्थानाची ख्याती झाली आहे.

आजच्या जगात सर्वाधिक चर्चा असलेल्या काळ्या आणि पांढर्‍या पैशाचा पूर या संस्थानात दररोज वाहतो आहे. त्याचे कारणही आपल्याला माहीत आहे. पुराणातील कथांनुसार या परिसराची उभारणीच मुळी कुबेराने दिलेल्या कर्जातून झाली आहे. श्रीनिवासांनी पद्मावतींशी विवाह करताना घेतलेले हे कर्ज भक्त वर्षानुवर्षे तेथील हुंडीत धन टाकून फेडत आहेत कारण आपल्या या देवाने जनहितासाठी लग्न केले, अशी कथा आहे. धन हुंडीत टाकले की आपल्याला त्याच्या कितीतरी पट धन मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जगातील हे एक श्रीमंत देवस्थान आहे, हे आपण जाणतोच. मात्र ‘त्या’ ब्राम्हणापासून आजच्या लाखो भक्तांचा ओढा का कायम आहे, या प्रश्नाचे उत्तर मला तिरूमला पाहिल्यावर मिळाले. तिरुपती बालाजी देवस्थानासंबंधीच्या पुराणकथांपेक्षा मला तेथील नैसर्गिक सौंदर्य, आनंदी वातावरण आणि प्रशासनाने दिलेली सुरक्षितता महत्वाची वाटली. लाखो लोक एका ठिकाणी एकत्र येतात तर तेथे अनेकांची थोडी गैरसोय होणार, हे ओघाने आलेच पण एरवी इतर कोठे इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले असते, तर अराजकच माजले असते. मग तिरुपती शहरापासून अवघ्या 27 किलोमीटरवर जणू वेगळे जगच आपल्याला का पाहायला मिळते?

मी असे पाहिले की तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जातानाचा पवित्र भाव तर भक्तांच्या मनामध्ये आहेच, पण त्याच्या जोडीला समृद्धीचा अनुभवही तेवढाच महत्वाचा ठरतो आहे. जगात सध्या कलियुग चालू आहे, असे म्हणतात ( त्याचा अनुभव आपण घेतच आहोत) मात्र तिरूपती पर्वतावर या देवस्थानाच्या परिसरात आपल्याला कलियुगापेक्षा वेगळे काही पाहायला मिळते. ते केवळ पवित्र स्थान म्हणून निर्माण झालेले नाही, ते प्रयत्नपूर्वक तयार करण्यात आले आहे. असे म्हणता येईल की भक्तांमधील त्यावेळच्या भक्तिभावांमुळे आणि मुबलक संपत्तीमुळे ते शक्य झाले आहे.

तिरूपती शहरातून दर पाच-दहा मिनिटांनी सवलतीच्या दरात पर्वतावर जाणार्‍या शेकडो बस, सुंदर घाटरस्ता, जाण्यायेण्यासाठी असलेले स्वतंत्र मार्ग, प्रत्येक वळणावर वाहतूक नियंत्रण करणारी माणसे, देवस्थानाच्या परिसरात 100, 50 रूपयात होणारी निवास व्यवस्था, तेथील थंड आणि गरम पाण्याची मुबलकता, पर्वतावरील प्रमुख स्थळे पाहण्यासाठी करण्यात आले्ल्या मोफत बसफेर्‍या, रांगेतील सर्वांना दर्शन मिळण्याची खात्री, रांगेत असताना भक्तांना त्रास होणार नाही, याची घेतलेली काळजी, प्रसाद म्हणून भोजनाची केलेली निशुल्क व्यवस्था, स्वच्छता राहावी म्हणून ठिकठिकाणी बांधलेले स्वच्छतागृह, स्वच्छतेची काळजी घेणारे शेकडो सेवक, सर्वांचाच व्यवसाय होतो म्हणून अडवणूक किंवा लूट करण्याची गरजच नाही, अशा या समृद्धीच्या सर्व खुणा. दर्शनापासून निवास, भोजन, प्रवास या प्राथमिक गरजांची टंचाईच काढून टाकल्यामुळे आपण रांगेत उभे राहिले की आपल्याला कोणत्याही भेदभावाविना ते मिळेल, याची शाश्वती असल्यानंतर माणसे एकमेकांशी किती चांगले वागू शकतात, याचा अनुभव तेथे घेता येतो.

‘अर्थक्रांती’ (www.arthakranti.org) मध्ये यासंबंधीचे फार छान उदाहरण दिले जाते. आपल्या घरी आठवड्यातून एकदाच पाणी येणार, असे आपल्याला माहीत असेल तर आपण घरातील शक्य तेवढी भांडी भरून ठेवतो. या असुरक्षितेतून दहा-बारा दिवसांचे पाणी भरून ठेवले जाते. पण आपल्याला सांगण्यात आले की उद्यापासून दररोज पाणी येणार आहे, तर इतके सारे पाणी कोणी भरून ठेवील? कदापी नाही. आपल्या देशामध्ये याच असुरक्षिततेमुळे धनसंचय वाढला आहे. जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात सुरक्षितता निर्माण होत नाही, तोपर्यंत धनसंचयाची ही भूक भागणार नाही. गरीब ब्राम्हणाचे कुटुंब श्रीमंत झाल्यावर प्रेमाने एकमेकांना मिठ्या मारतात, त्याचे कारण समृद्धीचा आनंद आहे. आपण त्या आनंदाच्या शोधात आहोत.

No comments:

Post a Comment