Tuesday, October 29, 2013

सर्वकल्याणार्थ अर्थभान



ही सृष्टी केवळ माणसांची नाही, ती पृथ्वीतलावरील सर्वांची आहे, याविषयी दुमत होऊ शकत नाही. मात्र स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या माणसाला अजून सर्व मानवजातीला आनंदाच्या कवेत घेणारी व्यवस्था उभी करता आलेली नाही. ती समन्यायी, पारदर्शी, निरपेक्ष व्यवस्थाच पृथ्वीतलाचे भविष्य घडवील. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा सण आहे, म्हणजे सर्वांचे कल्याण चिंतणारा सण आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आता अर्थभानाच्या मार्गाने जातो. ते अर्थभान या वर्षाने दिले आहे.

एखादा दीर्घ प्रवास संपता संपू नये आणि अचानक त्याचा समारोप जवळ आला, असे सांगणारी अशी एक ओळखीची खुण दिसावी. रात्रीचा दाटलेला अंधार खूप प्रतिक्षेनंतर विरळ व्हावा आणि पहाट फाकावी. हरवलेली महत्वाची वस्तू आता सापडत नाही, म्हणून शोधाचा नाद सोडून देता देताच ती वस्तू हाती लागावी. दाहक उन्हात तहान लागली असताना सर्व मृगजळाच्या मागे धावून अतिशीण झाला असताना निळ्याशार पाण्याने भरलेला तलाव दृष्टीपथात पडावा. माणसांच्या प्रदीर्घ वादाविवादाने कोणताच तोडगा समोर येत नाही, यामुळे जीव मेटाकुटीला आला असतानाच सर्वांना आपले हित कळावे आणि त्यांनी एकमताच्या दिशेने विचार सुरु करावा. असे आणि यासारखे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तसे ते राष्ट्र म्हणून जगणाऱ्या समूहांच्याही वाट्याला येतात, असा सुखद अनुभव २०१३ ची दिवाळी देते आहे. मित्रांनो, म्हणून ही दिवाळी खूप काही वेगळे घेऊन आली आहे.
दिवाळीचा सण गोड करायचा म्हणून गोडधोड खायचे, नवे कपडे घ्यायचे, लक्ष्मीच्या कृपेची प्रार्थना करायची आणि आला दिवस गोड मानायाचा, असे दिवस ‘काढत’ असताना आणि बाहेरच्या जगात अंधारच दाटून आला, असेच वाटत असताना पहाट झाल्याचा भास व्हावा, असे काय घडले, असे अनेकांना वाटेल. आणि ते बरोबरच आहे. मात्र गेले वर्षभर आपल्या आयुष्यात, कुटुंबात, गावात, राज्यात, देशात आणि जगात जे वेगळे घडते आहे, त्याची आठवण आज येथे करून देणार आहे. हे जे घडते आहे, ते सुरवातीस नकारात्मक वाटू शकते, जगाला संकटात टाकण्यासाठीच त्याचा जन्म झाला, असेही वाटू शकते. मात्र ते तसे नाही. जगात गेले वर्षभर जे घडते आहे, ते काहीतरी वेगळे आहे. जगाच्या उद्याच्या भविष्याला कलाटणी देण्याची ताकद या बदलात आहे.

हे वर्ष कशासाठी लक्षात राहील, हे आधी आपण पाहू म्हणजे मी असे का म्हणतो, हे लक्षात येईल. हे वर्ष शुभ आहे की अशुभ अशा चर्चेने सुरु झालेल्या २०१३ वर्षात आपण काय काय अनुभवत आहोत, ते पहा. जग मंदीत सापडले आणि या मंदीची तुलना १९३० च्या मंदीशी केली गेली. पण त्याचवेळी जग सुसाट वेगाने धावण्यास सज्ज होत असल्याच्या हाका मध्येच ऐकू यायला लागल्या. जगाचे आणि आपल्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या जनक्षोभानंतर सगळे काही बदलून जाणार, असे वाटत असतानाच येथे तर काहीच बदलत नाही, अशी निराशा पदरी घेऊन लोक आपापल्या कामाला लागले. आपला वाटा मागणाऱ्या तरुणांना जगाने अतिरेकी आणि नक्षलवादी अशी नावे दिली खरी, मात्र त्यांचा वाटा दिला नाही म्हणून हे घडते आहे, असे याच वर्षात उघडपणे बोलले गेले. आर्थिक महासत्ता मानल्या गेलेल्या अमेरिकेत एकमताअभावी सरकार ठप्प याच वर्षात झाले आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांची चर्चाही झाली. मॉस्कोच्या विमानतळावर १ हजार ६७५ अब्ज रुपये (युरो चलनात) पडून असलेल्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली आणि जगातला रोखीच्या व्यवहाराचा कर्करोग किती भयानक स्तराला पोचला, याचे गांभीर्य लक्षात आले. दुष्काळाने भूमी आणि माणसं होरपळून निघाली असतानाच अशी काही बरसात झाली की अनेक वर्षांत असा पाऊस पडला नाही, असे म्हणण्याची वेळ आली. निवडणुका हा जणू आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मानून दीड वर्ष आधीच निवडणुकीची नको इतकी चर्चा सुरु झाली. सोन्याच्या आयातीचा देशाला एवढा मोठा फटका बसला की देशाच्या अर्थकारणावर बोलताना सोन्याचा हिशोब टाळता येत नाही, हे लक्षात आले. आयात निर्यात व्यापारातील तूट वाढली आणि परकीय चलनाचा साठा घटल्याने रुपयाने एक मोठा हिंदोळा घेतला, ज्यात कोट्यवधी लोकांना आपला जीव मुठीत धरून सावरावा लागला. खरे तर माणसाच्या जगण्याच्या शर्यतीत अडथळा ठरावे, असेच हे सगळे. एक तर मान्य केलेच पाहिजे, की ‘अर्था’ची जेवढी चर्चा यावर्षी झाली, तेवढी कदाचित यापूर्वी कधीच झाली नसेल!

हे तर वर्षानुवर्षे असेच सुरु आहे, मग नेमके वेगळे काय घडले यावर्षी? वेगळे एवढेच पण फार महत्वाचे घडले ते म्हणजे निसर्ग साथ देतो आहे, शेती पिकते आहे, अन्नधान्य मुबलक आहे आणि पैसाही प्रचंड आहे, याची जाणीव तर झालीच पण आपल्या सुखदु:खामध्ये पैसा फार महत्वाची भूमिका बजावतो आहे. तो राजकारण, समाजकारणावर स्वार झाला आहे. त्यामुळे त्याला समजून घ्यावे लागेल आणि सर्वांना समान संधी आणि मानवी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मानवनिर्मित या पैशाच्या व्यवस्थेला आव्हान द्यावे लागेल, याची जाणीव यावर्षी वाढली. जगाची आणि जीवनातल्या यशापशायाची चर्चा आर्थिक नफ्यातोट्यात मोजली जावी, यासारखे दुर्दैव ते काय ? पण या जगाचे व्यवहार विचारसरणी, जात-धर्म, वर्ग आणि जिंदाबाद मुर्दाबादच्या पलीकडे जाऊन आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्या व्यवहारांत जे विष पेरले गेले आहे, ते काढण्यासाठी एका समुद्रमंथनात आपण भाग घेतला पाहिजे, असे मनामनांत रुजते आहे. एखाद्या बी ने जमिनीत गाडून घेतल्यावर एका क्षणी प्रचंड ताकदीने सूर्यकिरणांच्या दिशेने झेप घ्यावी, असे मंथन जगात सुरु झाले, याअर्थाने ही दिवाळी वेगळी आहे! ही सृष्टी केवळ माणसांची नाही, ती पृथ्वीतलावरील सर्वांची आहे, याविषयी दुमत होऊ शकत नाही. मात्र स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या माणसाला अजून सर्व मानवजातीला आनंदाच्या कवेत घेणारी व्यवस्था उभी करता आलेली नाही. ती समन्यायी, पारदर्शी, निरपेक्ष व्यवस्थाच पृथ्वीतलाचे भविष्य घडवील, हे भान या वर्तमानाने दिले, ही अतिशय आनंददायी गोष्ट घडली आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, म्हणजे सर्वांचे कल्याण चिंतणारा सण आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आता अर्थभानाच्या मार्गाने जातो. ते अर्थभान या वर्षाने दिले आहे.

अशा निर्जीव पैशाची आणि त्यावर उभ्या असलेल्या मानवी जीवनाच्या महाप्रचंड कॅनव्हासची कितीही चर्चा केली जाऊ शकते, मात्र ती करणे एका दमात शक्य नाही. ‘अर्थपूर्ण’ चा पुढील प्रवास त्यासाठीच तर आहे. आपल्या आयुष्याला भिडणाऱ्या त्यातील प्रमुख मुद्द्यांची चर्चा ‘अर्थपूर्ण’ च्या या अंकात मान्यवर लेखकांनी केली आहे. जग ज्या नव्या व्यवस्थेचा शोध घेते आहे, त्याविषयीचे आकलन वाढण्यास ही अर्थपूर्ण चर्चा प्रत्येक वाचकाच्या मनात साठून राहील, याची मला खात्री आहे. ही अर्थपूर्ण चर्चा ताकदीने घडवून आणणारे आमचे सर्व लेखक, ती सर्व आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हातभार लावणारे जाहिरातदार, वितरक, नवी व्यवस्था लवकर उभी राहावी, यासाठी आपापल्या परीने लढणारे अर्थक्रांती चळवळीतील कार्यकर्ते, अर्थपूर्ण अधिकाधिक वाचकांपर्यंत जावा यासाठी येणाऱ्या व्यवहारिक अडचणी समजून घेऊन स्वत: हून मदतीला येणारे हितचिंतक, हे काम नाही, भविष्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला ते करावेच लागणार आहे, आणि आपण ते करत आहोत, अशा समाधानाने आणि अभिमानाने त्यात सहभागी झालेले सहकारी आणि हा सर्व संवाद पूर्ण करणारे वाचक – या सर्वांना दिवाळीच्या अर्थपूर्ण शुभेच्छा !

अर्थपूर्ण दिवाळी २०१३ ची भूमिका...


Sunday, October 20, 2013

सोने तारी, सोने मारी, सोने नाना विकारी!




‘कॅड’ इतका महत्वाचा आहे की आपल्या देशात किती परकीय गुंतवणूक यावी, भारताची आर्थिक तब्येत कशी आहे, शेअर बाजार चढणार की पडणार, आपल्या उद्योग व्यवसाय आणि शेतीसाठी पतपुरवठा मिळणार की नाही, हे आणि बरेच काही तोच ठरवितो. त्या कॅडला सोन्याने एकदम ‘विकारी’ करून टाकले आहे. त्याची तब्येत सुधारत नाही, तोपर्यंत भारताची आर्थिक घडी बसू शकत नाही.




अन्न माणसाला जगवते, मात्र ते किती खावे हे कळले नाही, तर तेच माणसाला मारते आणि त्यातूनच अनेक विकार होतात, असे सांगणारी ‘अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी’ अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्यय आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात घेतच असतो. तसाच अनुभव आपला भारत देश सध्या घेतो आहे. सोन्याची किरकोळ निर्मिती करणारा हा देश एकेकाळी आणि आजही सुवर्णभूमी (सुमारे २० हजार टन सोने बाळगणारा) होता आणि आहे, हे म्हणण्याचा अभिमान बाळगायचा की त्याचे देशावर आणि पर्यायाने आपल्यावर होणाऱ्या परिणामांची लाज बाळगायची, हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. आकडेवारी असे सांगते की सोन्याने अनेक गुंतवणूकदारांना तारले असले तरी देशाला त्याने सपाटून मारले आहे आणि कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यात ज्या नकारघंटा वाजत आहेत, त्यातून सोन्याने या देशाला विकारी म्हणजे आजारी करून टाकले आहे.

जगाची अर्थव्यवस्था सुधारली की जनता तिच्यावर विश्वास टाकून गुंतवणुकीचे इतर मार्ग निवडते आणि त्यातून पतसंवर्धन किंवा क्रेडीट एक्स्पान्शन होते. जगात उद्योगांची भरभराट होते, रोजगार संधी वाढतात आणि जगणे सुकर होते. मात्र ती संकटात सापडली की जनता सोन्याची खरेदी सुरु करते. सोन्याचे वैयक्तिक साठे वाढत जातात आणि जो पैसा निर्मितीच्या कामी खर्च झाला पाहिजे, तो घराघरांच्या कोनाड्यात पडून राहतो. भविष्यात काही संकट आले तर सोने मोडण्याची पद्धत अशी भारतात शतकानुशतके सुरु आहे. याचा दुसरा अर्थ भारतीय जनतेने पूर्वीचे राजे आणि आजची सरकारे आणि बँका यावर कधीच विश्वास टाकलेला नाही तर! आयुष्यात काही गरज लागली तर सरकारी व्यवस्था, बँका आपल्याला मदत करतील, असे आजही सर्वसामान्य माणसाला वाटत नाही. गुंतवणुकीचा खात्रीचा मार्ग म्हणून तो सोन्याकडेच वळतो, ही आपल्या आजच्या व्यवस्थेची केवढी शोकांतिका आहे! वाईट याचे वाटते की सोने खरेदीची ही सामूहिक कृती आपण ज्या जहाजात बसलो आहोत, त्यालाच बुडवते आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी तो आज हतबल आहे.

सोने नावाच्या उपयोग म्हणून कुचकामी धातूने आपल्या देशाच्या संसारात केवढा गोंधळ घातला आहे, हे समजून तर घेऊ. सोने महाग व्हावे यासाठी गेल्या २० महिन्यात सरकारने चार वेळा आयातशुल्कात वाढ (मार्च १२ ला चार टक्के असलेला कर आज १५ टक्के झाला) केली तरीही सोन्याची मागणी कमी झालेली नाही. किंमत वाढल्यावर सोन्याचे आकर्षण कमी होईल, हे गृहीतक खरे ठरले नाही. रुपयातील चढउतार लक्षात घेता अर्थव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आणि पुन्हा सोन्याची मागणी वाढली. ‘वर्ड गोल्ड कौन्सिल’ च्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून या महिन्यात ग्राहकांनी ३१० टन म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक, बार आणि नाण्याच्या रुपात ११६ टक्के तर दागिन्यांच्या रुपात ५१ टक्के खरेदी केली! गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीने १५ ते २० टक्के परतावा दिला आहे. ज्यांनी २६ हजाराला एक तोळा या दराने सोने घेतले होते, त्यांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ३१ ते ३२ हजार रुपये भाव मिळाला. रुपया तेव्हा प्रतिडॉलर ६९ रुपयांवर घसरला होता. शहरी भारतीय आपली १० ते १५ टक्के गुंतवणूक तर ग्रामीण भागातील श्रीमंत ५० टक्के गुंतवणूक सोन्यात करतात, असे सोन्याच्या किंमतीचा अभ्यास करणाऱ्या संस्था सांगतात. आयात शुल्क वाढल्याने सोन्याच्या स्मगलिंगला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. अशा चोरट्या मार्गाने येणाऱ्या सोन्याचा हिशोब कसा करणार?

आयात निर्यात व्यापार, उत्पादन, सेवा आणि गुंतवणूक यांची तब्येत कशी आहे, याचा निकष म्हणजे भारताच्या चालू खात्यावरील तुटीचा आकडा. त्यालाच कॅड म्हणतात. एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपीच्या तुलनेत ही तुट आता ४.९ टक्क्यांवर पोचली आहे, हे गंभीर मानले जाते. गेल्या आर्थिक (२०१२-१३) वर्षात ही तुट ८८.२ अब्ज डॉलर (५४६८ अब्ज रुपये) झाली होती. यात सोन्याचा वाटा किती प्रचंड आहे, पहा. त्यातले ६० अब्ज डॉलर म्हणजे ३७२० अब्ज रुपये फक्त सोन्यासाठी मोजावे लागले. यावर्षी एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात सोन्याची आयात ७.४ अब्ज डॉलरवर (४५८ अब्ज रुपये) पोचली, ज्यामुळे सरकारने आयातशुल्क वाढविण्याचा धडाका लावला. कारण इतके प्रचंड सोने आयात झाले नसते तर तुट १४.५ अब्ज डॉलर (८९९ अब्ज रुपये) इतकी खाली आली असती आणि जीडीपीतील तुटीचे प्रमाण एकदम ३.२ टक्क्यांवर गेले असते, जे फारसे चिंताजनक मानले जात नाही. अलिकडे तुट कमी झाल्याचे जाहीर झाले आहे, मात्र सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारा गुंतवणूकीचा मार्ग दिल्याशिवाय हे समाधान टिकणार नाही.

हा ‘कॅड’ इतका महत्वाचा आहे की आपल्या देशात किती परकीय गुंतवणूक यावी, भारताची आर्थिक तब्येत कशी आहे, शेअर बाजार चढणार की पडणार, आपल्या उद्योग व्यवसाय आणि शेतीसाठी पतपुरवठा मिळणार की नाही, हे आणि बरेच काही तोच ठरवितो. त्या ‘कॅड’ला सोन्याने एकदम ‘विकारी’ करून टाकले आहे. त्याची तब्येत सुधारत नाही, तोपर्यंत भारताची आर्थिक घडी बसू शकत नाही.

(तात्पर्य – वैयक्तिक सुरक्षिततेसाठी सोने विकत घेत राहा. शक्य असेल तर तसे करणे टाळा आणि हे ज्यातून उद्भवले आहे, त्या काळ्या पैशाला मूठमाती देण्यासाठी सर्व क्षेत्रातील नेत्यांना, धर्मसंस्थांना आणि अर्थतज्ञाना आर्थिक प्रश्न विचारायला सुरवात करा.)


भारतासाठी सोने विकारी बनले कारण.....
- गेली काही वर्षे सोने सर्वाधिक आयात करणारा देश.
- भारतात २० हजारांपेक्षा अधिक टन सोने म्हणजे १ ट्रिलीयन डॉलर इतक्या किंमतीचे. (जगात एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था केवळ १२ असून त्यात भारताच्या समावेश व्हायला २००७ उजडावे लागले. यावरून १ ट्रिलीयन म्हणजे किती याची कल्पना यावी. एक ट्रिलीयन म्हणजे एकावर १२ शून्य.) याचा दुसरा अर्थ भारतासारख्या तगड्या पैलवानाला रोखणारा एक राक्षस आपणच तयार केला आहे.
- सोन्याच्या रूपाने संपत्ती पडून राहते, म्हणजे श्रमाच्या पैशांचे रुपांतर धातूत होते, जो नुसता पडून राहतो. त्यातून पुरेसा रोजगार आणि शुद्ध भांडवल तयार होत नाही, ज्यातून देशाची म्हणजे आपलीच कोंडी होते.

Friday, October 11, 2013

चला, सोने लुटायला मॉस्को विमानतळावर!



सगळ्यात महत्वाचे म्हणजे चलन हे केवळ व्यवहार करण्याचे माध्यम आहे. ते या हातातून त्या हातात, असे स्वच्छ हवेसारखे फिरलेच पाहिजे. ते म्हणजे मालकीची वस्तू नव्हे, हे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आधुनिक जग कमी दर्जाचे जीवन जगण्याचीच स्पर्धा खेळत बसणार, हे त्या रोखीत लोळणाऱ्या मूर्खांना आणि त्यांच्या पावलावर पाउल ठेवून जगणाऱ्या देशी मूर्खांना कळेल, ती खरी सोन्याची लुट !


भारतीय परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी सोने लुटले जाते. त्याच्या पारंपरिक कारणांत मी जाणार नाही. मात्र सोने ज्या आर्थिक सूरक्षिततेसाठी भारतीय गेले काही शतके घेत आहेत, ती आर्थिक सूरक्षितता मिळविण्याची एक नामी संधी आली आहे! बातमी अशी आहे की मॉस्कोच्या विमानतळावर ७ ऑगस्ट २००७ पासून म्हणजे गेली सहा वर्षे १६.७५ अब्ज ब्रिटीश पौंड किंमतीच्या पण १०० युरो नोटांच्या रुपात पडून आहेत. १६.७५ अब्ज ब्रिटीश पौंड म्हणजे १,६७५ अब्ज रुपये! ते गेली सहा वर्षे पडून आहेत. त्या नोटा आपल्या आहेत, असा दावा काही गटांनी आणि माणसांनी करून पाहिला मात्र त्यांना ते आपले आहे, हे सिद्ध करता आले नाही. त्या बातमीत पुढे असे म्हटले आहे की युरोपीय देशांची २०१३ ची अर्थसंकल्पीय तुट भरून निघेल, एवढी ही प्रचंड रक्कम आहे. किंवा ती रक्कम ज्याची असेल तो जगातल्या पहिल्या ५० श्रीमंत लोकांच्या रांगेत लगेच जाऊन बसेल! या नोटा बसमध्ये ठेवल्या तर पाच बस लागतील!

तो पैसा भारतीयांचा आहे, असा दावा करता येणार नाही, हे जेवढे खरे आहे तेवढेच हेही खरे आहे की तो भारतीयाचा सुद्धा असू शकतो, असाही दावा करता येतो. आज तरी सारेच गुलदस्त्यात आहे. म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर ते लुटण्याची एक नामी कल्पना येथे मांडली एवढेच. त्याची काही कारणे अशी:
१. ब्रिटीशांनी १५० वर्षे भारताची जी प्रचंड लुट केली त्याच लुटीतून युरोपात गेले ६० वर्षे प्रचंड संपत्ती निर्माण झाली. त्यामुळेच युरोपला असे प्रचंड चलन छापावे लागले. म्हणून त्या नोटांत भारतीय रक्त आणि घाम आहे, असा दावा केला तर त्यात चूक काय ?
२. भारतीय शेअरबाजार आणि अशा अनेक माध्यमांतून गेली काही वर्षे परकीय गुंतवणूकदार प्रचंड लुट करत आहेत. ती लुट फ्रांकफुर्ट, मॉस्कोमार्गे लंडन, न्यूयॉर्कमध्ये चालली नसेल कशावरून?
३. भारतीय माणसे रक्त आटवितात आणि सोने विकत घेतात किंवा गाड्या विकत घेतात. सोने आयातच करावे लागते तर गाड्या पेट्रोल, डिझेलवर चालतात. जे आयात करण्यासाठी प्रचंड परकीय चलन खर्च करावे लागते. या नोटा तेलाच्या व्यवहारातील आहेत, असा एक अंदाज आहे. म्हणजे तेल वापरणारा एक प्रमुख देश म्हणून भारत आहेच. म्हणजे पुन्हा आपलाच पैसा झाला की!
४. स्वीस बँकेतील पैसा भारतात आलाच पाहिजे, असे आंदोलन रामदेवबाबांनी केले होते. त्यावेळपासून आणि पूर्वीपासूनच किती भारतीय संपत्ती स्वीस बँकेत आहे, यावर आपले एकमत होऊ शकलेले नाही. तोच हा पैसा आहे, असे म्हटल्यास आपल्याला कोण रोखू शकतो?
५. भारतात १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार चालतात. त्यातील एखाद्या हवाला व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी हा पैसा युरोत रूपांतरित करण्यात आला, असे झाले नसेल कशावरून?

गंमतीचा भाग सोडा, पण अशाच रोखीच्या व्यवहारांचा अतिरेक होऊन साठीच्या दशकात अमेरिकन अर्थव्यवस्था अडचणीत सापडली होती. त्यांनतर तेथील १०० च्या वरील डॉलरच्या नोटा रद्द करण्यात आल्या आणि तेव्हापासून अमेरिकेत बँकिंग वाढले. अर्थव्यवस्थेला शिस्त आली. आता ब्रिटन अडचणीत सापडले असून २०१४ पासून कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने जाणे ब्रिटनला भाग पडले आहे.
ज्या भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा केला आहे आणि जो देश शुद्ध भांडवलाची याचना करतो आहे, त्या भारतात रोखीच्या व्यवहारांना उत आला आहे. रोखीच्या नोटांनी भरलेली आणि बनावट नोटांची पोती सापडत नाही, असा एक दिवस या देशात जात नाही. तिकडे बरे चालले, असा समज होता. मात्र नोटांच्या या बंडलांनी त्या देशांच्या व्यवस्थाही बंडल आहेत, असा संदेश दिला आहे. किमान त्या मूर्खांच्या नादी न लागता आपल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत, हे जरी योजनाकर्त्यांनी मान्य केले तरी मॉस्कोच्या नोटा पावल्या असे म्हणता येईल! सगळ्यात महत्वाचे म्हणजे चलन हे केवळ व्यवहार करण्याचे माध्यम आहे. ते या हातातून त्या हातात, असे स्वच्छ हवेसारखे फिरलेच पाहिजे. ते म्हणजे मालकीची वस्तू नव्हे, हे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आधुनिक जग कमी दर्जाचे जीवन जगण्याचीच स्पर्धा खेळत बसणार, हे त्या रोखीत लोळणाऱ्या मूर्खांना आणि त्यांच्या पावलावर पाउल ठेवून जगणाऱ्या देशी मूर्खांना कळेल, ती खरी सोन्याची लुट !


हे क्रूर सत्य तुम्ही पचवू शकता ? (या घटनेवरील काही संतप्त प्रतिक्रिया)




- नोटांच्या मालक सापडला नाही तर त्या पुतीनला देऊन टाका. ते गरीबांना वाटतील, म्हणजे त्यांना नोबेल पुरस्कार देणे आणखी शोभून दिसेल!
- मी त्यातील २० अब्ज घ्यायला तयार आहे, १०० युरोच्या नोटांच्या मोठमोठ्या सिगारेट होतील!
- अरे, हा पैसा इकडे कोठे गेला, मी तर माझ्या सोफ्याखाली शोधत होतो!
- अरे वेड्या नायजेरीयन राजपुत्रा, माझी संपत्ती मी हिथ्रो विमानतळावर पाठविण्यास सांगितले होते!
- आता उंदरांना बरेच दिवस पुरेल हे अन्न!
- मला खात्री आहे की आमचे कॉम्रेड आता त्याचे रुपांतर होडकात करतील!
- फारच वाईट.. आता आणखी काही रशियन गुंड इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतील!
- युरोपियन युनियनच्या एका वर्षाची तुट भरून काढणाऱ्या नोटा! एकाला किंवा अशा बऱ्याच जणांना फटके मारण्याची वेळ आली आहे!
- ओ हो.. त्या तर माझ्याच नोटा आहेत, बिझिनेस मिटिंग संपवून जाताना त्या मी ब्रीफकेसमध्ये टाकायच्या विसरलो. त्या आता मला परत द्याल का?
- मला पूर्ण सत्य माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की अमेरिकेच्या फेडरलने फायनान्ससियल सिस्टीममध्ये जेवढा पैसा ओतला त्या तुलनेत हे काहीच नाही. रशियाने एक मुदत जाहीर करावी आणि आपल्या तिजोरीत जमा करून घ्यावे! तुम्हाला सत्य पचविता येणार नाही!


Thursday, October 3, 2013

यापेक्षा अधिक काय लागते महासत्ता होण्यासाठी ?



(अर्थपूर्ण चे ऑक्टोबर महिन्याचे मुखपृष्ठ आणि भूमिका)

भारतीय माणसाच्या वृत्तीवर हजारो वर्षे बोलले जाते आहे तसे ते आज बोलले जाते आहे आणि भविष्यातही बोलले जाणार आहे. माणसाची वृत्ती सुधारण्याचा प्रवास असा निरंतर सुरूच राहणार आहे. बदल हवा असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने आता व्यवस्थेवर बोलले पाहिजे, हे मात्र फार कमी जणांच्या लक्षात येते आहे.ज्यांना भारतीय माणसांच्या वृत्तीवरच बोट ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी १० प्रश्न मी येथे मुद्दाम उपस्थित करत आहे.


‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर तरुण नेमके काय लिहितात आणि तरुणांच्या मनात आज काय दडले आहे, हे जाणून घेताना ऋजुता मिलिंद जोशी या स.प. महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे मनोगत वाचण्यात आले आणि तरुणांच्या मनात या देशाविषयी किती प्रचंड प्रेम आहे आणि त्यांना हा देश सुजलाम सुफलाम करण्याची किती दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, याची झलक पाहायला मिळाली. अगदी भावनिकच विचार करायचा तर तरुणांच्या मनातील हा निखळ प्रामाणिकपणा आनंद देवून जातो. वयाने मोठी झालेली माणसे देशाची जी चिंता करत असतात, ती आणि तरुणांच्या मनातील चिंता यात एक महत्वाचा फरक आहे. तो म्हणजे मोठ्या माणसांनी काय जगायचे ते जगून झाले आहे. त्यामुळे व्यवस्थेविषयी ते बोलतात तेव्हा त्यातील बहुतेक त्यातून स्वत:ला वगळून टाकतात. त्यांचे व्यवस्थेतील ‘स्टेक’ म्हटले तर कमी कमी होत चाललेले असतात. त्यामुळे बदल झाला पाहिजे, असे ते म्हणतात तेव्हा त्यात म्हणावा तेवढा जोर नसतो. बदल झालाच पाहिजे, असे ते म्हणत नाहीत. तरुण मात्र बदल झालाच पाहिजे, असे म्हणत आहेत, कारण त्यांचा आजच्या व्यवस्थेत १०० टक्के ‘स्टेक’ आहे आणि ते हे मान्य करत आहेत, हे आज सर्वाधिक महत्वाचे आहे.

ऋतुजा हिने तिच्या निबंधात मार्क ट्वीन यांच्या एका विचाराचा दाखला दिला आहे. ‘The Destiny may rules the life of human but the reality is The God confides the human to create his own Destiny’ असे ते वाक्य आहे. पण तिने पुढे जे म्हटले आहे ते जास्त महत्वाचे आहे. ती म्हणते, ‘ जर हे भाग्य हे माणसाच्या कष्टांवर, जिद्दीवर अवलंबून असेल, तर माझ्या देशाचे भाग्यही माझ्यासारख्याच सगळ्या भारतीयांच्या हातात आहे... आपल्याच हातात आहे. या आपल्या महान राष्ट्रात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघण्याइतकी बौद्धिक, आर्थिक आणि वैज्ञानिक संपन्नता आणणे, याच विचाराने माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आपल्या संपन्न, सुजलाम-सुफलाम्, महासत्ता बनलेल्या, प्रगतीशील, विकसित भारताचे सोनेरी स्वप्न!’

तरुणांची इतर मनोगतेही मग मी वाचून काढली. मला जाणवले की सर्वांनाच देश सुजलाम सुफलाम करायचा आहे. इतिहासात या देशात सोन्याचा धूर निघत होता, याचीही माहिती सर्वांना आहे. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देश २०२० मध्ये आपला देश महासत्ता होईल, असे स्वप्न दाखविले, याचाही मोठा परिणाम तरुणांवर झालेला आहे. आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भविष्यात देश कसा असावा, याविषयी फार कोणाचे दुमत नाही. जवळपास सर्वाना सारखेच वाटते आहे. फक्त एकच उणीव आहे. आणि ती फार महत्वाची आहे. ती म्हणजे हा देश सुजलाम सुफलाम, महासत्ता, संपन्न कसा होईल, याचा काही ठोस मार्ग कोणाकडेच नाही. ज्या मोजक्या तरुणांनी देश बदलण्याचे जे प्रस्ताव मांडले आहेत, ते एकतर भावनिक आहेत किंवा स्वप्नाळू आहेत. म्हणजे बहुतेकांनी भारतीयांना बदलण्याची भाषा वापरली आहे. त्यांना भारतीय माणूस कोठेतरी कमी पडतो आहे, असे सुचवायचे आहे. काही जण तर भारतीय माणसाच्या वृत्तीवरच तुटून पडले आहेत. भारतीय माणसाच्या वृत्तीवर हजारो वर्षे बोलले जाते आहे तसे ते आज बोलले जाते आहे आणि भविष्यातही बोलले जाणार आहे. माणसाची वृत्ती सुधारण्याचा प्रवास असा निरंतर सुरूच राहणार आहे. बदल हवा असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने आता व्यवस्थेवर बोलले पाहिजे, हे मात्र फार कमी जणांच्या लक्षात येते आहे.

ज्यांना भारतीय माणसांच्या वृत्तीवरच बोट ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी १० प्रश्न मी येथे मुद्दाम उपस्थित करत आहे. मला वाटते त्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर आज देशात आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव किती महत्वाचे आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही. १. ज्या देशात २२ हजार टन सोने पडून आहे, त्या देशाने इतर देशांकडे भांडवलाची भिक मागावी, हे आपणास योग्य वाटते का? २. संपत्ती आणि इतर आर्थिक निकष लावले तर आजच हा देश महासत्ता आहे, मग आपल्या व्यवस्थेतील विसंगती शोधून त्या दुरुस्त करणे, हा खरा मार्ग नव्हे काय ? ३ पुरेशी साधने आणि पायाभूतसुविधांच्या अभावी आमच्यात वितुष्ट निर्माण होते आहे, हे आपण समजून घेणार आहोत काय ? ४. आपल्याच देशातील समूह बदनाम करतांना आपण आपल्यालाच बदनाम करतो आहोत, हे आपल्या लक्षात आले आहे का ? ५. देशाच्या अर्थरचेनेत काळ्या पैशांचे प्रमाण आज पांढऱ्या पैशांपेक्षा अधिक झाल्याने सर्व समाजाची कोंडी झाली आहे, ती आपण समजून घेणार आहोत काय? ६. आपल्या देशातील आगामी निवडणूक भावनिक आव्हानांवर न होता ठोस मुद्द्यांवर व्हावी, असे आपल्याला वाटते का? ७. आपल्या व्यवस्थेत पैशीकरणामुळे प्रचंड लाचारी आणि मुजोरी वाढली आहे. मानवी प्रतिष्ठेची मानहानी करणाऱ्या या दोन्हींविरुद्ध आपण लढणार आहोत काय? ८. या महाकाय देशातील १२३ कोटी भारतीयांना त्यांचे समजाला घातक नसलेले वैविध्य अबाधित ठेवून जगायचे असेल तर भेदभावमुक्त, पारदर्शी, समन्यायी व्यवस्थेशिवाय पर्याय नाही, हे आपल्याला पटते काय? ९. आपल्याला आपले सार्वजनिक आयुष्य सुधारण्यासाठी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना सक्षम करावे लागेल, याविषयी काही दुमत आहे काय? १०. जगातील १९३ देशांतील किती देशांवर निसर्गाने भारतासारखी कृपा केली आहे? सर्व निर्मितीचे मूळ असलेला सूर्यप्रकाश, काही अपवाद सोडता उत्तम पाऊस, तीनही बाजूने समुद्र, हिमालयासारख्या प्रचंड पर्वतरांगा, जगातील सातव्या क्रमांकाची जमीन, जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असताना गेली चाळीस वर्षे अन्नधान्यात संपूर्ण स्वयंपूर्णता, दुधउत्पादनात जगात पहिला, परदेशी नोकऱ्या आणि उद्योग व्यवसाय करून जगातून सर्वाधिक परकीय चलन आणणारे तरुण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगातील सर्वाधिक तरुण असलेला म्हणजे सतत स्वप्न पाहणारा देश आणि शांत, प्रामाणिक आयुष्य जगण्यावर प्रेम करणारा आणि हे विश्वचि माझे घर असे म्हणणारा सर्वसामान्य भारतीय माणूस...यापेक्षा अधिक काय लागते महासत्ता होण्यासाठी ?

आपल्या मनातील बदलाची दिशा – पहा www.arthakranti.org