Friday, November 19, 2010

सुतक पाळा...सत्कार कसले स्वीकारता ?

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उर्फ दादा हे त्यांना मानाचे आणि जबाबदारीचे पद मिळाल्याबद्दल सत्कार स्वीकारत आहेत. भ्रष्ट वर्तन केल्याचा आरोप ठेवल्यानंतर कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांना पद सोडावे लागले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला वजनदार नेत्यांना कधी कोठे बसावावे, याची सारखी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि महत्वाच्या खात्यांमध्ये सारखे बदल करावे लागण्याची नामुष्की सहन करावी लागते आहे. या जुळ्या भावांना आपले घर सांभाळता येत नाही, त्यामुळे सारखे बदल करावे लागते, हेच या खांदेबदलाचे कारण आहे. त्यामुळे या बदलाचा आनंद साजरा करावा, असे त्यात काहीही नाही. खरे म्हणजे ही कारणे लक्षात घेता या दोघा भावांनी ‘सुतक’ पाळून पदावर बसायला पाहिजे. असे असताना बाबा आणि दादा सत्कार स्वीकारत आहेत, हे काही चांगले नव्हे. खरे म्हणजे यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विचार करता यांनी एकप्रकारे जनतेचा विश्वासघातच केला आहे. त्यामुळे थेट कामाला लागल्याशिवाय यांनी कोणत्याही उत्सवी कार्यक्रमात भागही घ्यायला नको. तरीही सत्कार स्वीकारले जात आहेत, हे आश्चर्य आहे.

वाईटातून काही चांगल्या गोष्टी होतात, असे म्हणतात. महाराष्ट्राच्या 10 कोटी जनतेला अशा किरकोळ बदलातच यापुढे तरी काहीतरी चांगले होईल, असे वाटते आणि त्यांच्या मनात नव्या आशा पल्लवीत होतात. किती भाबडपणा! भूत आणि वर्तमान विसरायला लावून भविष्यातल्या गाजराकडे जनतेचे लक्ष वेधण्याच्या राजकीय नेत्यांच्या कौशल्याला दाद दिली पाहिजे आणि आपण सातत्याने जनतेची फक्त फसवणूकच करत आहोत, याची त्यांना जाणीवही करून दिली पाहिजे. सत्कार समारंभांचे वार्तांकन वाचल्यावर लक्षात येते की वर्षानुवर्षे आपलेच पक्ष आणि तीच तीच माणसे सत्तेवर असताना ‘काल’ कसा वाईट होता आणि ‘उद्या’ कसा उज्ज्वल असणार आहे, असे छातीठोकपणे ही माणसे बोलू शकतात, त्यांना माहीत आहे की उत्सव साजरे केले की जनतेला सर्व गोष्टींचा विसर पडतो. त्यामुळे जनतेला शक्यतो ‘वर्तमाना’त जाग येवूच द्यायची नाही. वर्तमानात फक्त एकमेकांवर कोट्या करायच्या. दुर्दैवाने जनताही आता त्याकडे मनोरंजन म्हणून पाहायला लागली आहे. काही उथळ पत्रकारांनीही वार्तांकनाचा अर्थ या कोट्यांची जंत्री असाच घेतला आहे. शरद पवार हल्ली ज्याला शहरांचे बकालीकरण म्हणायला लागले आहेत, त्यापेक्षा हे मानसिक बकालीकरण अधिक घातक आहे.

बकालीकरणावरून आठवले. बाबा, दादा हायकमांडच्या आशीर्वादाने पदावर बसले आणि महाराष्ट्रात आनंदीआनंद साजरा झाला. या दोघांचा सत्कार ज्यांना करावयाचा, त्यांनी तर रांगाच लावल्या आहेत. मात्र मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी सर्व छावण्या व्यस्त असल्यामुळे दूधाची तहान ताकावर भागवली जाते आहे. गावोगाव या नेत्यांच्या अभिनंदनाचे मोठमोठे फलक लावले जात आहे. उद्देश हा की आम्ही आनंद साजरा केला हे त्यांना हेलिकॉप्टरमधूनही दिसावे ! त्यांनी खुष व्हावे आणि आपल्याला लक्षात ठेवावे, ही मनिषा. त्यांची काही चूक नाही म्हणा. खुशामत केल्याशिवाय नेते प्रसन्न होत नाहीत. असे सगळे असताना पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार म्हणतात की फलक काढून टाका ! त्यांची भावना कदाचित चांगलीही असेल, पण त्यांचे ऐकतो कोण? आणि का म्हणून ऐकेल? खुषमस्करी हाच जर पदांची पायरी चढण्याचा निकष असेल तर फलक लावणार्‍यांचे काय चुकले सांगा ! हा पुरावा घ्या. अजित पवार गेले तीन वर्षे सांगताहेत, फलक लावू नका. फलक लावले तर मी प्रसन्न होणार नाही. पण ऐकतो कोण? पृथ्वीराजांवर तर असे विद्रूप फलक पाहण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे. त्यांना खरे म्हणजे लोकानुनयाची काहीही गरज नाही. कारण ते थेट हायकमांडच्या सल्ल्याने ‘कठोर’ आणि ‘कटू’ निर्णय घेणार आहेत. तेही कोणी ऐकत नाही, याचा अनुभव त्यांना न येवो. कारण फलक काढून टाका, असा त्यांनी आदेश काढून आठवडा झाला, तरी फलक कोठे निघाले?

म्हणायला सत्कारांचा एक फायदा झाला. या नेत्यांना खरे बोलण्याची संधी मिळाली. ‘देशभरातील राजकारण्यांबाबत सध्या नैराश्याची भावना असून त्यास काही अंशी आपण, काही अंशी जागरूक मेडिया तर काही प्रमाणात जागरूक जनता जबाबदार आहे’, असे विधान मुंबईच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबईतल्या एका मुलाखतीत तर ते असेही म्हणाले की ‘राज्यात गेल्या काही वर्षांत भूखंडांचे आरक्षण बदलणे आणि ‘एफएसआय’चा गैरव्यवहार यातून मिळणारा प्रचंड काळा पैसा राजकारणासाठी आणि गुन्हेगारीसाठी वापरला जात आहे.’ आणि ते असेही म्हणाले की, काळ्या पैशावर पोसलेले राजकारण संपवून स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न राहील. तरी बरे केंद्रात आणि राज्यात सातत्याने कॉंग्रेसचीच सत्ता आहे! देशातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कोणत्याही क्षेत्राविषयी इतके क्रांतिकारी विधान करताना पृथ्वीराज चव्हाण यांना हे भान ठेवावे लागणार आहे. पण आपण असे खरे बोलण्याचे स्वागत करतो. कारण कधीतरी भोळ्या भारतीयांना हे सत्य कळेल आणि आपला मार्ग निवडायला ती समर्थ होईल.

आणखी एक गोष्ट थोडी अधिक स्पष्ट केली पाहिजे. एक माणूस बदलल्याने एवढा बदल होऊ शकतो? मंत्रिमंडळात असलेल्या माणसाचे पद बदलल्याने आता प्रशासन वेगाने पळू शकते? मग पुण्यासारख्या संपन्न, जागरूक आणि पिंपरी-चिंचवडसारख्या ‘श्रीमंत’ शहरात तर अजित पवारांची सत्ता आहेच की! मग तेथे का फरक दिसत नाही? तेथे का काही नोंद घेण्यासारखा बदल दिसत नाही? मग कोणीतरी हळूच म्हणणार की, एवढेही खरे बोलायचे नसते. सर्वसत्ताधीश समजणार्‍या या नेत्यांना याची आठवण करून दिली पाहिजे की तुमची जी कोठली हायकमांड आहे, ती याच भ्रष्ट व्यवस्थेवर पोसली जाते आहे. त्या व्यवस्थेविषयी बोलण्यासाठी कदाचित आज तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागत नसेल, पण काही खरोखर करण्याची इच्छा असेल तर मात्र ते पूर्वपरवानगीशिवाय शक्य होणार नाही.

बाबा, दादा... हा फार मोठा विषय झाला.. व्यवस्था बदलाचे नंतर बघू. तूर्तास फलक हटविण्यापुरते प्रशासन हलले तरी भोळी जनता एक चांगली सुरवात म्हणून हा खांदेपालट आनंदाने मान्य करेल.


- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

Thursday, November 11, 2010

‘ते’ आणि ‘हे’ ओबामा एकच आहेत ना ?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर येत असताना ‘ते’ आणि ‘हे’ ओबामा एकच आहेत ना, हे तपासून घ्यावे लागणार आहे. असं म्हणण्याचं कारण ओबामांनी मानवतावादी जगाच्या वाढविलेल्या अपेक्षा आणि ओबामांचे पूर्वआयुष्य ! आपल्या पडत्या काळात ओबामांनी फार प्रगल्भ असं लेखन केलं. त्यातील ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ हे त्यांचं आत्मचरित्र अमेय प्रकाशनासाठी भाषांतर करण्याची संधी मला मिळाली. हे काम करताना मी ओबामामय झालो होतो. याचं कारण काही महिन्यापूर्वी अमेरिकेबाहेर अजिबात माहीत नसलेल्या ओबामांची जगभर चर्चा सुरू झाली होती आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर होताच ते निवडून येणार असं अमेरिकेने आणि जगाने गृहीत धरलं होतं. सर्वसत्ताधीश अमेरिकेच्या अध्यक्षपदी असा कृष्णवर्णीय, दिसायला अगदीच साधा माणूस सर्वसत्ताधीश होणार हे ‘सरंजामी’ मनाला पटत नव्हते. त्यांचे चरित्र वाचल्यावर तर जगात असे काही होऊ शकते, या कल्पनेनेही जगातल्या परिवर्तवादी विचाराच्या माणसांचा आशावाद दुणावला होता. जग एका माणसामुळे बदलत नाही, हे खरे असले तरी महात्मा गांधींसारखा महापुरूष या बदलाला चालना देऊ शकतो, हे आपण पाहिलेलं होतं. त्यामुळेच ओबामांच्या विजयामुळे आणि त्यांच्या वाट्याला ज्या प्रकारचे आयुष्य आले, ते लक्षात घेता हा आशावाद काही चुकीचा म्हणता येणार नाही.
अमेरिका हा व्यापारी देश आहे आणि जे व्यापाराच्या चौकटीत बसत नाही, त्याची अपेक्षा अमेरिकेकडून करण्यात काही अर्थ नाही, हे अनेकदा बोलले गेले असतानाही हा आशावाद ओबामांनी जिवंत केला आहे, हे महत्वाचे. ओबामांचे ऑडॅसिटी ऑफ होप’ हे पुस्तक वाचताना तर भांडवलशाहीच्या राजधानीत समाजवादी, गांधीवादी माणसाचा उद्य कसा झाला, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांचं त्यातील हे एक वाक्य पाहा ‘समानसंधी आणि समानता यामुळे आपलं स्वातंत्र्य धोक्यात येत नाही. उलट आपल्या सरकारची लोकमान्यता आणि यशस्वी अर्थव्यवस्थेचं मूळ गमक म्हणजे ही मूल्यंच होत.’ जगाच्या कल्याणासंबंधीचा जो जो म्हणून विचार आपण करतो, तो विचार ओबामांनी त्यात केला आहे. इतका चांगला विचार करणारा माणूस जगाचा नेतृत्व करतो आहे, हे खरोखरच आशादायी आहे.
ओबामा यांच्या दौर्‍याची चर्चा जगातले सत्तासंतुलन आणि व्यापारसंधी म्हणूनच जास्त होईल, याची मला कल्पना आहे. मात्र एका वेगळ्या मुशीत तयार झालेला माणूस म्हणून त्यांच्याकडून जगाच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. जागतिक राजकारणात संवेदनशीलता, माणुसकी आणि वेगळ्या विचाराला स्थानच नाही असे मानण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे आणि जगातला बकालपणा त्यामुळेच वाढतो आहे. या बकालपणाचा ओबामांनी वेळोवेळी वेगवेगळ्या शब्दांत निषेध केला आहे. आता हा निषेध कृतीतून करण्याची वेळ आली आहे. ही संधी ओबामांनी घेतली पाहिजे, असे मनापासून वाटते.
‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ चे भाषांतर करताना त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी आपल्याला उभारी येते. ओबामा हे आपल्या खूप जवळचे वाटायला लागतात. असे वाटते त्यांना भेटून जगाच्या भल्याच्या गोष्टी कराव्यात. पण आपल्याला हेही माहीत असते की जगाचे व्यवहार असे चालत नाहीत. पण हा आशावाद ओबामांनी जागविला , हे निश्चित. हे पुस्तक प्रसिद्ध्‍ झाल्यानंतर या आशावादाला मी पुढीलप्रमाणे शब्दरूप दिले होते. या भावना अर्थपूर्ण जीवनाच्या दिशेने जाणार्‍या असल्याने आपल्यालाही त्या भिडतील, अशी खात्री आहे.
‘मित्रहो, जगाच्या इतिहासाला कलाटणी द्यायला निघालेल्या बराक ओबामा यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगात तर जणू आपणही या पाऊलवाटांच्या ठ्शांचा माग काढते होतो. ओबामाचे एकटेपण, नैराश्य, त्यांचा निश्चय, हिंमत... हे सर्व आपलेच होऊन जातात. जातपात, वर्ण, धर्मपंथ, राज्य, देश आणि खंडांच्याही सीमा पुसून जातात आणि नव्या मानवतावादी... मानवधर्मावर आधारित जगाच्या उभारणीचे आपणही एक शूरशिपाई होण्याचा संकल्प करतो.
आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या अनेक पिढ्यांना सोसावी लागलेली गुलामगिरी ज्याच्या वारसांना टाळता आली नाही. तिसर्‍या जगातील दारिद्र्यामुळे येथील कोट्यवधींच्या आयुष्यात निर्माण झालेली गुंतागुंत ज्याने अनुभवली... अमेरिकन गौरवर्णीय ख्रिश्चन आई, केनियन कृष्णवर्णीय मुस्लीम वडील, आईवडीलांच्या घटस्फोटांनंतर इंडोनेशियात दुसर्‍या वडिलांचा करावा लागलेला स्वीकार... अशा दोन जगात स्वतःला समजावतच जगावे लागूनही मी कोणा एकाचा नाही, हे अमेरिकेला पटवून ‘आपण बदलू शकतो’ ‘येस वी कॅन’ असा नवा दुर्दम्य आशावाद ज्याने जागविला, ते हे बराक ओबामा.
नव्या जगाचे स्वप्न बनलेली अमेरिका आणि जग जोडण्याची ताकद असलेला भारत... या दोन महासत्तामधील साम्यस्थळे सातसमुद्र पार करून जवळ येत आहेत. मी कोणा एकाचा नाही, तर मी सर्वांचा आहे, असे कोणीतरी म्हणावे आणि एका समन्यायी नव्या जगाचे स्वप्न साकार व्हावे, असे ज्यांना ज्यांना वाटते... आपल्या वर्तमानातील गुंता सोडविण्यासाठी आणि आव्हाने पेलण्यासाठी आपल्या सर्वांनाच एकत्र यावे लागेल.. आणि जे शक्य आहे.. यावर ज्यांचा विश्वास आहे.. बदलासाठी राजकारण किती सहाय्यकारी ठरते, हे ज्यांनी समजून घेतले आहे आणि लोकशाहीच्या सामर्थ्यावर आणि सर्वसामान्य माणसांच्या मनोबलावर ज्यांचा विश्वास आहे, अशा सर्वांचा आशावाद ओबामांनी पेटविला आहे.
बहुविधता आणि सर्वसमावेशकता हेच नव्या जगाचे बलस्थान आहे आणि विषमता हद्दपार करण्यासाठीच्या छोट्या-मोठ्या लढ्यांत आज जे जे सक्रिय आहेत... इतिहासाचे ओझे जबाबदारी म्हणून स्वीकारताना वर्तमानात झेपावण्याचा आणि आपल्या विस्तारित परिवाराचं उज्ज्वल भवितव्य पाहण्याचा ज्यांनी संकल्प ज्यांनी केला आहे... अशा सर्व वैश्विक नागरिकांना सांगणार्‍या आणि अजूनही संकुचित अस्मितांवर विषारी फुंकर घालणार्‍याना ‘ आपले प्राक्तन समान आहे,’ असे बजावणार्‍या ... ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’ ते महासत्ता अमेरिकेच्या पहिल्या आफ्रिकन – कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या बराक ओबामांचे समंजस व्यक्तिमत्व कोणत्या मुशीतून घडले असेल ?
महत्वाचा मुद्दा हा की ज्याचे मूळ आफ्रिकेत आहे, ज्याचे नागरीकत्व अमेरिकन आहे , ज्याने आशिया खंडातले दारिद्रय आणि समृद्ध्‍ सांस्कृतिक वारसा पाहिलेला आहे , ज्याने कृष्णवर्णीय म्हणून वाट्याला आलेल्या दुःखातून नाकारलेपणाची वेदना अनुभवली आहे, ज्याच्या वाट्याला केवळ महिनाभर वडिलांचा सहवास मिळाला आहे, ज्याने भांडवलशाहीच्या राक्षसी रूपाचा निषेध नोंदविलेला आहे, ज्याने आपल्या आयुष्यात अनेक पराभव पचविले आहेत आणि अतिशय संवेदनशील मनाने या प्रवासाकडे पाहू शकतो... तो बराक ओबामा नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून सुखदुःखाची खाण असलेल्या भारतभेटीला आला आहे. करार- मदाराचे महत्व कोणी नाकारत नाही, मात्र त्यावरच्या सह्या वैश्विक नागरिकत्वाला न्याय देणार्‍या आहेत ना, हे आपल्यादृष्टीने महत्वाचे आहे. अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला त्याची प्रतीक्षा आहे.

- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

Tuesday, November 2, 2010

आयुष्य माणसाचे, नियम मार्केटचे !

आता मुंबईत दादर स्थानकावर शिवनेरी, एशियाड आणि साधी बस उभी असली की शिवनेरी आधी भरते, नंतर एशियाड आणि शेवटी साधी बस. शहर बस वाहतुकीच्या ताफ्यातील वातानुकुलित गाडयांमध्ये आता गर्दी दिसू लागली आहे. घरातील पहिलीच कारची खरेदी असली तरी गाडी मोठी हवी, असे म्हणणारी तरूण पिढी काही घरांमध्ये दिसायला लागली आहे. टीव्हीच घ्यायचा तर ‘फ्लॅट टीव्ही’ घेतला पाहिजे, याविषयी घरात एकमत होते आहे. मोबाईलचे ‘हाय एंड’ चे मॉडेल्स आधी उचलली जात आहेत. शहरातील वाहतूकीचा प्रश्न सोडवायचा तर मेट्रोशिवाय पर्याय नाही, असे छातीठोकपणे वाटणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. महागड्या चित्रपटगृहांतील बाल्कनीची तिकीटे आता आधी संपतात आणि उशिरा तिकीटे काढणार्‍यांना पड्द्या समोरच्या तिकीटांवर समाधान मानावे लागते. टोल असला तरी चालेल पण रस्ता चांगला हवा, यावर आता बहुतेकांचे एकमत होते आहे. देवाच्या लवकरच्या दर्शनासाठी जास्त पैसे मोजणार्‍या भाविकांची संख्या वाढत चालली आहे. हॉटेलात वातानुकुलीत विभागात दर जास्त आहेत हा आता काही चर्चेचा मुद्दा राहिलेला नाही. चार पैसे जास्त गेले तरी चालेल पण सेवा चांगली पाहिजे, हा परवलीचा शब्द झाला आहे. हा बदल जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतो आहे. या बदलाचे कारणही आपल्याला माहीत आहे. भारतातल्या 30 कोटी मध्यमवर्गातील कुटुंब आता दररोज उच्चमध्यमवर्गाचे दार ठोठावत आहेत.
मध्यमवर्गाची व्याख्या करणे अवघड असले तरी तो वेगाने वाढत चालला आहे, हे बाजारात दिसायला लागले आहे. आमची मुले महापालिकेच्या शाळेत शिकणार नाहीत, फी जास्त असली तरी चालेल पण ती खासगी आणि तेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतील, यावरही मध्यमवर्गाने शिक्कामोर्तब केले आहे. मोठया शहरांमध्ये ‘टु बेडरूम किचन’ किंवा ‘थ्री बेडरूम किचन’ फ्लॅटनाच मागणी आहे, असे जाहीर करून छोटे फ्लॅट काढण्याची गरज नाही, असे बांधकाम व्यावसायिकांनी ठरवून टाकले आहे. परदेशात खर्च करणारा पर्यटक म्हणून भारतीय पर्यट्कांना मागणी वाढली आहे. देशातही भारतीय पर्यट्क महत्वाचा ठरू लागला आहे. टीव्ही, वर्तमानपत्रातील जाहिरातीत उंची सौदर्यप्रसाधनांच्या जाहिराती वाढत चालल्या आहेत. महागाच्या पण ब्रँडेड कपड्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. भारत कधीच धावला नसेल इतल्या वेगाने ‘अपमार्केट’च्या दिशेने धावायला लागला आहे.
देशातल्या 30 कोटी मध्यमवर्गाने बहुराष्ट्रीय कंपन्यांना भुरळ घालावी, अशीच ही परिस्थिती आहे. तीस कोटी याचा अर्थ जवळपास एक अमेरिका आणि जगातल्या बहुतेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा मध्यमवर्ग ! जगाचे लक्ष भारताकडे ज्या इतर अनेक कारणांमुळे आहे, त्यातील सर्वात महत्वाचे कारण भारतातील वाढता मध्यमवर्ग - हे आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण हा वर्ग कसा दिसायला लागला आहे पाहा. सातआठ वर्षापुर्वी पुण्याच्या प्रसिद्ध जंगली महाराज रोडवर मॅकडोनाल्ड हे आंतरराष्ट्रीय साखळी पद्धतीचे हॉटेल सुरू झाले तेव्हा त्याची भलीबुरी चर्चा झाली होती. आता ती चर्चा मागे पडली आहे. आता तुम्ही या रस्त्यावर गेलात तर भारतीय मालाचे दुकान शोधावे लागेल, अशी परिस्थिती आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची दुकाने सजली, याचा अर्थ ती चालतात, म्हणून सजली, हे ओघाने आलेच. म्हणजे हे अपमार्केट आपल्या समाजाने केवळ स्वीकारलेच नाही तर त्यामध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी आपण धडपडतो आहोत. हे चांगले की वाईट हा मुद्दा आता राहिलेला नाही. आरामदायी प्रवास, ब्रँडेड कपडे, उंची सौंदर्यप्रसाधने, मोठी घरे आणि गाड्या ही उच्चमध्यमवर्गाची गरजच झाली आहे.
एकेकाळी सेवासुविधांचा दुष्काळ असलेल्या भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्या 120 कोटींपैकी 30 कोटी लोक , यालाच आनंदी जीवन म्हटले तर ते जीवन ते आज जगत आहेत. ज्यांना आज त्या प्रकारच्या जीवनाचे स्वप्न पडायला लागले आहे , ते त्या दिशेने वेगाने निघाले आहेत, यातही चुकीचे काही नाही. पण याचा अर्थ हा प्रवास दोषमुक्त आहे, असे म्हणता येणार नाही. त्या दोषांकडे आज दुर्लक्ष केले जाते आहे, आणि ते आपल्या समाजाला परवडणारे नाही. तीस कोटी लोकांच्या वाट्याला सुखसोयींनी बर्‍यापैकी पूर्ण असे जीवन आले, असे म्हणताना 90 कोटी लोकांच्या वाट्याला ते आलेले नाही, हे मान्य करावे लागते. विकासाची ही अपरिहार्य प्रक्रिया आहे, असे कोणी म्हणेल तर तेही मान्य करायला हवे. प्रश्न यासाठी उपस्थित करायचा की 90 कोटी लोकांच्या वाटयाला हे आयुष्य यावे, यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत किंवा त्यांच्यासाठी काही विशेष होताना दिसते आहे काय, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळते आहे.
विकासाच्या फळांचे वाटप सर्व थरातील जनतेपर्यंत झाले पाहिजे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. लोकशाही देशामध्ये अधिकाधिक लोकांच्या हिताची काळजी केली पाहिजे. अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक हित हाच तर लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे 30 कोटी लोकांचे जीवनमान उंचावले, यात आनंद मानताना उरलेल्या 90 कोटींचे जीवन उंचावण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, हे तेवढेच महत्वाचे आहे. हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की 30 कोटीचे ‘मार्केट’ हे जगाच्या दृष्टीने साहजिकच फार मोठे ‘मार्केट’ आहे. त्यामुळे ते मिळविण्यासाठीची स्पर्धा समजण्यासारखी आहे. मात्र या प्रवासात हे ‘मार्केट’ मिळविणारे उत्पादक आणि ग्राहक यांचा इतर 90 कोटींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. आपआपल्या गरजा भागवून 90 कोटींकडे दुर्लक्ष केले तरी चालू शकते किंवा त्यांची आपल्याला गरज नाही, अशी भावना तयार होऊ लागली आहे. भारताच्या ‘अपमार्केट’ ने ही चूक केली, अशी काही लक्षणे सध्या दिसू लागली असल्याने ही चर्चा आवश्यक ठरते.
मोठ्या फ्लॅट्ना मागणी आहे, असे लक्षात आल्यावर छोटे फ्लॅट बांधलेच जात नाहीत. ‘शिवनेरी’ सेवा पैसा मिळवून देते, तसा पैसा साध्या सेवेतून मिळत नाही, हे लक्षात आल्यावर त्या सेवेकडे दुर्लक्ष्य होते. काही दुकानांमध्ये प्रवेश करण्याचे नियम जाचक केले जातात. काही विशिष्ट वस्त्यांचीच खास काळजी घेतली जाते. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातल्या सेवासुविधांनाही बाजाराचे निकष लावले जातात. नागरिक म्हणून काही प्राथमिक सेवांमध्येही भेदभाव केला जातो. भेदभावाची अशी शेकडो उदाहरणे आताच दिसायला लागली आहेत. अशा भेदभावामुळे ‘अपमार्केट’ चा ग्राहक नसलेल्या माणसाच्या वाट्याला जी अवहेलना येते आहे, ती निषेधार्ह आहे. ‘अपमार्केट’ मध्ये सामील व्हा आणि लौकिक अर्थाने चांगले आयुष्य मिळवा, अशी जणू सक्ती केली जाते आहे. माणसाच्या आयुष्याला आणि त्याच्या प्राथमिक गरजांचा ‘मार्केट’ चे नियम लागू करण्याची ही धडपड सर्वसामान्य 90 कोटी जनतेवर अन्याय करणारी आहे. आधुनिक मानवाचा प्रवास समृद्ध जीवनाकडे चालला, असे म्हटले जाते. हे समृद्ध जीवन असे काही समुहापुरते मर्यादित असेल तर ते पूर्वी होतेच की. हे समृद्ध जीवन ज्यावेळी बहुजनांपर्यंत पोहचते , तेव्हाच ते अर्थपूर्ण ठरते, हे कधीही विसरता कामा नये.
- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

धोतर्‍याच्या झाडाला मोगर्‍याची फुलं येतील ?

दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीनिमित्त यावर्षी देशात आणि विशेषतः माध्यमांमध्ये जो गलबला झाला, त्यामुळे कोणीही भारतीय भारावून जाईल. गांधींना सलाम करणारी ही फौज या देशात कधी निर्माण झाली, किंवा तिचे डोके ताळावर आले की काय, असा पेच आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. खर्‍या गांधीवाद्यांना तर हर्षवायू होईल आणि गांधी तत्वज्ञानाचा यापेक्षा अधिक प्रसार करण्याची आता गरज राहिलेली नाही, या निष्कर्षापर्यंत ते येतील. नाहीतरी ते बिचारे आता थकले आहेत. गांधीवादाचे बीज लावून ते झाड वाढण्याची वाट होते. असे झाड एकदम एरंडासारखे वर आल्यावर त्यांची हिच गत होणार. आधी तो मुन्नाभाई आणि आता ही सर्व फौज अशीच ही स्पर्धा लागली आहे. हो स्पर्धाच. कारण हल्ली म्हणे स्पर्धा लावल्याशिवाय आणि कोणाला तरी जिंकल्याचे आणि अनेकांना हरविल्याचे जाहीर केल्याशिवाय महत्व सिद्ध होत नाही. तर मुद्दा असा की यांनी तर मुन्नाभाईवरही विजय मिळविला. मुन्नाभाई तरी नट होता असे म्हणता येते, त्याने काय ‘गांधीगिरी’ची भूमिका केली आणि तो पुर्वीसारखी टपोरीगिरी करायला मोकळा झाला. पण यांचे तसे नाही. यांनी मोहोर उमटवली की गांधीवादाशिवाय माणसासमोर, कुटुंबासमोर, गावासमोर, देशासमोर, जगासमोर आणि पृथ्वीसमोरही पर्याय नाही! त्यामुळे आता गांधीवादी होण्याशिवाय पर्याय नाही ! प्रत्येकाने गांधीवादी झालेच पाहिजे, असा जणू फतवाच काढला म्हणे. म्हणजे प्रत्येकाने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एकदातरी गांधीवादाचा जयजयकार केलाच पाहिजे. मग तुम्ही कोणी का असेना . गांधीजी तर चोरांनाही माफ करा म्हणायचे. हेही एक प्रकारे चोरच आहेत म्हणा. मग यांना का ते माफ करणार नाहीत ?

‘जो सर्वात गरीब आणि दुबळा मनुष्य तुम्ही पाहिला असेल त्याचा चेहरा आठवा आणि मग स्वतःला विचारा की तुम्ही जे करू पाहात आहात त्याने त्या मनुष्याचा काय फायदा होईल ?’ असे गांधीजींनीच म्हटले आहे आणि नव्या गांधीवाद्यांना हे वाक्य फार फार आवडले आहे. त्यामुळे त्यांनी ठरवून टाकले, जे काय करायचे ते त्या गरीब दुबळ्या माणसाचे नामस्मरण करूनच करायचे! सामान्य माणसासाठी यांचा जीव आता तटतट तुटू लागला आहे. पंचतारांकित हॉटेलांमधील अन्न गोड वाटेनासे झाले आहे, सर्वत्र त्या गरीब दुबळ्या माणसाचा चेहरा दिसतो आहे. परदेशवारी करा, परिषदा घ्या, मेळावे घ्या, जेवणावळी घाला, सुटबुट घाला, बक्कळ नफा मिळवा, काहीही करा... त्या गरीब दुबळ्या माणसाची सावली चैन पडू देत नाही. त्यावरचा नामी उपाय आम्ही शोधून काढला आहे. आता दोन ऑक्टोबर साजरा करू यात. कोणाला पुरस्कार देवू यात, कोणाचा सत्कार करू यात, कोणाचे , कोणाला उपकाराच्या ओझ्याखाली चिरडून टाकू. गांधी नावाचा जप करू... एका दिवसाचा तर प्रश्न आहे, मग वर्षाचे 364 दिवस आपलेच आहेत. गांधीजींचा खून करण्यासाठी!

1909 साली म्हणजे 100 वर्षांपूर्वी गांधीजींनी लिहिलेल्या ‘हिंद
स्वराज्य’ या छोटेखानी पुस्तकात गांधीजींनी या ढोंगाविषयी फार चपखल भाष्य केले आहे. ब्रिट्नमध्ये त्यावेळी कशी बजबजपुरी माजली होती, याविषयी ते लिहितातः ‘ ते लोक घटकेघटकेला विचार बदलतात. तशी तर त्या लोकांत एक म्हणच आहे की दर सात वर्षांत रंग पालटतो. घड्याळाच्या हेलकाव्याप्रमाणे ते लोक हेलकावे खात असतात, स्थिर होऊच शकत नाहीत. कोणी माणूस जरा जोरदार बोलणारा आणि आडव्यातिडव्या गोष्टी करणारा असला किंवा त्यांना मेजवान्या वगैरे देणारा असला की त्याचे ढोलके बडवायला त्यांनी केलीच सुरूवात’.

इंग्रजांच्या किंवा पाश्चिमात्य सभ्यतेचा गांधींजींनी नेहमीच कडक शब्दात समाचार घेतला आहे. कारण तीत पराकोटीचे ढोंग आणि स्वार्थीपणा त्यांना दिसत होता. भारतात त्याच सभ्यतेचा आज सुळसुळाट झाला आहे. त्यालाच प्रतिष्ठा चिटकवली जाते आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला जातो आहे. साधन आणि साध्य याचा संबंध तोडून मार्केडिंग फंडे शोधले जात आहेत. गांधीवादही या मार्केडिंग फंड्याचा भाग करण्याची बुद्धी व्हावी, या कल्पनेची कीव करावी, तेवढी थोडीच आहे. गांधीजींच्याच शब्दात सांगायचे तर धोतर्‍याचे रोप लावून मोगर्‍याच्या फुलांची अपेक्षा कशी करता येईल बरे ?