Friday, April 23, 2010

जखमेवर मीठ चोळणा-या ‘सर्कशी’

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या तसेच आर्थिक असमानतेचे टोक गाठलेल्या देशासाठी अर्थक्रांती ही नवी संकल्पना सुचवूनही आता एक दशक उलटून गेले. औरंगाबादचे एक उद्दोजक श्री. अनिल बोकील यांनी ही संकल्पना मांडली आहे. म्हटले तर ती अतिशय साधी आहे. सध्या सर्व नागरिक प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ३३ प्रकारचे कर भरतात, त्याएवजी दोनच प्रकारचे कर भरतील. त्यातला एक सीमाशुल्क आणि दुसरा ‘व्यवहार कर’. साधारण २००० किंवा ५००० रूपयांवरील रोखीचे व्यवहार होणार नाहीत, असा कायदा करण्यात येईल. एक हजार आणि पाचशेसारख्या मोठ्या नोटांची व्यवहारात मग गरज राहणार नाही, त्यामुळे त्या रद्द करण्यात येतील. थोडक्यात बँकेमार्फत आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येईल. व्यवहारकराद्वारे जमा होणा-या निधीचे वाटप केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येईल, अशी ही संकल्पना आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून अनेक उच्चपदस्थांनी या संकल्पनेची वाहवा करून झाली, मात्र प्रत्यक्षात त्यासंदर्भात ठोस काही होताना दिसत नाही. या संकल्पनेची आठवण या महिन्यात फार तीव्रतेने झाली.

त्याचे एक प्रमुख कारण आयपीएल नावाची सर्कस. या सर्कशीवर भारतवाशी १५ हजार कोटी रूपये उधळतो, या प्रकारची जी भयानक आकडेवारी समोर आली आहे आणि त्यानंतर प्राप्तिकर खात्याचे जे छापासत्र सुरू आहे, ते होय. घरी खायला दाणे नसलेल्या माणसाने नशा करून झिंगण्यासारखे हे आहे. संपत्ती- पैशाचा हा जो उतमात चालला आहे, ते व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावामुळे आपण रोखू तर शकत नाही, मात्र ज्या भ्रस्ट व्यवस्थेने हे घबाड त्यांच्या हातात दिले आहे, ती व्यवस्था तर दुरूस्त करू शकतो. त्या दुरूस्तीचा तर्कसंगत मार्ग शोधायचा झाल्यास आपल्याला अर्थक्रांती संकल्पनेची आठवण ठेवावीच लागते.

श्री. अनिल बोकील यांनी दिलेले एक चांगले उदाहरण मला आठवते. त्यांच्या मोलकरणीने आगाउ पैसे मागितल्यावर त्यांनी दोन वेळा हातउसणे पैसे दिले आणि तिस-या वेळी मात्र तिचा पगार बँकेतून करायला सुरूवात केली. दोन वर्षांनंतर जेव्हा तिला मोठ्या कर्जाची गरज पडली तेव्हा ते तिला जामिनदार राहिले शिवाय बँकेतून पगार केल्यामुळे तिची पत तयार झाली आणि त्या प्रमाणात बँकेने तिला कर्ज मंजूर केले. बँकव्यवहार वाढल्यामुळे एका सामान्य नागरिकाच्या आयुष्यात झालेला हा क्रांतिकारी बदल ठरला. सांगण्याचा मुद्दा हा की १२० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला अशा बदलांची गरज


आहे. ते होत नाहीत म्हणून आयपीएल आणि त्यासारख्या शेकडो सर्कशी सामान्य माणसाच्या जखमेवर दररोज मीठ चोळत आहेत.

सरकारने अनेक उपाय योजूनही नक्षलवादी चळवळीला मिळणारा स्थानिक नागरिकांचा पाठिंबा कमी होताना दिसत नाही, यातच सर्व काही आले. नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागात कवडीमोल जीवन जगणा-या नागरिकांना हा देश आणि ही व्यवस्था आपली वाटेनाशी झाली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात असे कोणाला वाटले असते तर ते समजण्यासारखे होते. मात्र ६० वर्षांनी लाखो लोकांच्या मनात तीच भावना राहते, याच्या कारणांचा विचार करावाच लागणार आहे. जेव्हा एक व्यवस्था म्हणून काही नवी रचना करावी लागेल, त्यावेळी अर्थक्रांतीची संकल्पना मान्यच करावी लागते. वाईट याचे वाटते की इकडे आयपीएलसारख्या सर्कशी आणि दुसरीकडे व्यवस्थेने नाकारलेल्यांची संख्या वाढतेच आहे.

ही दरी दैनंदिन व्यवहारात कशी काम करते आहे, याचे एक उदाहरण येथे दिले पाहिजे. आपण शहरातला एखादा गजबजलेला रस्ता नजरेसमोर आणू यात. आपल्याला असे दिसते की भारीतली भारी कार, बस, रिक्षा, दुचाकी, सायकल, हातगाडी आणि पादचारी त्याच रस्यावरून जात असतात. साहजिकच प्रत्येकाची गती वेगळी आहे. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. थोडक्यात एकाच रस्यावरून २०-२५ प्रकारची वाहने चालली आहेत आणि आपल्याला त्या रस्त्यावर शिस्तबध्द वाहतूक हवी आहे... मग ती आणण्यासाठी त्यातले जे गरीब आहेत त्यांना त्या रस्त्याबाहेर काढण्याचा मार्ग आपण निवडला आहे. ज्याच्याकडे अतिशय मर्यादित साधने आहेत, त्यांना या शिस्तीचा जाच होतो आहे, पण त्याच्याशी सरकारला काही देणेघेणे नाही. मग तो नियम तोडायला लागतो, त्यालाच आपण बेशिस्त म्हणतो. पण ज्यांनी आर्थिक शिस्त तोडली आहे, त्यांनी ती तोडल्याबद्दल शिक्षा होतेच, असे नाही. आयपीएलच्या बोलींचे आकडे पाहिल्यावर ही विसंगती कोणाच्याही लक्षात येईल. कमी काळात इतका प्रचंड पैसा कोणाकडे कसा येउ शकतो, यासाठी संशोधनाची गरज नाही.

चांगले जगणे आणि हौसमौज सर्वांनाच हवी आहे, त्यात बाधा आणण्याची कोणाची इच्छा नाही आणि तसे ते बरोबरही नाही. मात्र एका देशाचे नागरिक म्हणून नाते निर्माण व्हायचे असेल तर प्रत्यक्ष नवनिर्मिती करणा-यांच्या वाट्याला येत असलेली अवहेलना रोखायलाच हवी.शेतीत धान्य पिकविणारा शेतकरी, शरीरकष्टाची कामे करणारा मजूर यांच्या वाट्याला आज जे जिणे आले आहे, त्याकडे पाहता ही चांगली व्यवस्था आहे, असे
म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. कोट्यवधी रूपयांची माया जमविणा-या बहुतेकांनी ती किती भ्रष्ट मार्गांनी जमविलेली असते, हे एखाद्या प्रकरणाने जगासमोर येते. त्यामुळेच आयपीएलकडे त्या नजरेने पाहिले जाते आहे, हे आश्चर्य नव्हे.


जगात गरीब देश आणि श्रीमंत देश असा भेद आता राहिला नाही, आता गरीब देशातले श्रीमंत आणि श्रीमंत देशातील श्रीमंत एकीकडे आणि गरीब देशातले गरीब आणि श्रीमंत देशातले गरीब – अशी जगाची फाळणी झाली आहे, असे जे म्हटले जाते, त्याचीच प्रचिती येवू लागली आहे. ही दरी कमी करण्याची जबाबदारी अर्थातच पहिल्या जगाची आहे. कारण त्यांना चांगले जगायचे असेल तर इतरांनाही जगू देण्याचे औदार्य त्यांना अंगी बाणावेच लागेल. नाहीतर जवान स्फोटांमध्ये मरत आहेत, स्टेडियमच्या शेजारी स्फोटके सापडत आहेत आणि रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे, ही सर्व परिस्थिती या वाढत्या दरीनेच निर्माण केली आहे. ती आटोक्यात न आणल्यास सर्वांनाच जीव वाचवत वाचवत जगावे लागणार आहे.

यमाजी मालकर , ymalkar@gmail.com

Thursday, April 15, 2010

वेग हा जुलमी गडे !

गेल्या दोन तीन दशकांत जग जितक्या वेगाने बदलले, तितके ते पुर्वीच्या शंभर वर्षांत बदलले नाही, असे म्हणण्याची पध्दत आहे. खरे म्हणजे जग म्हणजे जगातला माणूस काळानुसार बदलतच येथपर्यंत पोहचला आहे. एक मात्र खरे की जगाचा वेग या दोन तीन दशकात प्रचंड वाढला आहे. पुर्वीही जगाला वेग होताच मात्र तो असा माणसाच्या नसानसांत भिनला नव्हता. या वाढत्या वेगाचे परिणाम शहरात दिसतात तसेच ते ग्रामीण भागातही दिसायला लागले आहेत.
वाढत्या वेगाचे परिणाम प्रवासात अधिक दिसतात. लोकलने प्रवास करणारे मुंबईकर त्याचा दररोजच अनुभव घेत आहेत. मात्र माझ्यासारख्या मुंबईबाहेरच्या माणसाला याचे फार कुतुहल वाटते. उदा. लोकलमधील सुरवातीच्या डब्यांमध्ये बसायचे की शेवटच्या, हे ठरते ते लोकलमधून उतरल्यावर कोठे जायचे आहे, त्यावर. म्हणजे दादरा चढायला लागू नये, किंवा पायी चालण्यात वेळ जावू नये, हा विचार लोकलमध्ये बसतानाचा करायचा, हे अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. नाहीतर बाहेरून आलेला माणूस आपल्याला गाडीत प्रवेश मिळाला, यातच समाधान मानतो. परवा मुंबईत जे पाहिलं, ते स्टेशनांवरचं नेहमीचं दृश्य आहे, त्याचंही मला कुतुहल वाटलं. दोन मिनिटे आधी निघणारी गाडी आली म्हणून उभ्या गाडीतील माणसं पटापटा त्या आधी जाणा-या गाडीत जावून बसली ! या दोन मिनिटांना पुर्वी आपल्या आयुष्यात हे स्थान नव्हते.
ग्रामीण भागातीलही मानसिकता वेगामुळे कशी बदलत चालली आहे, याची शेकडो उदाहरणे आता पाहायला मिळत आहेत. तेथील स्थानकांवरही असे प्रसंग दिसत आहेत.गावांत ‘काळ्यापिवळ्या’ जीपने सर्रास प्रवासी वाहतूक चालते. तेथे आपली गाडी आधी भरावी यासाठी तिचे इंजिन चालू ठेवले जाते. परवा तर पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर हे दृश्य मी पाहिले. बस कोल्हापूरकडे जाणार होती आणि त्या दिशेने जाणा-या चार तरी बस उभ्या होत्या. प्रवासी मात्र एकाच गाडीत बसत होते, ज्या गाडीचे इंजिन चालकाने चालू करून ठेवले होते ! ‘चलतीका नाम गाडी’. जी गाडी लगेच निघणार तीच गाडी सर्वांना हवी होती.
आता बस पाहिली जाते ती ‘ मेगा हायवे’वरून जाणारी. जी बस हायवे सोडून खाली उतरते, ती कोणालाच नको आहे. त्यामुळे ही ‘ मेगा हायवे’ ही अक्षरे गाड्यांच्या पाट्यांवर ठळक अक्षरात विराजमान झाली आहेत. तब्बल ३०० किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये काम संपवून परत घरी मुक्कामी येणा-यांची संख्या वाढत चालली आहे. पुर्वी वर्दळीच्या मार्गांवर चार- पाच किलोमीटरवर धाब्यांसमोर गाड्या उभ्या दिसायच्या. आता नुसतेच धाबे दिसतात. तेथे थांबणा-या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्याचेही कारण वाढता वेग हेच आहे. वेग वाढण्यासाठीच रस्ते चांगले झाले आणि त्याचा पुरेपूर वापर प्रत्येकाला करायचा आहे. मेगा हायवेला अडथळा होउ नये म्हणून गाव आले की प्रचंड उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हायवेवरील त्या गावाची ओळखच पुसली जाणार आहे. मात्र जीवनाच्या वाढत्या वेगात ते अपरिहार्य ठरले आहे.
या वेगाचा आणखी एक फार खोल परिणाम ग्रामीण भागात होतो आहे. महामार्गावरील गावे वाढत चालली आहेत. मूळ गाव जर महामार्गापासून आत असेल तर महामार्गाच्या कडेने वस्ती वाढत चालली आहे. महामार्गाच्या ‘वाटेने’ सोयीसुविधा येतात आणि ‘आत’ असलेल्या गावात त्या पोहचायला वेळ लागतो, त्यामुळे हायवेच्या आजूबाजूच्या जागा भरत चालल्या आहेत.
या वाढत्या वेगात वंगण ओतले ते मोबाईलने. मी निघालो, मी निम्म्या रस्त्यावर पोहचलो, आता गाडीतून उतरलो, आता रिक्षा मिळाली, आणि हे काय .. मी आपल्या घराच्या दारातच आहे, अशी जणू येण्याजाण्याची कॉमेंट्री करण्याची सुविधाच या यंत्राने दिली आहे. पत्रव्यवहाराची जागाही मोबाईलने घेतली. येण्याजाण्याची कॉमेंट्री केली जाते तेथे सुखदुःखाच्या गोष्टींसाठी आता प्रत्यक्ष भेटण्याची वाट कोण कशाला पाहील ?
संवाद साधण्यासाठी, निरोप देण्यासाठी जो कालावधी लागत होता, तोच संपुष्टात आला आहे. हे चांगले की वाईट हे ठरविण्याला किंवा त्याची चर्चा करायलाही आता मानवी समूहांना वेळ नाही. कारण या बदलांमध्ये आणि वेगात प्रत्येकजण ओढला जातो आहे.
कधीकधी वाटते, वेग म्हणजे जणू जागा पटकावण्याची स्पर्धा आहे. ज्याने वेग वाढविला त्याने जागा पटकावली. अर्थात हे तत्व तर पुर्वीपासूनच आहे. मात्र गेल्या अर्धशतकात जागा पटकावण्याचा हा वेग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये जसे ज्यांना जागा मिळत नाही , त्यातले काहीजण दोन बाकांच्या मध्ये जाउन उभे राहतात., म्हणजे कोणी सहप्रवासी आधी उठला तर ती जागा आपल्याला मिळावी.आणि उभे राहण्याची ही जागाही वेगानेच मिळवावी लागते.
जगातले खरे बदल हे विज्ञान, यंत्र आणि तंत्रातले बदल आहेत. ते आधी होतात आणि माणूस त्यानुसार बदलतो, असे म्हटले जाते. आणि जे खरेच आहे, याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. पण या बदलांनी माणूस इतका वेगवान करून टाकला आहे की तो वेग हेच जणू जगणे आहे, असा एक भ्रम तयार होतो आहे. या वेगाने आणखी एक ‘देणगी’आपल्याला दिली आहे, ती म्हणजे गतिमान अस्थैर्याची. म्हणजे खूप काही घडते आहे आणि त्या घडण्याचे अस्तित्व किती काळासाठी आहे, हे कोणालाच सांगता येत नाही. स्थैर्यासाठी सुरू झालेला प्रवास संपल्यासारखा वाटतो, पण घडीभरच. लगेच दूरचे क्षितीज दिसायला लागते, माणसे त्यादिशेने झेपावतात, आणि मग प्रवासाचे टप्पे मोजायला सुरवात करणा-यालाही शांत बसवत नाही. त्यालाही त्या स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. वाढत्या वेगाने हे जे गतिमान अस्थैर्य दिले आहे, त्याच्याविषयी जगातील माणसांनी कधीतरी एकमेकांशी बोलले पाहिजे. हितगुज केले पाहिजे.. पण हा ‘कधीतरी’ नावाचा काळ वर्तमानात कधी येणार आहे, हे कोण सांगू शकणार आहे ?

यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Friday, April 2, 2010

गाव का झिजते आहे ?

जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत भारत आणि इंडिया अशी आपल्या देशाची फाळणी झाली, याविषयी आता कोणाचे दुमत राहिलेले नाही.या फाळणीविषयी चिंता व्यक्त केली जात नाही, असा एकही दिवस जात नाही. देशातील संपत्तीत या दोन दशकांत किती वाढ झाली, असाच विचार केला तर आपला देश खूप श्रीमंत झाला आहे, मात्र त्या संपत्तीच्या वितरणाचा विचार केला तर ही फाळणी किती भयंकर आहे, हे लक्षात येते. शहरातले चित्र कळायला तुलनेने सोपे आहे, मात्र ग्रामीण भागात नेमके काय घडते आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळेच ‘गांव झिजते आहे’ हे अंबाजोगाईत राहणा-या डॉ. द्वारकादास लोहिया यांचे पुस्तक मला महत्वाचे वाटले. (प्रकाशक- सतिश आणि छाया काकडे, आशिव, ता. औसा, जि.लातूर) जागतिकीकरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके काय होते आहे आणि काय व्हायला हवे, हे समजून घ्यायचे असेल तर त्या परिसरात राहून आपली निरीक्षणे नोंदवणारांची संख्या वाढली पाहिजे.

डॉ. द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या पत्नी डॉ.शैला लोहिया हे दाम्पत्य ‘मानवलोक’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली २७ वर्षे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई भागात काम करतात.या अनुभवाची जोड या निरीक्षणांना मिळाली असल्याने या पुस्तकाचे मोल अधिक आहे.गावांची स्थिती विशेषतः अर्थव्यवस्था कशी खंगत चालली आहे, हे तर डॉ. लोहियांनी विशद केले आहेच, पण हे थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे, हेही मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच तुलनेने श्रीमंत राज्यात पुण्यामुंबईबाहेर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणा-यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.

महात्मा गांधी खेड्याकडे चला असे का म्हणत होते आणि ग्रामस्वराज्याच्या त्यांच्या कल्पनांमध्ये काही बदल करून पण आज त्याच कशा महत्वाच्या आहेत, हे कळायला या पुस्तकामुळे मदत होते. जागतिकीकरणाच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात या कल्पना प्रत्यक्षात किती उतरतील, हे प्रश्नचिन्ह या दशकातही कायम राहील, मात्र हे बदलले पाहिजे, असे मानणारे धुरीण सत्तेवर आल्यावर त्यांना याच कल्पनांचा विस्तार करावा लागणार आहे, हे निश्चित.

‘गाव झिजत आहे’ या पुस्तकातील काही कल्पना अशा आहेतः सरकारी कर्मचारी गावातच राहण्यासाठी त्यांना गावात स्वस्त घरे देण्याची व्यवस्था करावी. महिलांच्या बचत गटाचा विस्तार होउन त्यातून त्यांच्याच पतसंस्थांची निर्मिती झाली पाहिजे. शेती हा व्यवसाय किंवा उद्योग आहे, हे लक्षात घेवून त्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा आधिकार असला पाहिजे. जल, जंगल आणि जमीन यावर समस्त गावक-यांची मालकी असली पाहिजे. गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे, यासाठी गावातले व्यवहार वाढले पाहिजेत. याचा अर्थ ग्रामीण जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज डॉ. लोहिया व्यक्त करत आहेत.

पुस्तकात २१ प्रकरणे आहेत. त्यांची नावे जरी पाहिली तरी आपल्याला त्या विषयांच्या महत्वाची कल्पना येते. उदा. गावातला नोकर गावात, गुळाचे गु-हाळ तसे साखरेचे साखराळ, एक कुटुंब- एक उत्पन्नाचे साधन, बोअरचे पाणी पिण्यासाठी- पावसाचे पाणी शेतीसाठी, तर आत्महत्या थांबतील, यंत्रे आली- जनावरे कमी झाली,गावचा धर्म –शेजार धर्म , नारी के सहयोग बिना हर गाव सुना है.. ,गावकुसातील संसाधनांची चोरी, महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ.

गाव का झिजत आहेत, याचे खूप चांगले विश्लेषण या पुस्तकात आले आहे. त्यातल्या काही नव्या गोष्टी अशाः ‘महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ’ या प्रकरणात नोकरदाराची पगारवाढ आणि शेतीमालाची थेट तुलना करून ही तफावत लक्षात आणून दिली आहे. यात एका ठिकाणी म्हटले आहे, ‘ कच्चा माल तयार करणारा आणि पक्का माल तयार करणारा यांच्या उत्पन्नातील तफावत मला दिसते आहे. ही तफावतदेखील शेतक-याच्या आत्महत्यांना कारणीभूत होते आहे.म्हणून शेतक-यांच्या उन्नतीसाठी आणि समृध्दीसाठी महागाईचा निर्देशांक काढण्याची पध्दत बदलावी लागेल.’ दुसरी एक गोष्ट अशी आहेः ‘ साखर विक्रीची पध्दत बदलली पाहिजे. ती पध्दत पिठाच्या गिरणीसारखी असावी.पिठाच्या गिरणीत ग्राहक ज्वारी किंवा गहू घेवून जातो.गिरणीमालक त्याचे दळण दळून पीठ तयार करून देतो. त्याला दळणाचे पैसे दिले जातात. साखरेचा कारखाना ही पिठाची गिरणी समजावी. साखरेच्या उता-याप्रमाणे त्याने घातलेल्या उसाच्या मोबदल्यात त्याला साखर मिळावी.’

डॉ. लोहिया जे म्हणतात ते लगेच पटते आणि मग आपण विचार करतो खरोखरच असे बदल आता आपल्या देशात होतील? जागतिकीकरणाने ‘अपमार्केट’कडे जाणारी मानसिकता घडवली आहे. ती मानसिकता सांगते, शहरात चला. ती सांगते आता ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, हेच तत्व बरोबर आहे. मुलांचे चांगले शिक्षण शहरांतच होते, शेजारधर्माने नव्हे तर स्पर्धेने प्रश्न सुटतात. हाताने होणा-या कामांपेक्षा यंत्रांनी होणारी कामे चांगली होतात. गावातल्या प्रश्नांपेक्षा महानगरांतले प्रश्न महत्वाचे आहेत कारण ते सोडविल्यामुळे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होतात. सरकारीपेक्षा खासगीकरण चांगले. सगळ्यांचे लक्ष असे ‘अपमार्केट’ कडे आहे. ‘अपमार्केट’ कडे पाठ फिरवून हे परिवर्तन घडविण्याची इच्छाशक्ती आपल्या समाजात दिसते आहे काय?

मग लक्षात येते की आजच्या मानसिकतेत या कल्पनांचा विचार करायला तयार होईल अशी परिस्थिती आज दिसत नाही. जागतिकीकरणाने गतिमान अस्थैर्याचा जो शाप आम्हाला दिला आहे, त्यामुळे आमचे विचारच गोठून गेले आहेत. आता आम्ही एकतर्फीच विचार करू शकतो. सर्वसमावेशक विचारांची शक्तीच आम्ही गमावली आहे. आम्ही आमच्या ‘अजेंड्या’वर इतकं प्रेम करायला लागलो आहोत की त्यामुळे दुस-यांचे गळे कापताना आमचे हात अडखळत नाहीत. उलट त्या गळेकापू स्पर्धेचे आम्ही समर्थन करतो. या परिस्थितीत डॉ. लोहिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे पाहिले तर मनात निराशा दाटून येते.पण त्या प्रश्नांकडे पाठ फिरवूनही आम्ही आनंदाने जगू शकत नाही. त्यामुळेच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. ती परिस्थिती समोर आणण्याचे काम डॉ. लोहिया यांनी चोख बजावले आहे. आता ‘भारता’सहच ‘इंडिया’ला पुढे जायचे आहे, असे ज्यांना ज्यांना वाटते , त्यांनी ही विसंगती दूर करण्यासाठी झटायचे आहे.