Friday, August 12, 2011

एक फुलस्टॉप !


ECONOMIC FREEDOM
WE DARE TO DREAM
चलो दिल्ली १५ अगस्त २०१२







भारत हा अतिशय समृद्ध देश होता आणि आहे, यावर ज्याचा ठाम विश्वास आहे,
देशाच्या उज्ज्वल परंपरांचा अविष्कार आजच्या दैनंदिन जीवनात जो शोधतो आहे,
कला-संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी हात पसरण्याची वेळ का, हा प्रश्न ज्याला सतावतो आहे,
प्रत्येक भारतीयाला मानवी प्रतिष्टेचे जीवन जगता आले पाहिजे, असे ज्याला वाटते,
भारतीय नागरिकाला कोणत्याही भेदभावाविना संधी मिळावी, असे ज्याचे म्हणणे आहे,

भारत ‘समृद्ध मानवी आयुष्य जगण्याची’ महासत्ता होण्याचे स्वप्न जो पाहातो आहे,
ज्याला शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशासमोरील सर्वात चिंतेचा विषय वाटतो आहे,
ज्याची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे, मात्र तेथील वास्तवाने जो अस्वस्थ आहे,
वर्तमानातले वास्तव पाहून ज्याला आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता सतावते आहे,

प्रत्येकाला प्रामाणिकपणे जगता आले पाहिजे, असे ज्याला मनापासून वाटते,
‘जगा आणि जगू द्या’ या न्यायतत्वावर ज्याचा विश्वास आहे,
आज भरल्या ताटावर बसलेल्या ज्याचा घास सारखा अडतो आहे,
नवे काही घडू शकते आणि आपणही ते घडवू शकतो, असे ज्याला मनापासून वाटते,

गर्भातच होणारी आपलीच हत्या जिला मूकपणे पाहावी लागते,
कळी उमलतानाच तिचा भाव करणारे जग जी सहन करते आहे,
महागाई फार झाली, ‘दुसर्‍या इंजिना’शिवाय पर्याय नाही, म्हणून जी बाहेर पडली आहे,
जिच्या हातात महिनाअखेर काही गिन्न्या, काही नोटा पडतात,
आणि बद्ल्यात घरातल्या अमूल्य, अतूल्य नात्याची जी परतफेड करते आहे,
जिला वाटते, हे खरे नाही, हे बदललेच पाहिजे,
पण जिच्यावर व्यवस्थेने लादली आहे, करकरीत व्यवहाराची लक्ष्मणरेषा,

केवळ माणसांची अदलाबद्ल करून देश बदलणार नाही, हे ज्याने ओळखले आहे,
स्वतःच्या हक्काचे काही घेताना लावलेले ‘मदती’चे लोबल ज्याला जाचते आहे,
समाज बदलाचे प्रयत्न ‘काहीच बदलत नाही’, म्हणून ज्याने अर्ध्यावर सोडून दिले आहेत,
मात्र जग बदलू शकते, यासाठीच्या मूलभूत बदलांवर ज्याचा विश्वास आहे,

चांगल्या शिक्षणासाठी सरकारी निधी कमी पडतो, हे कोडे ज्याला सुटत नाही,
चांगल्या आरोग्य सुविधा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, असे ज्याला वाटते,
हक्काचे घर होण्यासाठी आयुष्यच गहाण ठेवणे चांगले नाही, असे ज्याचे ठाम मत आहे,
आपल्या जगण्यावर काळा पैसाच राज्य करतो आहे, हे ज्याने ओळखले आहे,

निवडणुका हे भ्रष्टाचाराचे मूळ आहे, त्यामुळे पद्धत बदलीच पाहिजे, असे ज्याला वाटते,
एक चांगली राज्यव्यवस्था म्हणून लोकशाही शासनपद्धतीवर ज्याचा विश्वास आहे,
चांगल्या राज्यघटनेचा अंमल करण्यात देश कमी पडतो आहे, असे ज्याला वाटते,
नागरिकशास्राच्या पुस्तकातील लोकांचे कल्याण जो दररोज शोधतो आहे,

प्रत्येकाची पत वाढणे, हाच आर्थिक प्रगतीचा खरा मार्ग आहे, हे ज्याला पटले आहे,
देशातील सध्याच्या करपद्धतीत आमूलाग्र बदल झाला पाहिजे, असे ज्याला वाटते,
आणि करपद्धतीच्या गुंतागुंतीमुळे ज्याला व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे,
रोखीने होणार्‍या व्यवहारांमुळे काळा पैसा वाढ्त चालला आहे, असे ज्याला पटले आहे, 100, 500, 1000 या मोठ्या नोटा रद्द झाल्या पाहिजेत, हे अर्थशास्र ज्याला कळते, बँकमनी वाढला तरच देशात पारदर्शी व्यवहार वाढतील, असे ज्यांना वाटते,

वाडीवस्त्या, गावे, शहरांतील रस्त्यांचा निकृष्ठ दर्जा हा ज्याच्या चिंतेचा विषय आहे,
आपल्या जवळचा, प्रेमाचा माणूस ज्याने अशा रस्त्यांवर गमावला आहे,
दर 15- 20 किलोमीटरवर टोल देताना ज्याने प्रत्येकवेळी शिवी हासडली आहे,
काळीपिवळीतील गोळामोळा झालेली माणसे ज्याने उघड्या डोळयांनी पाहिली आहेत,
दररोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक व्यवस्थेचाच वापर केला पाहिजे, असे ज्याला वाटते,

टाळताच येत नाही म्हणून ज्याने मन मारून लाचही दिली आहे,
आणि मन मारुनच ज्याला व्यवस्थेने लाच घ्यायलाही लावली आहे,
आपण हे, हे आणि हे चुकीचे काम केले, या विचाराने ज्याचे डोके सून्न झाले आहे,
तरीही ज्याला आपल्या आयुष्यात ‘फिनिक्स उडी’ घ्यायची आहे,

हे आपल्यातले वाद नसून परिस्थितीने टाकलेले जाळे आहेत, हे ज्याने ओळखले आहे,
चित्र पूर्ण होतानाच ते विस्कटल्याचे दुःख ज्याच्या मनात घर करून बसले आहे,
मात्र, ज्याने स्वप्न पाहण्याचे अद्यापही सोड्लेले नाही,
जीवघेण्या स्पर्धेतले बळी ज्याने निमूटपणे पाहिले आहेत,
आज तो जात्यात तर आपण सुपात, हा फरक ज्याला कळला आहे,

चंदीमंदीच्या कृत्रिम आणि नैसर्गिक चक्रात जो भरडला गेला आहे,
सरकारच्या एका बिनडोक फटकार्‍याने ज्याचे आयुष्य उसवले आहे,
बँकेच्या एका नकाराने ज्याची स्वप्न धुळीस मिळाली आहेत,
भांडवलाच्या बिळावर बसलेल्या मालकाच्या मुजोरीने ज्याला बेजार केले आहे,
पुन्हा उठून जगण्याची संधी ज्याला सतत नाकारण्यात आली आहे,
प्रश्नांच्या गर्तेत काही प्रश्नांना उत्तरेच सापडत नाही, असे ज्याला वाटते,
जखमांवर लावण्यात येणार्‍या मलमपट्ट्यांवर ज्याचा विश्वास नाही,

ज्याला आता मूळ प्रश्नांना भिडण्याचे धाडस करायचे आहे,
ज्याला आता आपले आयुष्य नव्याने जगायचे आहे,
एकेकाला गाठून व्यवस्थेने मिंधे केल्याची सल ज्याच्या मनात आहे,
म्हणून ज्याला आता 121 कोटी भारतीयांशी नाते जोडायचे आहे,

आणि शब्दात मावणार नाही, असे आयुष्य जगत असलेल्या
121 कोटी भारतीयांसाठी, सर्वांसाठी हे निमंत्रण.....,

सध्याच्या एवढ्या सगळ्या नकारांमध्ये....
‘आहे... उत्तर आहे....’,
असे ज्या ‘अर्थक्रांती’चे वर्णन करण्यात येते.....,
त्या ‘अर्थक्रांती’ ची हाक दिल्लीत पोहचविण्यासाठी,
‘आर्थिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ सरकारला सुपूर्द करण्यासाठी,

आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट 2012 रोजी दिल्लीत भेटायचे आहे.



(‘अर्थपूर्ण’ ऑग्स्ट 2011 चे संपादकीय )

No comments:

Post a Comment