Friday, July 13, 2012

५,५०० अब्ज रुपयांचा उद्योग नैतिक पायावर उभा राहू शकतो?






उद्योग उभा करायचा याचा अर्थ भांडवल उभे करायचे. आणि भांडवल उभे करायचे याचा अर्थ पैशांच्या व्यवहारांशी खेळायचे. पैशांचा व्यवहारच मुळी जेथे खुल्या, स्थिर आणि पारदर्शी पायांवर उभा नाही, तेथे उद्योग नैतिक पायांवर कसा उभा राहू शकतो? जेथे किडूकमिडूक संसार सांभाळणारा माणूस सरळ व्यवहार करू शकत नाही तेथे ५,५०० अब्ज रुपयांचा उद्योग नैतिक पायावर उभा आहे, असे म्हणण्याची हिंमत कोण, कशी करू शकेल ?

सुमारे ५,५०० अब्ज रुपयांच्या कंपनीचे मालक असलेले रतन टाटा यांनी नुकतीच एक खंत व्यक्त केली. आपण आपल्या आयुष्यात काय केले, काय करायचे राहिले, काय करायचे ठरविले होते, डिसेंबर २०१२ मध्ये निवृत्त झाल्यांनतर काय करायचे ठरविले आहे आणि ज्या भारतात आपले साम्राज्य पसरले आहे, त्या भारतात काय होण्याची गरज आहे.... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी एका मुलाखतीत मोकळेपणाने दिली आहेत. जागतिक ब्रांड बनलेल्या टाटा समुहाचे सर्वेसर्वा काय म्हणतात, याला निश्चितच महत्व आहे. त्यातील त्यांच्या ज्या मतांचा संबंध आपल्या जीवनाशी आहे, त्याचा विचार निश्चितच केला पाहिजे. त्याची दोन कारणे आहेत, एकतर एका विशिष्ट उंचीवर विराजमान झालेल्या माणसाला दूरदूरवरचे आणि सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक काही दिसत असते आणि दुसरे म्हणजे काही खऱ्या गोष्टी बोलण्याची हिमंत त्याच्यात आलेली असते. विशेषत: निवृत्तीच्या वळणावर खरे बोलले जाण्याची शक्यता जास्त असते.
टाटा उद्योग समूहाला सारे जग एक विश्वासार्ह समूह म्हणून ओळखत असले तरी रतन टाटांनी त्याविषयी जो खुलासा केला आहे, तो मला महत्वाचा वाटतो. ‘आपण आपल्या समूहाला खऱ्या अर्थाने खुला, स्थिर आणि पारदर्शी समूह बनवू शकलो नाही’, असे टाटांचे म्हणणे आहे. ‘२ जी स्पेक्ट्रम’ मध्ये टाटा ग्रुपसाठी लॉबीस्ट म्हणून काम करणाऱ्या नीरा राडिया यांच्या संवादाच्या टेप लिक झाल्या म्हणून टाटा समूहही नकारात्मक चर्चेत आला, अशा केवळ एका घटनेमुळे टाटा असे म्हणत असतील, असे मानण्याचे कारण नाही. एवढा मोठा उद्योग उभा करण्यासाठी नैतिकतेच्या पातळीवर कराव्या लागणाऱ्या तडजोडीविषयीची कबुली त्यांनी दिली आहे. रतन टाटा असे म्हणतात याचे अनेकांना आश्चर्य वाटू शकेल, मात्र ती बाब आश्चर्य करण्यासारखी खचितच नाही.
उद्योग उभा करायचा याचा अर्थ भांडवल उभे करायचे. आणि भांडवल उभे करायचे याचा अर्थ पैशांच्या व्यवहारांशी खेळायचे. पैशांचा व्यवहारच मुळी जेथे खुल्या, स्थिर आणि पारदर्शी पायांवर उभा नाही, तेथे उद्योग नैतिक पायांवर कसा उभा राहू शकतो? जेथे किडूकमिडूक संसार सांभाळणारा माणूस सरळ व्यवहार करू शकत नाही तेथे ५,५०० अब्ज रुपयांचा उद्योग नैतिक पायावर उभा आहे, असे म्हणण्याची हिंमत कोण, कशी करू शकेल ?
आमच्या देशात प्रचंड संपत्ती, लाखो रोजगार निर्माण करणाऱ्या आणि आपल्या निव्वळ नफ्यातील ४.५ टक्के रक्कम सामाजिक कामावर खर्च करणाऱ्या टाटा समूहाविषयी आपण काही बोलावे, याला तसा काही अर्थ उरत नाही, मात्र रतन टाटा यांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर काही कळीचे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याविषयी एक भारतीय नागरिक म्हणून बोलण्याचा आपल्याला निश्चित अधिकार पोचतो. त्यासंबंधीचे काही प्रश्न असे आहेत.
१. ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत काळ्या व्यवहारांचा वाटा किमान ५० टक्के आहे, त्या देशात खुले, स्थिर आणि पारदर्शी उद्योग कसे उभे राहू शकतात ?
२. ग्राहकांना त्याच्या पैशाचा संपूर्ण मोबदला आणि समाधान देण्याची टाटा यांची इच्छा होती, मात्र त्या आघाडीवर आपण यशस्वी झालो नाही, असे ते म्हणतात. कारण निर्मिती टाटांची असली तरी करप्रणाली आणि बाजारपेठ त्यांच्या हातात नव्हती. ब्रिटिशकालीन, जुनाट आणि लूट करणाऱ्या करपद्धतीत ग्राहकांचे संपूर्ण समाधान ब्रम्हदेवसुद्धा करू शकणार नाही. मग टाटा तर त्याचे लाभधारक होते, त्यांना ते कसे शक्य होईल?
३. मूल्ये आणि नैतिकतेची कास धरूनच टाटा समुहाने प्रगती केली आणि समृद्धी मिळविली आणि तोच वारसा आपण पुढे देत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ‘समुद्रातील पाणी कोठेही प्याले, तरी ते खारे असते’, हे सत्यही कसे नाकारणार ?
४. १२१ कोटी भारतीयांना काय पाहिजे, त्यांना काय परवडते, हे पाहणे आणि त्यानुसार उत्पादन करणे, हे एक फार मोठे आव्हान असल्याचे आणि ते आव्हान आपल्या समूहाला पेलले नाही, हे ते मान्य करतात. मात्र ज्या तळातल्या ग्राहकांविषयी ते बोलतात, त्या ग्राहकांना क्रयशक्ती कोण आणि कशी देणार याचा कोण विचार करणार? त्यासाठी उद्योगांना नफेखोरी कमी करावी लागेल. ती कमी करण्याची हिमंत कोणी करू शकतो?
५. निवृत्तीनंतर रतन टाटा ग्रामीण विकास, पाण्याची बचत तसेच मुले आणि गरोदर महिलांच्या पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी काम करणार आहेत. गेल्या ६५ वर्षांत ग्रामीण भागाचे शोषण करूनच शहरे वाढली आणि त्यातच उद्योगांचे हित दडलेले आहे. याचा अर्थ ग्रामीण विकास हा स्वतंत्र विषय नसून तो विकासाच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे, हे आपण कधी मान्य करणार आहोत?
६. भारताची प्रचंड लोकसंख्या ही महाशक्ती आणि महाआपत्ती अशी दुहेरी तलवार आहे, असेही टाटा म्हणतात. २००८ च्या मंदीत तरी ती महाशक्ती असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र तिचे जीवनमान कमी दर्जाचे आहे. त्याचा दर्जा वाढविण्यासाठी तिला व्यवस्थेने क्रयशक्ती बहाल करण्याची गरज आहे. व्यवस्थेने ती द्यायची असेल तर त्यासाठी सर्वांना सामावून घेणाऱ्या अर्थरचनेचा (www.arthakranti.org) पुरस्कार करावा लागणार आहे. त्यासाठी सध्याच्या व्यवस्थेत आमुलाग्र बदलासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्याविषयी आपण बोलत नाही तोपर्यंत ही परिस्थिती कशी बदलणार आहे ?

2 comments:

  1. अत्यंत विचारप्रवर्तक लेख.

    ReplyDelete
  2. टाटांच्या विचारांवर एक छान वैचारिक... रतनजींना पुढील वाटचाली करिता खूप शुभेच्छा

    ReplyDelete