Saturday, June 1, 2013

एक प्रयोग : आत्महत्येनंतर मदतीचा आणि आत्महत्या रोखण्याचा






आपल्या देशातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येवू नये, असे सर्वांनाच वाटते, मात्र त्यादिशेने थेट प्रयत्न करणाऱ्या संस्था कमी आहेत. स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला अशी उद्हारणेही मोजकी आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने एक पाउल पुढे टाकून आपला वाटा उचलला आहे.


कोणी कितीही दावे केले तरी अन्नदात्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली, हा देशाच्या विकासावर लागलेला डाग पुसला जाणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक आणि गुजरात या विकसित राज्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाच्या चिंतेचा विषय बनला आहे. आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी सरकारी आणि खासगी सामाजिक संस्थांनी बराच अभ्यास करून काही निष्कर्ष काढले खरे मात्र आत्महत्या थांबू शकलेल्या नाहीत. त्यांचे प्रमाण कमी होते आहे, असे फारतर म्हणता येईल. गेल्या दशकात देशभरात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे आकडेवारी सांगते. देशातील शेतकरी अर्थव्यवस्थेतून कसा बाहेर फेकला जातो आहे, हे समजून घेतल्याशिवाय या समस्येचे उत्तर मिळण्याची सुतराम शक्यता नाही.
गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या एका वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा विषय मनात ताजा झाला. आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळातर्फे दीनदयाळ शेतकरी विकास प्रकल्प राबविण्यात येतो आहे. विजयराव कद्रे, प्रदीप वडनेरकर, राजीव चव्हाण, अभय मुजुमदार, धनंजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी हे काम करतात. सहा वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये या संस्थेने भाऊबिजेला ५० आत्महत्याग्रस्त कुटुबांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि मदतीसाठी पुणेकरांना आवाहन केले होते. तेव्हापासून पुण्यातून अशा कुटुंबांना मदत जाते. अशा एका मेळाव्याला तेव्हा आणि परवा मी उपस्थित होतो. त्यामुळे मधल्या सात वर्षांत नेमके काय झाले, याचे कुतूहल मनात होते.
अशा कुटुंबांच्या नेमक्या काय गरजा आहेत, हे जाणून या संस्थेने शैक्षणिक, शिष्यवृत्ती योजना, कुटुंब आधार योजना आणि समुपदेशन प्रकल्प सुरु केला होता. कुटुंबात रोजगार निर्माण करणे आणि घरचा कर्ता माणूस गेल्याच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन करणे, ही तेथील गरज असल्याचे संस्थेच्या लक्षात आले होते. आनंद याचा झाला की पहिल्या मेळाव्यानंतर संस्थेने हे काम बरेच पुढे नेले आहे. त्यातील काही ठळक कामे अशी: १. संस्थेच्या यवतमाळ येथील विवेकांनद छात्रावास आणि तेजस्विनी कन्या छात्रावासाचा यावर्षी ६३ विद्यार्थी लाभ घेत आहेत तर पुढील शिक्षण घेणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते आहे. २. संस्थेने आता १२० कुटुंबांना दत्तक घेतले असून त्यांना शेळीपालन, भाजीदुकान, शेवई यंत्र, पिठाची गिरणी, कपड्याचे दुकान, चपलेचे दुकान यासारखे व्यवसाय करण्यासाठी भांडवल पुरविण्यात येते आहे तसेच तांत्रिक मार्गदर्शन केले जाते आहे. ३. आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या केळापूर तालुक्यातील ४० गावांची निवड करून तरुण शेतकऱ्यांचे ४३ बचतगट तयार करण्यात आले आहेत. ४. जलभूमी विकास प्रकल्पांअंतर्गत ५ गावांत बंधारे बांधण्यात आले आहेत. गाळाने भरलेले बंधारे साफ करण्यास प्रोत्साहन दिले जाते. ५. सेंद्रीय शेती, कमी खर्चिक शेती आणि नैसर्गिक शेती यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात. ६. आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाला मानसिक आधाराचीही गरज असते, हे लक्षात घेऊन भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाऊन भाऊबीज आणि आवश्यक ते समुपदेशन केले जाते.
थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जी कारणे आहेत, त्यांचा विचार करून आत्महत्या रोखण्याचे काम ही संस्था करते. आत्महत्यांची कारणे नेमकी काय आहेत, याविषयीच्या सतराशे साठ अह्वालांपेक्षा त्या भागात राहणारी विचारी माणसे त्याविषयी काय म्हणतात, हे समजून घेतले पाहिजे. या संस्थेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे सांगितली आहेत ती अशी: १. परंपरागत शेती सोडून रासायनिक आणि आधुनिक शेतीसाठी होणारा भरमसाठ खर्च २. पावसावरचे अवलंबन आणि पर्यायी सिंचन व्यवस्थेचा अभाव ३. शेतीपूरक उद्योगांच्या अभावी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण अधिक ४. वेळेवर न मिळणारे भांडवल.
आपल्या देशातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येवू नये, असे सर्वांनाच वाटते, मात्र त्यादिशेने थेट प्रयत्न करणाऱ्या संस्था कमी आहेत. स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला अशी उद्हारणेही मोजकी आहेत. या पार्श्वभूमीवर दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने एक पाउल पुढे टाकून आपला वाटा उचलला आहे. मर्यादित भागात आणि स्वरूपात हे काम केले जाते आहे कारण संस्थेच्याही मर्यादा असणारच.
(संपर्कासाठी – विवेकानंद छात्रावास, रामकृष्ण नगर, मुलकी, वडगाव, यवतमाळ, ४४५००१ इमेल आयडी - dindayalytl97@gmail.com, वेबसाईट – www.deendyalyavatmal.org , फोन – ९८९०२१ ७३८७)



सामाजिक संस्था की सरकारी व्यवस्था ?
तलाव भरला की जसे आजूबाजूंच्या विहिरींना पाणी येते तसे देशाची अर्थरचना व्यवस्थित असेल तर देशातील सर्वांना न्याय मिळण्याची शक्यता असते. आज आपल्या देशाच्या अर्थरचनेत इतकी विसंगती भरली आहे की त्याचे जे दुष्परिणाम होतात, त्यात सर्वात खालच्या थरातील माणूस आधी भरडला जातो. तसा आज शेतकरी भरडला जातो आहे आणि इतरांनाही आज ना उद्या त्या जात्यात जावेच लागणार आहे. हे टाळायचे असेल तर एकूण अर्थव्यवस्थेत बदलाविषयी बोलले पाहिजे आणि आपल्यावर ही वेळ का आली आहे, याची खरी कारणेही सांगायला सुरवात केली पाहिजेत. आज दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ आणि अशा संस्था जी कामे करत आहेत, ती कामे महत्वाची असली तरी ती मुळात सरकारी व्यवस्थेची कामे आहेत आणि ती सरकारने करण्यासाठी आपले सरकार कसे सक्षम होईल आणि त्यातून समन्यायी अर्थव्यवस्था कशी प्रस्थापित होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठीचा दबावगट तयार करण्यासाठी आर्थिक साक्षरतेशिवाय पर्याय नाही. सामाजिक संस्था आर्थिक साक्षरतेविषयी बोलायला लागतील, त्यादिवशी आपण खऱ्या अर्थाने अशा समन्यायी अर्थव्यवस्थेच्या दिशेने म्हणजे या विसंगतीचे सुसंगतीत रुपांतर करण्याच्या मार्गाने चालायला सुरवात करू.

No comments:

Post a Comment