Wednesday, May 30, 2012

एक देश म्हणून आम्ही कधी सामोरे जाणार ?



देशाच्या ऐक्याच्या आणि देशप्रेमाच्या ज्या आणाभाका घेतल्या जातात, त्यांच्यात खरा किती दम आणि प्रामाणिकपणा आहे, हे पाहायचे असेल तर अशी एखादी मोहीम हाती घेण्याची वेळ आता आली आहे, ज्या मोहिमेत आमच्यातले सर्व मतभेद बाजूला पडतील आणि देशाचे हित हेच आमचे हित असे म्हणण्याची धमक तिच्यातून निर्माण होईल. देशात जणू देशप्रेमाचा वणवा पेटावा, तसे लोक या मोहिमेत भाग घेतील!

चित्रपटगृहात गेल्यांनतर सिनेमा कोणता का असेना हल्ली ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा आपण भारतीय आहोत, याची आठवण होते आणि प्रेक्षक शिस्तीत उभे राहातात. सहसा कोणी त्यात गडबड करत नाही. त्याचे एक कारण असे आहे की समोर जी चित्र येत असतात ती इतकी परिणामकारक असतात की दोन मिनिटे शांत न बसले तर आपल्यालाच आपली लाज वाटते. समोर बर्फाच्छादीत हिमालय दिसत असतो, हिमवादळ सुरु असते आणि त्या शीतलहरींमध्ये आपले जवान तिरंग्याला सलामी देत असतात. एक भारतीय म्हणून लगेच नाते जोडले जाते. देशाचे म्हणजे आपले संरक्षण करणाऱ्या जवानांची त्यानिमित्ताने आठवण होते आणि मग दोन मिनिटे शांत उभे राहा, असे कोणाला सहसा सांगावे लागत नाही. नंतर तर सिनेमाच पाहायचा असतो. त्या सिनेमात जवानांची ही आठवण कुठल्याकोठे निघून जाते. ती येते एकदम पुन्हा चित्रपटगृहात आल्यावरच ! आपल्या दैनंदिन आयुष्यात देशप्रेमाला अशी काही जागाच राहिलेली नाही. बहुतांश भारतीय नागरिकांकडे तर उदरनिर्वाहाच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी वेळच नाही. ज्यांच्याकडे वेळ आणि पैसा आहे, त्यातील बहुतेकांना स्वत:च्या पलिकडे काही दिसत नाही किंवा या परिस्थितीत देशासाठी नेमके काय करावे ते सुचत नाही. मग मेणबत्त्या लावण्यासारख्या उपक्रमांना प्रतिसाद देण्यात धन्यता मानण्याशिवाय पर्याय राहात नाही.
आज बहुतांश नागरिकांसमोर सध्याच्या परिस्थितीविषयी एक विचित्र अशी हतबलता आली आहे. आजूबाजूला जे काही घडते आहे, त्यात प्रश्नांचा गुंता वाढविणाऱ्याच घटनांचा मारा होतो आहे. प्रश्नांची उकल करणारे काहीच घडत नाही, असे नाही, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. उदाहरण घेऊ यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचे. आपण काहीच करू शकत नाही. जगातच भाव वाढले आणि रुपया घसरला तर आपण काय करणार, असा आपला प्रश्न आहे. काय करायचे ते सरकार, अशी आपली भूमिका आहे. पण मग एखाद्या किरकोळ प्रश्नाविषयी सोसायटीत का एकमत होत नाही, या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही. तेल दरवाढीचे कारण जसे जागतिक भाव आहेत, तसेच सध्याची देशातील करप्रणाली आहे. त्यामुळे केंद्रात सरकारी पक्ष आज कॉंग्रेस आहे, उद्या भाजप असेल, मात्र त्याने या निर्णयात फरक पडत नाही, हेही आता आपल्या लक्षात यायला लागले आहे. दुसरा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे तो रुपयाच्या घसरणीचा. त्याचे एक कारण आहे, वाढत चाललेली आयात. विशेषतः सोन्याची आयात. आकडेवारी असे सांगते की आपण शंभर डॉलर कमावले तर त्यातले ३० डॉलर आपण सोने आयात करण्यासाठी खर्च करतो. का म्हणून वधारणार रुपया ? अशा अनेक प्रश्नांचा गुंता आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागला आहे. पूर्वीही तो करत होता, मात्र ते लक्षात येत नव्हते. आता अशा प्रश्नांना वळसा घालून जगणे अशक्य झाले आहे.
गेल्या काही वर्षांत नेमका काय बदल झाला, ज्याने हे प्रश्न आपल्या घरापर्यंत आणून ठेवले आहेत, हे आता समजून घेतले पाहिजे. एक काळ असा होता की जागतिक घटनांचा घरावर, गावावर आणि देशावर काय परिणाम होतो, हे लक्षातही येत नव्हते. जगातल्या घटनांचा विचार न करता आपले व्यवहार सुरळीत सुरु होते. आता मात्र तेलाच्या किंमती जगाशी जोडल्या गेल्या आहेत आणि घरात आणि दारात तेल जाळल्याशिवाय जगताच येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक बाजाराचे चढउतार हे आपल्या आयुष्यातील चढउतार ठरू लागले आहेत. हे पूर्वी ३० टक्के नागरिकांना लागू होते, ते आज ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना लागू होते आहे. मग अशा परिस्थितीत खूप वेगळा विचार देशाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. तो तसा केला गेला नाही तर आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही.
आमचा देश मोठा आहे, आमची लोकसंख्या प्रचंड आहे, आमच्या गरजा त्यामुळे प्रचंड आहेत, हे मान्य करून टाकू. आम्ही सार्वजनिक वाहतुकीला प्रधान्य देवू. आम्ही डॉलरच्या वाढत्या किंमतीला देश म्हणून सामोरे जाऊ. आम्ही दागदागिन्यांचा मोह थोडा बाजूला ठेवू. आम्ही रेल्वेचे जाळे कसे चांगले होईल आणि त्यामाध्यमातून तेलाचा वापर कसा कमी होईल, असा प्रयत्न करू. देशासमोरचे कळीचे बनलेले हे प्रश्न देश म्हणून सामोरे गेल्याशिवाय सुटणार नाहीत, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. एकट्यादुकट्याने किंवा एखाद्या समुहाने कितीही आदळआपट केली तरी जे प्रश्न सुटणारे नाहीत, त्याविषयी देशपातळीवरील मानस तयार करण्याशिवाय पर्याय नाही, हे आता समजून घेतले पाहिजे.
देशाच्या ऐक्याच्या आणि देशप्रेमाच्या ज्या आणाभाका घेतल्या जातात, त्यांच्यात खरा किती दम आणि प्रामाणिकपणा आहे, हे पाहायचे असेल तर अशी एखादी मोहीम हाती घेण्याची वेळ आता आली आहे, ज्या मोहिमेत आमच्यातले सर्व मतभेद बाजूला पडतील आणि देशाचे हित हेच आमचे हित असे म्हणण्याची धमक तिच्यातून निर्माण होईल. देशात जणू देशप्रेमाचा वणवा पेटावा, तसे लोक या मोहिमेत भाग घेतील!


देशहिताच्या काही मोहिमा
१. खासगी वाहतुकीच्या मर्यादा लक्षात घेवून सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
२. सार्वजनिक स्वच्छता ही घरातल्या स्वच्छतेइतकीच महत्वाची मानू.
३. रेल्वेचे जाळे विस्तारून तेलाची बचत करून परकीय चलन वाचवू.
४. दागिन्यांचा सोस कमी करून सोन्याची होणारी विक्रमी आयात थांबवू.
५. शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या कमीतकमी वापराचे भारतीय मॉडेल तयार करू.
६. कोळसा, पाणी, युरेनियम ही नैसर्गिक साधने संपणार आहेत, याची जाणीव ठेवून वीज वापरावरील बंधने मान्य करू.

No comments:

Post a Comment