Saturday, January 30, 2010

नात्यांत उतरतो आहे व्यवहारवाद !

तो तरूण तावातावाने बोलत होता. आमच्या बुढ्ढ्या मालकाला, आणि सगळ्या बुढ्ढयांना आता गोळ्या घातल्या पाहिजेत. काम ना धाम , भुईला भार एवढेच म्हणून तो थांबला नाही, तर आपणही म्हातारे- त्याच्या शब्दात बुढ्ढे झालो तर आपल्यालाही गोळ्या घालून मोकळे व्हा, असे त्याने जाहीर करून टाकले ! ते केस कापण्याचे दुकान होते आणि आजारी मालक आता घरी बसून कारभार पाहात होता. मला आश्चर्य याचे वाटले की सर्व ग्राहकांसमोर, त्याच्याच सहका-यांसमोर त्याची ही बडबड चालली होती.त्याचे एक कारण असे असावे की मालकाने त्या तरूणाला खूप त्रास दिलेला असावा किंवा काही मानसिक ताणामुळे तो तशी बडबड करत असावा. प्रसंग संपला होता, मात्र माझ्या मनातून तो जायला तयार नव्हता. त्याचे कारण आधुनिक समाजात पदोपदी दिसणारी तरूण आणि वृध्दांमध्ये पडलेली उभी फुट.जणू दोन पिढ्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. ज्याच्या पाउलांवर पाउल ठेवून तरूण पिढी पुढे सरकते आहे, त्याच पिढीला आपली आधची पिढी एकदम नकोशी व्हायला लागते. व्यावसायिक संबंधांमध्ये एकवेळ ही प्रतिक्रिया समजू शकते मात्र हे लोण घरापर्यंत पोचायला लागलते तेव्हा धक्का बसतो. खरे म्हणजे मुलांना आपल्या आईवडिलांविषयी आणि आईवडिलांना मुलांविषयी सतत प्रेम वाटले पाहिजे. प्रत्यक्षात या दोन्ही पिढ्या अनेक ठिकाणी एकमेकांच्या दुःखाचे कारण ठरू लागल्या आहेत.

एखादे छोटे मैदान असावे आणि खेळाडूंना कवायतींसाठी अंतर ठेवून उभे केले असता, जे रांगेच्या बाहेर जातात त्यांना मैदानाबाहेर ढकलून द्यावे, असे हे वाटायला लागले आहे. साने गुरूजींनी एका ठिकाणी असे म्हटले आहे, मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. मरणामुळे संसाराला रमणीयता आहे. मरणामुळे जगात प्रेम आहे. आपण सारे जण अमर असतो, तर आपण एकमेकांस विचारले नसते. गुरूजींचे म्हणणे अगदी खरे आहे. मात्र ते मरणाविषयी बोलत आहे. वृध्दत्वाविषयी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मरण अपरिहार्य आहे म्हणून कोणी मरणाला कवटाळत नाही. जीवन जगण्याची आसक्ती प्रत्येक मनुष्यात असते आणि ते नैसर्गिकच आहे. म्हणूनच मरण येण्याआधीची मानवी आयुष्याची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे, याचा आग्रह धरण्यात चुकीचे काही नाही.खरे म्हणजे दोन पिढींमधील संवाद आणि नाते यावरच आधुनिक समाजचे पुढारलेपण आणि सभ्यतेचे मूल्यमापन केले पाहिजे. आधुनिक समाजाच्या मुल्यमापनात हा मुद्दाच मागे रेटला जातो, ही या समाजाला शोभणारी गोष्ट नव्हे.

जपान, फ्रांससारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणारा खर्च वाढत चालला आहे, याची चिंता व्यक्त केली जाते. फ्रांसमध्ये तर तो निवडणुकीमधील एक मुद्दा होतो. अमेरिकेमध्येही त्यांच्या आरोग्यावर होणा-या खर्चाविषयी सतत चर्चा होते. याचा एक अर्थ असा होतो की प्रगत समाजाचा एक निकष म्हणजे वाढलेले आयुष्यमान, असे अभिमानाने सांगितले जाते, मग वाढलेले आयुष्य चांगले जगता आले पाहिजे, अशीही व्यवस्था करता आली पाहिजे. तेथे मात्र व्यवहारवाद श्रेष्ठ ठरतो ! या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती वेगळी आहे , असे जर आपण मानत असू तर तो वेगळेपणा समाजजीवनात दिसायला हवा. आज पाश्चिमात्य समाज आणि भारतीय समाजाची या संदर्भात तुलना करून आपल्याकडे कमीपणा घेण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येक बदलात पाश्चिमात्यांच्या पाउलावर पाउल ठेवणा-या भारतीय समाजाची दिशा तीच आहे, हे मान्य करावेच लागते.

मनुष्याचा मनुष्य म्हणून विकास व्हावा म्हणून भारतीय संस्कृतीत चार आश्रमांच्या पाय-या सांगितल्या आहेत. ब्रह्मचर्याश्रम ,गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पिढ्यांचा व्यवहारवादावर होणारा संघर्ष टाळण्यासाठी ही रचना आवश्यकच म्हटली पाहिजे.मात्र ही रचना वेगवान आधुनिक समाजाने गैरलागू ठरविली आहे. खरे तर पूर्वीही जीवनसंघर्ष तीव्र होता आणि आताही तो तेवढा किंवा पूर्वीपेक्षाही तीव्र झाला आहे. पण तो आपल्याच मागच्यापुढच्या पिढ्यांशी व्हावा ? नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा कलहात अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीचे टिकून राहणे असे एक क्रांतिकारी पुस्तक चार्लस डार्विनने १८५६ मध्ये प्रसिध्द केले होते. पण त्याच डार्विनने प्राण्यांमधील परमोच्च विकास मानवात झाला आहे , असेही म्हटले आहे. याचा अर्थ त्याची मानवाकडून वेगळी अपेक्षा होती. ती आधुनिक समाज पूर्ण करीत नाही, असे आता म्हणावयाचे काय?

चिंता याची वाटते की हा व्यवहारवाद आता समाजाचे मानसिक स्थैर्य नष्ट करायला निघाला आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील महाराष्ट्रासारख्या नागरीकरणात वेगाने निघालेल्या मात्र अध्यात्मिक परंपरा सांगणा-या राज्यात यासंबंधी काही वेगळे चित्र दिसते आहे काय ? हे शोधण्याचा प्रयत्न मी गेले काही दिवस करतो आहे . ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना, मोफत आरोग्य शिबिरे, निम्या किमंतीत साधा प्रवास, पुण्यामुंबईसारख्या शहरांत त्यातील श्रीमंतांसाठी स्वतंत्र वसाहती, काही चांगले वृध्दाश्रम आणि बागांमधील बाकडे यापलिकडे वेगळेपण जात नाही.आधीच्या पिढीसाठीचं हे जे करणं आहे, त्याला खूपच संघटित रूप येण्याची गरज आहे. आमच्या कुटुंबातील नात्यांसह समृध्द जगण्याचा व्यवहारवादात संकोच होतो आहे, हे तर दररोज अनुभवाला येते आहे. त्याची आर्थिक, सामाजिक कारणे आहेत, मात्र ज्या टप्प्यावर प्रत्येकालाच जायचे आहे, त्यासाठीची चांगली रचना केली पाहिजे, असे बेंबीच्या देठापासून का वाटत नाही , हा खरा प्रश्न आहे. याचा एक अर्थ असा की आम्ही आमच्याच वर्तमानात इतके गुंतलो आहोत की जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे याची आठवण या वर्तमानात येतच नाही. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्याच्या संभ्रमानेही आम्हाला वेडे केले आहे. असे म्हणतात की, आईवडील आणि मुले यांच्या नात्यात पडणारी फुट हा लोकशाही प्रसाराचा थेट परिणाम आहे. मुलांवर हक्क सांगायला आईवडील कचरू लागले आहेत, तर आईवडिलांकडे उपयोगिता म्हणून पाहण्याची आणि त्यांचा आदर न करण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढत चालली आहे. कारण काहीही असो , ते दुष्टचक्र आहे, हे ओळखता येत नसेल तर आमच्या संस्कृतीतील वेगळेपण आणि अध्यात्मिक वारसा आम्ही कसा सिध्द करणार आहोत ?

Thursday, January 21, 2010

काळाशी ओळख पटत नाही म्हणून.....

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद त्याच नावाने नुकताच प्रसिध्द झाला.हा अनुवाद करण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आनंदाचा एक भाग झाला, मात्र यानिमित्ताने जगातील सर्वात शक्तिशाली माणसाचे आयुष्य असे असू शकते, हे जाणून घेतल्यावर मी अवाक् झालो.ओबामांची निवड हा जगातील परिवर्तनाचा एक मोठा टप्पाच म्हणावा लागेल. ओबांमांच्या आयुष्यातील एका प्रसंगाकडे आपले लक्ष वेधायचे आहे.

आपली मूळभूमी केनियात नातेवाईकांना भेटण्यासाठी ते मोठ्या ओढीने जातात. सुखदुःखाच्या गुजगोष्टी करताना लक्षात येते की त्यांच्यातील अंतर फारच वाढले आहे आणि त्याचे एक प्रमुख कारण भाषा आहे. ओबामा आपल्या ग्रँनी आजीला भेटतात. त्यावेळचे हे वर्णन पहा. ‘अर्ध्या वाटेवर मी आणि ग्रँनी दोघेच होतो. ग्रँनी माझ्याकडे बघून हसली अन् म्हणाली , हेलो. मुसावा, मी लुओ भाषेत उत्तरलो. आमची शाब्दिक देवाणघेवाण तेथेच संपली. ऑमा येईपर्यंत आम्ही दोघेही विचित्रासारखे जमिनीकडे बघत बसलो होतो. एकदम गप्प ...चूपचाप. ऑमा आल्यावर ग्रँमी तिच्याशी काहीतरी बोलली. ते मला कळलं नाही., पण तिच्या स्वरातून तिची खंत , वेदना मला जाणवली.... अगदी थेट आपल्या मुलाच्या मुलाशी चार शब्द बोलताही येउ नये, याचं तिला वाईट वाटत होतं. ऑमाला मी म्हटलं, “तिला सांग., मला खरचं लुओ भाषा शिकून घ्यायची आहे. पण काय करू तिकडे अमेरिकेत वेळच मिळत नाही. मी किती कामात असतो,ते सांग तिला.” “ तिला ठाउक आहे ते ” ऑमा माझ्याकडे बघत म्हणाली , “ पण स्वतःच्या माणसांना जाणून घेण्यासाठीही वेळ मिळू नये, इतका माणूस कामात मग्न असावा, हे तिला पटत नाही.”

ओबामा आणि आजींच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना आहे, मात्र मायबोलीत संवाद करू न शकल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.काळाशी ओळख पटली नाही आणि तणाव निर्माण झाला, अशी वेळ क्षणोक्षणी येते, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. यासंबंधीचा एक वेगळा अनुभव परवा आला. मराठी भाषेचे अभ्यासक मुंबईचे शुभानन गांगल आणि मी कोल्हापूरच्या शतकोत्तर हीरकमहोत्सव साजरा करत असलेल्या करवीर वाचन मंदिरच्या वि.स. खांडेकर व्याख्यानमालेत ‘ शोध मराठीचा’ या विषयावर बोलण्यासाठी गेलो होतो. कोल्हापुरात जो आपलेपणा वाटतो, त्याचा शोध घेताना काळाशी ओळख पटण्याचा हा मुद्दा लक्षात आला. आपल्या भाषेविषयीचे विवेचन कोल्हापुरकरांनी तन्मयतेने ऐकले. कोल्हापुरातील मराठमोळ्या वातावरणातमुळे नकळत मोकळेपणा निर्माण होतो. काळानुसार माणसाने बदलले पाहिजे, हा नव्या काळाचा मंत्र झाला आहे, हे खरे असले तरी किती बदलले पाहिजे, याचे भान राहात नसल्याने आपल्या समाजातील तणाव वाढत चालला आहे, असे मला वाटते. आमचा पेहराव, आमची भाषा, आमचे शिक्षण, आमचे दैनंदिन जीवन- याची ओळख पटेनाशी होते म्हणून तणाव वाढतो. मी धाडस करून असे म्हणेन की विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येमागे हेच कारण आहे. त्यांची आणि ते जे शिक्षण घेत आहेत त्याची ओळख पटत नाही. ते ज्या स्पर्धेला सामोरे जात आहेत, तिची त्यांना ओळख पटत नाही. आपण परक्या जगात आलो आहोत, असे त्यांना वारंवार वाटायला लागले आहे.

मानसिक ताणतणावावर आज मोठी चर्चा सुरू आहे. अत्याआधुनिक काळात त्याविषयीचा अभ्यासही सुरू आहे, मात्र तो टाळण्यासाठीची कृती क्वचितच पाहायला मिळते. वेगवान बदलांमध्ये काहींचे हितसंबंध तयार होत आहेत, अशी माणसे, संस्था, कंपन्या आणि देश बहुजन समाजाला ओळखच न पटलेल्या काळाची भलावण करतात आणि ते बदल स्विकारायला भाग पाडतात. मानसिक ताण येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सतत अपरिचित माणसांचं सान्निध्य , असं मानसशास्त्रातही मानलं जातं. हे अपरिचितपण आता माणसांपुरतं राहिलेलं नाही. महानगरांमध्ये हे अपरिचितपण सर्वव्यापी होत चाललं आहे. त्यातून मिळणारा अपरिहार्य ताण घेवूनच माणसं घरादारात वावरत असतात आणि त्यातून समाजाचं मानसिक आरोग्य बिघडत जातं.विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याचं कारणही तेच आहे.

खरे म्हणजे काळ झपाट्याने बदलत असला तरी माणूस तोच आहे, जो पूर्वीही दोन पायांवर उभा राहात होता आणि आजही. यश, आनंद, समाधान या संकल्पनाही सनातन आहेत. त्यामुळे या गोष्टींचे भान ठेवूनच आपल्याला नव्या बदलांकडे पाहावे लागेल. नव्या बदलातही आमच्यातले जैवसंबंध महत्वाचे आहेत, हे मान्य करावेच लागेल. त्यासाठी आमची संस्कृती, आमची भाषा, आमचे मुळ, आमचा पेहराव हे परके वाटता कामा नयेत. महानगरांमधल्या गर्दीत परिचय अशक्य असला तरी आजूबाजूंच्या माणसांवरचा विश्वास वाढवित राहिला पाहिजे. सर्व गोष्टी व्यवहाराच्या रेट्यापोटी होतात, असे याकडे पाहता येणार नाही. काही कळीच्या गोष्टी जाणीवपूर्वकही कराव्या लागतील. त्यासाठी जेथे आपली ओळख पटते त्या समाजात या मुद्दयांवर एकजूट व्हायला हवी. याचा अर्थ अस्मितेचे प्रश्न टोकदार करून इतरांचा द्वेष करा असे कोणी म्हणणार नाही.मात्र काळ बदलला म्हणून आपल्या आईवडिलांना विसरा, हे म्हणणे जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच संस्कृती, भाषा, मुळ आणि पेहरावाचेही आहे.सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी फ्रेंच भाषेचे वर्चस्व कायदे आणि दंड करून संपविले. याच कारणासाठी बंगाली जनतेने उर्दु भाषकांचे भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्व संपविले. तसे आता कदाचित करता येणार नाही, मात्र आमची संस्कृती, भाषा, मुळ आणि पेहरावासारख्या मुळ गोष्टी अपरिचित आणि अपनानित होणार नाहीत,याची काळजी घ्यावीच लागेल.

Sunday, January 17, 2010

रस्त्यांवरची संस्कृती नेमकी कुणाची?

पुण्याच्या मध्यभागात चारचाकी गाडी घेउन आता जाता येत नाही , म्हणजे अजूनही मोठमोठ्या गाड्या घेउन लोक जातात, मात्र स्वतःला
आणि इतरांना मनस्ताप देण्याची तयारी ठेवावी लागते. कपडे, काही पुस्तके, आणि काही ठेवणीतल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी अशा गर्दीत
तुम्हाला कधीतरी जावेच लागते. शहरांमधली गर्दी, वाहतूक कोंडी, प्रचंड आवाज हे सर्व आता आपल्या सरावाचे झाले आहे, इतके की ते सर्व आपण गृहितच धरले आहे. मात्र हे गृहित धरणे किती धोकादायक ठरू शकते, याचा एक अनुभव नुकताच घेतला. वाहतुक कोंडीसारख्या तणावाच्या प्रसंगात
माणसे कशी व्यक्त होतात , यातूनच त्या समाजाची ओळख होते. ही ओळख किती वेगळी आहे, हेही यानिमित्ताने लक्षात आले.
पुण्यात सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. सवाई गंधर्वसारख्या उत्सवासाठी या काळात अनिवासी भारतीयही येतात, असे म्हटले जाते. या कार्यक्रमांचे प्रमाण आणि त्या कार्यक्रमांचे विषय पाहून हा समाज किती सुसंस्कृत आणि प्रगल्भ आहे , असे वाटू शकते.मात्र त्याच शहरांच्या रस्त्यांवर दिसणारी संस्कृती त्यापेक्षा वेगळेच काही सांगते आहे. समाजातील मोजक्या लोकांकडे संपत्तीची रेलचेल झाली आणि त्याच समाजातील बहुतांश समाज प्राथमिक गरजांभोवतीच फिरत असेल तर काय होते , याचे बटबटीत चित्र आपल्या शहरांमध्ये विशेषतः रस्यांवर सध्या पाहायला मिळते आहे. येथे उदाहरण पुण्याचे घेतले असले तरी ही परिस्थिती सर्वत्र सारखीच आहे , हे लक्षात घ्यावे.
· शहरात चारचाकी घेउन त्या गर्दीत भर घालण्यापेक्षा आणि पार्किंगसाठी घाम काढण्यापेक्षा रिक्षाने जाण्याचे मी ठरविले. रिक्षाने फिरणे परवडणे हा स्वतंत्र भाग झाला. मात्र हल्ली अनेक लोक हा प्रयोग करताना दिसतात. रिक्षावाले प्रवाश्यांसशी नीट बोलत नाही , ही तक्रार म्हणून ठीक आहे, मात्र या प्रकारच्या रस्त्यांवर दिवसभर फिरणा-या माणसाच्या तणावाची पातळी काय थराला जात असेल
, याची नुसती कल्पना करून पाहिली तरी ही तक्रार आपण मागे घेतो. त्यादिवशी ती रिक्षाही एका चौकात कोंडीत अडकली.कोंडी का झाली हे लक्षात येत होते. चारी बाजूंनी वाहनांचा पूर येत होता आणि प्रत्येकाला थोडाही वेळ न थांबता पुढे जायचे होते . सर्वांनाच घाई होती. घाईशिवाय आम्ही कुठे रस्त्यावर असतो? वाहतूक नियमन करण्यासाठी त्या चौकात कधी पोलिस लागत नाही, त्यामुळे तोही नव्हता. यापुढे अशा प्रत्येक चौकात पोलिस तैनात करावे लागतील, तो दिवस दूर नाही. सर्वच चालकांनी जणू ‘ मी जागचा हलणार नाही,’ ‘पुढेच जात राहील,’ ‘इंचभरही मागे हटणार नाही’ असा दृढ निश्चय केला होता.. त्यामुळे गर्दी वाढतच होती. कोणीच पुढे जाउ शकत नाही हे सिद्ध झाल्यावर त्या चौकात भाषणबाजी सुरू झाली. सरकार, पोलिस, हॉर्न वाजविणारे, मोठ्या गाड्यांवाले, रिक्षावाले, मधूनच वाट काढणारे दुचाकीस्वार, हातगाडीवाले आणि पायी चालणारे .. या सर्वांचा उद्धार केला जात होता. आपल्याला पुढे जाणे किती आवश्यक आहे, यासंबंधीचे शब्द कानावर पडत होते. कोणी काही म्हणत असला तरी प्रत्येकाचे लक्ष मात्र जागा मिळाली की रेटून पुढे सरकण्याकडे होते.या सरकासरकीत वाहतूककोंडी आणखी पक्की होत होती
, याचा मात्र बहुतेकांना विसर पडला होता. वाईट याचे वाटते की अशावेळी सर्वस्तरातील बहुतेक माणसे सारखीच वागतांना दिसतात.काही अपशब्द, शिव्याही कानावर पडत होत्या. श्रीमंत, सुसंस्कृत हे स्तरही ओळखू येत नाहीत. कोंडी इतकी वाढली की पुढच्या मोठ्या चौकांतील वाहतुकीवरही परिणाम झाला. तेथील काही पोलिसांना धाव घ्यावी लागली. पोलिसांच्या शिट्या सुरू झाल्यावरच थोडी हालचाल सुरू झाली. त्यातही रिक्षावाले, काही दुचाकीस्वार पोलिसांना घाबरून थबकले. बहुतेक चारचाकीवाल्यांना तर पोलिस आल्याचाही काही फरक पडल्याचे दिसले नाही.
· वाहतूक कोंडीसारखे तणावाचे प्रसंग आमच्या आयुष्यात वाढत आहेत. त्याची कारणेही सगळ्यांना माहीत आहेत. प्रश्न असा आहे की या प्रसंगामधील तणाव कमी करण्यासाठी आम्ही काही करू शकतो काय? वाढता तणाव टाळण्याचे दोन मार्ग आहेत, असे मला वाटते. पहिला आणि खरा मार्ग आहे तो म्हणजे समाजातील वाढत चाललेले स्तर कमी करणे. पण तो फार मुळातला बदल आहे. तो आम्हाला पेलवेल अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. दुसरा मार्ग आहे तो जीवनाचा आपणच वाढविलेला वेग कमी करण्याचा. खरे सांगायचे तर तोही आपल्या हातात राहिलेला नाही. चौपदरी, दहापदरी रस्ते, उड्डाणपुल असे काही भौतिक मार्ग कोणी नाकारणार नाही, मात्र भारतासारख्या ११२ कोटी लोकसंख्येच्या देशात तेवढेच करून भागणार नाही.
· ‘जगात शास्त्रांचा कितीही विकास झाला
, तरी जोपर्यंत जीवनकला माणसास साधत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होय. समाजात परस्परांशी कसे वागावयाचे ते आधी शिका’ असे तत्वचिंतक टॉल्स्टॉय म्हणत . या आणि अशा अनेक प्रसंगात या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. विशेषतः आपल्या शहरांमध्ये आपल्याच परिसराकडे जे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे, त्या त्या वेळी आपण जीवनकलेत बरेच मागे पडलो आहोत, हे मान्य करावे लागते.
· समाजात आलेल्या समृद्धीचा आनंद आहेच, मात्र त्याला जीवनकलेच्या समृद्धीची जोड मिळाली तर किती चांगले होईल . कलेच्या माध्यमातून ही समृद्धी वाढते असे म्हणतात. कलांचा, शास्त्रांचा एवढा विकास झालेला आज दिसतो आहे की त्या तुलनेने आमच्या रस्त्यांवर जी बकाल संस्कृती दिसते आहे तिचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार आहे? जेव्हा मुलभूत गरजा भागवूनही माणूस तणावातच जगत असेल तर त्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजावे, असे म्हणतात. सध्याच्या शहरी संस्कृतीकडे पाहिल्यावर मानसिक संतुलन बिघडलेलीच माणसे एकमेकांभोवती फिरताहेत की काय, अशी शंका येते.
- यमाजी मालकर , पुणे