Saturday, June 9, 2012

सामील व्हा, नाहीतर शोधात निघा ...





आपल्या सर्वांच्याच वाट्याला सुखी, समाधानी आणि प्रामाणिक आयुष्य यावे, असे सर्वांना वाटत असताना ते आपल्यापासून दूर दूर का पळते आहे? आपल्या देशात खरोखरच साधन संपत्ती कमी आहे आणि तिच्या वाटपावरून संघर्ष होत असल्याने आपल्या वाट्याला तणावाचे आयुष्य आले आहे की त्याच्या वाटपात काही त्रुटी आहेत?
सर्व व्यासपीठांवर समाज आणि देशहिताच्या आणाभाका घेतल्या जात असताना प्रत्यक्षात तसे काही होताना का दिसत नाही? समानता, सुधारणा आणि विकास- हे आणि असे सगळे परवलीचे शब्द झाले असताना त्याचा प्रत्यय दैनंदिन जीवनात का येत नाही?
अचानक आलेल्या समृद्धीमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार बोकाळतोच, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून देशाची प्रगती होते की नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे म्हटले जाते, हे विधान खरे मानायचे की या किडीची मूळ कारणे शोधायची ? भारतात भ्रष्टाचार माजला आहे, असे आपण म्हणतो....म्हणजे भारतीय माणूस इथूनतिथून लाचखोर आणि भ्रष्टाचारी आहे असे मान्य करून टाकायचे का?
माणसाची वृत्ती बदलली पाहिजे, ती जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत काहीच बदल होऊ शकणार नाही, असे म्हटले जाते, ते कितपत खरे आहे? मग समाजात बदल होण्यासाठी आणखी किती दशके की शतके वाट पाहावी लागणार आहे? की हे असेच चालणार, हे मान्य करून टाकायचे आणि जगरहाटीत गुपचूप सामील व्हायचे?
सामाजिक योजनांवर, पायाभूत सुविधांवर दररोज कोट्यवधी रुपये खर्च होतो, मग यातून जी निर्मिती होते किंवा जो बदल होतो, असे आपण म्हणतो, त्या बदलाने आपले समाधान का होत नाही? आपल्या देशाच्या अर्थसंकल्पातील मोठमोठ्या आकड्यांचा आणि आपल्या आयुष्याचा किती संबंध आहे?
नागरिकांकडून ३२ प्रकारचे कर वसूल केले जात असताना सरकारच्या जमाखर्चाचा मेळ का बसत नाही? आणि सरकारचा जमाखर्च बिघडल्यावर आपलाही जमाखर्च का बिघडू लागला आहे ? महागाई खरोखरच कधी कमी होणार आहे की तिचा काही वेगळा बंदोबस्त करावा लागणार आहे?
आपल्या देशातील अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाचे व्यवहार वाढतच चालले आहेत. आता तर ५० टक्के व्यवहारांची नोंदच होत नाही, असे म्हटले जाते. या काळ्या व्यवहारांचा विचार न करता अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची काही शक्यता आहे काय? एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा सापडत आहेत. मग आपल्याकडे असलेली नोट खरी कि खोटी, हे सांगता येणे शक्य आहे काय? आणि खोट्या नोटांचे प्रमाण असेच वाढत गेले तर आपली अर्थव्यवस्था नेमकी कोठे जाऊन थांबणार आहेत?
जात, धर्म, पंथ, राज्य, भाषा, व्यवसाय असे भेद पाडून तुकड्या तुकड्यांनी जगून आजच्या आपल्या जटील प्रश्नांवर काही ठोस उत्तर सापडू शकणार आहे काय? आपण भारतीय आणि फक्त भारतीय म्हणून कधी जगू शकणार आहोत काय?
केवळ पोट भरणे, म्हणजे जगणे नाही, हे आपण मान्य केले आहे आणि भारतीय नव्हे तर मानवाचा वेगळा इतिहास लिहिण्याचा, संस्कृती जगण्याचा प्रयत्न माणसाने केला आहे. मात्र तो करताना जे संघर्ष उभे राहिले, त्यात माणूस पुन्हा पुन्हा नागडा झाला आहे आणि आजच्या आधुनिक जगातही तो पुन्हा पुन्हा नागडाच होतो आहे. जगा आणि जगू द्या, हे साधे तत्व पटण्यासाठी जणू युगानुयुगे यज्ञ सुरु आहेत . त्यातील एका यज्ञाचे नाव आहे – अर्थक्रांती. अर्थपूर्ण जगण्यासाठीचे एक अपरिहार्य साधन म्हणून आज पैसा माणसाला नागवतो आहे. मग या पैशाच्या व्यवस्थापनात या साऱ्या अगणित प्रश्नांची उत्तरे का शोधू नयेत? अशी काही उत्तरे आपल्याला या ‘अर्थपूर्ण’ त सापडतील. सापडली तर यज्ञात सामील व्हा... नाही सापडली तर नव्या यज्ञाच्या शोधात निघा.
(अर्थपूर्ण मासिकाचे जून महिन्याचे संपादकीय)

No comments:

Post a Comment