Tuesday, February 7, 2012

भिनलेले विष काढण्यासाठी....


आता कररचना बदललल्याशिवाय सर्वांना मानाने जगता येणार नाही, हे जाणून तशी आंदोलने युरोप- अमेरिकेत सुरु झाली आहेत. मानवी प्रतिष्टेचा आदर राखण्याचे शहाणपण त्यांनीच आपल्याला शिकविले पाहिजे, असे नाही. मात्र त्या प्रतिष्ठेची आम्हालाही चाड आहे, हे भारतीयांना सिद्ध करावे लागेल. तो सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे, अर्थक्रांतीने सांगितलेला बँक व्यवहार कर. देशाचे आणि पर्यायाने भारतीयांचे शुद्धीकरण करणारा तो मार्ग आपण समजून घेवू यात.

आमच्या देशाचे राजकीय नेते भ्रष्ट आहेत, आमची नोकरशाही लाचखोर आहे, आमचा मध्यमवर्ग लबाड आहे, आमचे शिक्षणक्षेत्र नफेखोरी करते आहे, आमचे बांधकाम व्यावसायिक करबुडवे आहेत, आमचे डॉक्टर आणि हॉस्पीटले धंदेवाईक झाली आहेत, आमचा मेडिया नासला आहे, आमचे शेतकरी आळशी आणि कर्जबुडवे आहेत, आमचे कामगार कामचुकार आहेत, आमच्या देशातील सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते ढोंगी आहेत, आमच्या देशातील श्रीमंत उर्मट आणि उधळे आहेत....यादी अशी बरीच वाढविता येईल. हल्ली दररोज आम्ही सर्व असेच काहीतरी बोलत असतो. आपल्याला किंवा आपण ज्या समूहात काम करतो, तो समूह वगळून सर्व भारतीय समूहांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतो. कारण समूहांना बदनाम करणे सोपे असते. आपण काहीच करायचे नसते. शिवाय आपल्यासमोरील प्रश्नांना इतर समूह जबाबदार आहेत, असे म्हटले की स्वतःची सुटका झाल्याचे समाधान मिळते. खोलात जाण्यासाठी मनाला जो ताण द्यावा लागतो, त्या ताणापासूनही सुटका होते. खरोखरच जे थोडे लाचखोर, कामचुकार, लबाड, आळशी, उर्मट भारतीय आहेत, त्यांचा दिनक्रम बिनबोभाट चालूच राहातो आणि या खंडप्राय, गौरवशाली संस्कृतीच्या 121 कोटी लोकसंख्येच्या देशाला बदनाम करण्याचा परिपाठही वर्षानुवर्षे सुरुच राहातो. आपणच आपल्याला बदनाम करत आहोत, आपणच आपल्याला अप्रामाणिक ठरवत आहोत, हे लक्षातही येत नाही.

मानवी जीवन, मानवी प्रतिष्ठा ज्या समाजाला महत्वाच्या वाटत नाही, तो असेच एकमेकांवर चिखलफेक करत दरिद्रयी, परावलंबी, हतबल जीवन जगणार, यात आश्चर्य ते काय? आधी या देशावर हल्ला करणार्या टोळ्यांनी आणि नंतर इंग्रजांनी भारतीय वंशाला कमी दर्जाचे ठरविण्याची कटकारस्थाने केली आणि आता तर स्वकीयांनीच तो ठेका घेतला आहे. इंग्रजांनी तर अशी मेख मारून ठेवली आहे की आपले अन्न, आपली मातृभाषा, आपला वेष, आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपला देशही आपल्याला कमी दर्जाचा वाटायला लागला आहे. आता तर आपल्या भारतीयत्वाला जगाने बदनाम करण्याची गरजच राहिलेली नाही. बारा महिने 24 तास आत्मवंचनेचा हा करंटेपणा या देशात सुरूच आहे.

आम्ही हा करंटेपणा का स्वीकारला हेही आपल्याला माहीत आहे, आधुनिक जगाच्या व्याख्यांमध्ये आम्ही प्रतिगामी, मागासलेले ठरलो. पोट भरण्याला आम्ही जगणे समजायला लागलो आणि आम्ही पोटभरू झालो. खरे तर त्यांना का दोष द्या ? आम्ही होतोच हतबल. आम्ही विभागलेले होतो. आम्ही राजेरजवाड्यांसमोर हतबल होतो. आम्हीच आमच्या जातीधर्माच्या जाचक परंपरांमध्ये अडकून पडलो होतो. त्यांच्या आगमनामुळे आम्हाला नवे जग कळाले. आधुनिक जगाची ओळख झाली. अमूल्य मानवी जीवनाची नव्याने ओळख झाली. आमच्या लेणी, किल्ले, राजवाडे, मंदिरांकडे आम्ही नव्या दृष्टीने पाहायला लागलो. मानवी आयुष्यातील स्वातंत्र्याची किंमत आम्हाला कळली आणि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठीचे आमचे एकमत झाले. आम्ही स्वतंत्रही झालो. केवळ स्वतंत्रच नव्हे तर प्रजासत्ताक झालो. आता सहा दशके उलटून गेली. मात्र मानवी प्रतिष्ठेचा मुद्दा काही आमच्या अजेंड्यावर आलेला दिसत नाही.

आजची भौतिक समृद्धी आम्ही कष्ट करून मिळविली. भौतिक प्रगतीचे नवनवे टप्पे पादाक्रांत केले. जगाशी बरोबरी करण्याचे प्रयत्न केले. खरे म्हणजे आता स्वधर्माकडेच वळले पाहिजे. स्वतःची, या समाजाची नाळ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटभरू, निःसत्व विचारांचा त्याग केला पाहिजे आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे आपलेच समूह बदनाम करण्याचा हा अघोरी खेळ थांबविला पाहिजे.

मूळात हा खेळ का सुरू झाला आहे, हे समजून घेवू. गेल्या सहा शतकात खर्‍या अर्थाने आपण लोकशाहीत जगत आहोत. त्यामुळे जगण्यासाठी जी भौतिक आयुधे लागतात, त्यांची ओढाताण सुरू होणे क्रमप्राप्त होते. तशी ती झालीही, हेही समजण्यासारखे आहे. मात्र सहा दशकानंतरही ती ओढाताण त्याच पद्धतीने सुरू असेल तर तो या महाकाय देशाचा पराभवच ठरू शकतो. तसा आज सुरुच आहे आणि तो कोणामुळे होतो आहे, यासंवंधीचे समूहांचे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मुळात मेख काय आहे पाहा. भारतासह सारे जग आज पैशाची भाषा बोलते आहे. कारण काहीही असो, आज आपण मानवी जीवनातील सारी सुखदुःख पैशाच्या तराजूत मोजायला लागलो आहोत. आमच्या जगण्याची सर्वच परिमाणे पैशाच्या मार्गाने चालली आहेत. आमचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व्यवहार, आमच्या प्रतिष्ठा पैशाचा व्यवहार विकत घेताना दिसत आहेत. आणि आता तर हा व्यवहार अख्या जगाशी जोडला गेला आहे. त्यामुळे आता माघाराचीही मुभा नाही. जागतिकरण म्हणा, उदारीकरण म्हणा, समाजवाद म्हणा नाहीतर भांडवलशाही म्हणा, तुमच्या आवडीचे काहीही नाव द्या.... त्याने फरक काहीच पड्त नाही. पैशीकरणाने आमचे आयुष्य करकचून बांधून टाकले आहे. पुढे जाण्यासाठी हे आधी मान्य करावे लागेल की पैशाचे व्यवस्थापन महत्वाचे ठरले आहे.

आता आपण पैशाजवळ येवून थांबलो. मात्र खरी मेख पुढेच आहे. पैसा निर्माण होतो. तो पांढरा असतो आणि काळाही असतो. सर्वांचाच पांढरा असतो, तोपर्यंत सर्वांचेच बरे चाललेले असते, मात्र जेव्हा तो काळा व्हायला लागतो, तेव्हा काही जणांचेच बरे चालायला लागते. आज तसेच झाले आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांचे बरे चालले आहे. मात्र ज्यांच्याकडे पांढराच आहे किंवा ज्यांच्याकडे तोही येण्याचे आटले आहे, त्यांची आयुष्य कवडीमोल ठरत आहेत.

हा पैसा काळा कसा झाला? त्याच्या मुळाशी आहे, आजची करव्यवस्था. जाचक कर लादले की कर बुडवून, अतिरेकी नफाखोरी करून काळा पैसा तयार होतो आणि तो देशाच्या देहात विषासारखे काम करायला लागतो. तसे विष आज भारतीयांच्या देहात आणि मनामनात भिनले आहे. ते काढायचे तर एकमेकांचे समूह बदनाम करण्याचे अल्पसंतुष्ट मार्ग आधी थांबवावे लागतील. त्यासाठी करव्यवस्थेच्या मुळाशी जावून ती बदलण्याचा आग्रह धरावा लागेल. आता कररचना बदललल्याशिवाय सर्वांना मानाने जगता येणार नाही, हे जाणून तशी आंदोलने युरोप- अमेरिकेत सुरु झाली आहेत. मानवी प्रतिष्टेचा आदर राखण्याचे शहाणपण त्यांनीच आपल्याला शिकविले पाहिजे, असे नाही. मात्र त्या प्रतिष्ठेची आम्हालाही चाड आहे, हे भारतीयांना सिद्ध करावे लागेल. तो सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे, अर्थक्रांतीने सांगितलेला बँक व्यवहार कर. देशाचे आणि पर्यायाने भारतीयांचे शुद्धीकरण करणारा तो मार्ग आपण समजून घेवू यात.

Saturday, February 4, 2012

जग आजच एका आवाजात का बोलते आहे ?


आज जे व्हायलाच पाहिजे, ते नुसते बोलले जाते आहे आणि व्यवहारात बरोबर त्याच्या विरूद्ध गोष्टींचा जोर आहे. मात्र फार उशीर होण्याआधी सर्वांनाच जगासमोरील प्रश्नांबाबत प्रामाणिक व्हावे लागणार आहे. कारण सारे जग अशा जहाजात बसले आहे, जे बुडण्याच्या बेतात आहे. ते बुडायला सुरवात झाल्यावर गरीब आणि असंघटितांच्या नाकातोंडात आधी पाणी जाणार आहे, मात्र मधल्या भागात बसलेला मध्यमवर्ग आणि डेकवर आराम करत असलेला श्रीमंत वर्गही बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. त्यांना वाचायचे असेल तर त्यांना जहाजच वाचवावे लागणार आहे.

अख्खे जग आता कसे एका आवाजात बोलायला लागले आहे, याची प्रचिती 42 व्या जागतिक आर्थिक परिषदेत(World Economic Forum) आली. जगापुढील सध्याच्या प्रश्नांवर उपाय सुचविणारी आणि भविष्यातील जग कसे असावे, याचा विचार करण्यासाठीची देवोस (स्वित्झर्लंड) आर्थिक परिषद गेल्या आठवड्यात 29 जानेवारीला संपली. तरूणांसाठी रोजगारनिर्मिती हाच सरकार आणि उद्योगांपुढील अजेंडा असला पाहिजे, असा संदेश या परिषदेने दिला. जगातल्या दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या (121 कोटी) असलेल्या भारतात उदारीकरण आणि किमान 7 टक्के इतक्या चांगल्या विकासादरानंतरही रोजगार पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाहीत, हे लक्षात आले आहे. महासत्ता अमेरिकेला गेल्या सहा महिन्यात बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर उतरल्याने हायसे वाटले आहे. स्पेनसारख्या काही युरोपीय देशांमध्ये तर बेरोजगारीचा दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानसारख्या देशांमध्ये बेरोजगार युवकांची अतिरेकी गटांमध्ये भरती सुरूच आहे. अरब देशांत गेल्या वर्षी झालेल्या उठावांमध्ये तरूण आघाडीवर होते. या सर्व अस्वस्थतेचा जगावर नकारात्मक परिणाम होतो आहे, यावर परिषदेने शिक्कामोर्तब केले.

देवोस परिषदेमध्ये भाग घेणारे 2600 जण हे जगातील जाणकार, विचारी असतात. त्यांच्यावर सरकारचा दबाव नसतो. अतिशय गांभीर्याने जगाच्या प्रश्नावर चर्चा होतात. अशा 260 चर्चा त्या पाच दिवसात होतात. काही देशांचे पहिल्या आणि दुसर्‍या फळीचे नेते परिषदेला आवर्जून उपस्थित असतात. हे सर्व लक्षात घेता या परिषदेचे महत्व लक्षात यावे. हे लोक काय बोलतात, याचे म्हणूनच जगाला कुतूहल असते. गेल्या दोन-तीन दशकात जग ज्या वेगाने बदलले आहे, त्याची दखल ही परिषद दरवर्षीच घेते, मात्र यावर्षी युरोपमधील पेचप्रसंग आणि जगात सुरू असलेल्या नव्या आर्थिक व्यवस्थेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जग एका आवाजात बदलाची भाषा बोलायला लागले, हे महत्वाचे. एका देशाला नव्हे, जगाला एकत्रित काही ठरवावे लागेल, यालाही या परिषदेने पुष्टी दिली. पारंपरिक भांडवलशाही 400 वर्षे जुनी झाली असून तिलाही आता बदलावे लागणार आहे, हाही संदेश परिषदेने दिला आहे. अमेरिका, युरोपमध्ये भांडवलशाही फसल्याची सध्या इतकी चर्चा सुरू आहे की तिच्या भवितव्यावर चर्चा करणे परिषदेला अपरिहार्य ठरले. जगातील एक प्रमुख साप्ताहिक टाईम ने तर हाऊ टू सेव्ह कॅपॅटिलिझम, असा विशेषांकच प्रसिद्ध केला. एवढेच नव्हे तर विविध विचारांच्या विचारवंतांना एकत्र करून त्यांना सध्याच्या भांडवलशाहीवर बोलायला सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर देवोस परिषदेत काय बोलले गेले, ते पाहिले पाहिजे.

परिषदेचा सारांश म्हणून व्यक्त केलेली काही विधाने अशीः 1. आता जगाला अशा विकासाची गरज आहे, ज्यात तरूणांच्या हातांना काम मिळेल. 2. जगातील 200 दशलक्ष लोक सतत कामाच्या शोधात असतात, हे स्वीकारार्ह नाही. 3. जगात सर्वत्र टोकाची विषमता वाढत चालली आहे, जी जगाच्या अजिबात हिताची नाही. 4. शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे. 5. जगासाठी एकत्र काम करण्याची नवी पद्धत आपण शोधून काढली पाहिजे. 6. जगाची आजची परिस्थिती बदलण्यासाठी आता चर्चांचे रूपांतर बदलात, क्रियाशीलतेत व्हायला हवे.

7. समाजाच्या गरजांच्या दृष्टीने भांडवलशाहीला अधिक जबाबदार बनविण्याची गरज आहे.

8. जगातील उद्योगधंद्यांनी समाजाचा विचार केला नाहीतर ते शाश्वत नाहीत, त्यांना सतत नवनवे प्रश्न भेडसावतील. 9. आपल्याला कशा प्रकारचे जग पाहिजे, हे आधी ठरवून पुढे जावे लागणार आहे, त्यामुळे आता व्हीजन ची गरज आहे. ती नसेल तर आपण संपू 10. युरोपमधील बँका अजूनही संकटातून बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला नव्या मॉडेलचाच विचार करावा लागेल. 11. जगासमोर निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगातून एकही देश नामानिराळा राहू शकत नाही. 12. शिक्षण आणि रोजगारसंधीबाबत समन्यायी व्यवस्थेची गरज आहे. विषमतेमुळे समानसंधीचा अधिकार डावलला जातो आहे. 13. उद्योगधंद्यांची जी नवी मॉडेल विकसित होत आहेत, त्यात सामाजिक मूल्यांचा विचार होण्याची गरज आहे. 14. स्वच्छ आणि शाश्वत उर्जेची जगाला गरज असून विकासाचा दर आणि सर्वांच्या गरजेचा विचार करूनच त्यासंबंधीची धोरणे आखली गेली पाहिजेत. 15. 2050 मध्ये जगाची लोकसंख्या 9 अब्जाच्या घरात असेल, मात्र जग या सर्वांना अन्न पुरविण्यात सक्षम असेल.

परिषदेतील या विधानांवरून जगात नेमके काय चालले आहे, हे लक्षात येते. आज जे व्हायलाच पाहिजे, ते नुसते बोलले जाते आहे आणि व्यवहारात बरोबर त्याच्या विरूद्ध गोष्टींचा जोर आहे. मात्र फार उशीर होण्याआधी सर्वांनाच जगासमोरील प्रश्नांबाबत प्रामाणिक व्हावे लागणार आहे. कारण सारे जग अशा जहाजात बसले आहे, जे बुडण्याच्या बेतात आहे. ते बुडायला सुरवात झाल्यावर गरीब आणि असंघटितांच्या नाकातोंडात आधी पाणी जाणार आहे, मात्र मधल्या भागात बसलेला मध्यमवर्ग आणि डेकवर आराम करत असलेला श्रीमंत वर्गही बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. त्यांना वाचायचे असेल तर त्यांना जहाजच वाचवावे लागणार आहे.

तर जग बदलू शकते !

देवोस परिषदेला जगातील एक सर्वाधिक श्रीमंत बिल गेटस उपस्थित होते. त्यांच्या फाउंडेशनने एड्स, क्षय आणि मलेरियाशी लढण्यासाठी आणखी 750 दशलक्ष डॉलरच्या मदतीची घोषणा केली. जगासमोरील आर्थिक प्रश्न जटिल झाले आहेत, पण म्हणून गरीबांसाठीच्या मदतीत कपात करता कामा नये, असे ते म्हणाले. बिल गेटस यांनी गरीबांसाठी मोठी मदत आतापर्यंत केली आहे, त्या मदतीचा आदर राखून गरीबीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, त्याकडे अशा श्रीमंतांचे लक्ष वेधण्याची खरी गरज आहे. अतिरेकी नफेखोरी न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला तरी जग बदलू शकते.