Sunday, January 8, 2012

‘आळशी’ गुंतवणूकदारांचे दिवस


कोणीतरी पैसे गमावल्याशिवाय कोणालातरी लाभ होत नाही, असे म्हटले जाते आणि ते खरेच आहे. पैसे गमावणारी ही मंडळी म्हणजेच आळशी गुंतवणूकदार. मात्र त्यांनी जागे व्हावे, असे सध्या बरेच काही घड्ते आहे. साध्या बचत खात्यावर एरवी केवळ 4 टक्के व्याज मिळते, मात्र हे व्याज वाढवून देण्याची स्पर्धा बँकांमध्ये लागली आहे. ही स्पर्धा बँका आताच का करताहेत, हे समजून घेतले पाहिजे.

आर्थिक व्यवहारात प्रवेश करणे सोपे मात्र त्यातून बाहेर पडणे अवघड असते, असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. कोणी सांगतो म्हणून आपण म्युच्युएल फंडात गुंतवणूक करतो, कधी एसआयपी काढतो, कधी पीपीएफचे अकौंट काढतो, तर कधी शेअर बाजारात डोकावण्याचा प्रयत्न करतो. गुंतवणुकीचे अनेक मार्ग असे अनेकांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून अनुसरलेले असतात. आपल्या पैशांमध्ये वाढ व्हावी, असे सर्वांनाच वाटत असते, मात्र वाढ होण्यासाठीचे टायमिंग सर्वांना साधतेच असे नाही. म्हणजे आपण गुंतवणूक केली की म्युच्युवल फंडाची एनएव्ही खाली यायला लागतात, शेअरबाजार सारखा खाली खाली यायला लागतो, पीपीएफचा व्याजदर कमी करण्याच्या हालचाली सुरु होतात आणि गुंतवणुकीच्या झाडाला पैसे लागण्याचा नाद सोडून दिला जातो. मग अनेक जण आपल्या बँकेतल्या बचत खात्याच्या गुंतवणुकीवरच समाधान मानतात. भारतासारख्या 30 टक्के इतकी बचत करणार्‍या नागरिकांमध्ये बहुतेकांची गुंतवणुकीची व्याख्या आजही बचत खाते किंवा फारतर मुदत ठेव योजनेच्या पलिकडे गेलेली नाही. या गुंतवणूकदारांना आळशी गुंतवणूकदार म्हणतात.

कोणीतरी पैसे गमावल्याशिवाय कोणालातरी लाभ होत नाही, असेही म्हटले जाते आणि ते खरेच आहे. पैसे गमावणारी ही मंडळी म्हणजेच हे आळशी गुंतवणूकदार. मात्र या गुंतवणुकदारांनी जागे व्हावे, असे सध्या बरेच काही घड्ते आहे. साध्या बचत खात्यावर केवळ 4 टक्के व्याज मिळत असते, आणि इतर सर्व गुंतवणुकीच्या मार्गांनी किमान 7 ते 15 टक्के परतावा मिळत असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात तो तेवढा मिळतोच असे नाही. अर्थात ज्यांना टायमिंग साधता येते त्यांच्या परताव्याला सीमा नसते. तर, रिझर्व बँकेने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी गेले दोन वर्षे बँकदर बदलण्याचा धडाका लावला आहे. उद्योग जगताची या मार्गाविषयी तक्रार असली तरी अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीत तुलनेने भारत स्थिर राहिला, हे मान्यच केले पाहिजे. महागाई दराचे चढे आकडे येत होते तेव्हा सर्वच चिंतेत होते, मात्र अगदी अलिकडे ते आकडेही बरे यायला लागले आहेत. त्यामुळे रिझर्व बँक बँकदर खाली आणून अधिक भांडवल उपलब्ध करून देईल, असे बोलले जावू लागले आहे. पण असे काही होण्याआधीच या आळशी गुंतवणूकदारांनी जागे होण्याची गरज आहे.

रिझर्व बँकेने अलिकडेच बचत खात्यावरील व्याजदर ठरविण्याचा अधिकार त्या त्या बँकेवर सोपविल्यामुळे ग्राहकांना अधिक व्याजदर देण्याची स्पर्धा बँकामध्ये सुरू झाली आहे. बँकांकडे असलेल्या भांडवलामध्ये बचत खात्यातील रक्कम हा एक प्रमुख मार्ग असल्यामुळे बचत खातेदार वाढविण्यासाठी बँका विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. कोटक महिंद्र आणि इंडसंड बँकेने एक लाखाच्या वर शिल्लक ठेवणार्‍यांना 6 टक्के व्याज देण्याचे तर यस बँकेने सरसकट 7 टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. रत्नाकर या बँकेनेही 5.5 टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. अधिक व्याज देणारे गुंतवणूकीचे इतर मार्ग ज्यांच्यापर्यंत पोहचलेच नाही, अशा ग्रामीण भागातील बहुतांश खातेदार हे बचत खात्यात आपली पुंजी गुंतवणूक म्हणूनच जमा करत असतात, त्यांना या स्पर्धेचा लाभ होणार आहे.

बचत खात्यावर ग्राहक जो पैसा ठेवतात, तो बँकांसाठी किती महत्वाचा असतो पाहा. एचडीएफसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या मोठ्या बँकांमध्ये बचत खात्यातील ठेवींचे प्रमाण (सीएएसए) अनुक्रमे 49.1 आणि 48 टक्के इतके आहे, तर यस बँक आणि कोटक महिंद्रामध्ये ते 10.9 आणि 27 टक्के आहे. बँकासाठी हा पैसा म्हणजे सर्वात स्वस्त भांडवल असते. बँकाची तब्बल 22 टक्के गरज त्यातूनच भागविली जाते. त्यामुळे ज्या बॅकांमध्ये बचत खात्यांचे प्रणाम अधिक त्यांना आतापर्यंत 4 टक्क्यांनी हे भांडवल वापरता येत होते, आता मात्र ग्राहकांना अधिक व्याज देण्याच्या स्पर्धेमुळे बँकांचे हे हक्काचे भांडवल महाग होणार आहे. बचत खात्यांची संख्या अधिक असणे, हे काही बँका ओझे मानायला लागल्या होत्या, मात्र इतर मार्गांनी मिळणारे भांडवल महाग झाल्याने बचत खातेदारांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच आमच्या बँकेत खाते उघडा, अशी मोहीम बँकांनी हाती घेतली आहे.

बचत खातेदार वाढविण्याच्या स्पर्धेत आणखी एक गुपित दडले आहे, ते म्हणजे गुंतविणुकीचे पुढील म्हणजे डीमॅट खाते, म्युच्युएल फंड खरेदी, एसआयपी, सोने खरेदीसारखे जे मार्ग आहेत, त्यासंबंधीच्या योजना बँकांनी राबविण्यास सुरवात केली आहे. याचा अर्थ साधा बचतदार जेव्हा मोठा गुंतवणूकदार होईल, तेव्हा तो आपल्याच खात्यामार्फत गुंतवणूक करेल आणि त्याद्वारे त्याच्या खात्यावरील उलाढाल वाढेल, अशी बँकांना आशा आहे. शिवाय एटीएम, डेबिट कार्ड, मोबाईल बँकींग, इंटरनेट बँकींगमुळे खातेदारांना सेवा देण्याचा खर्च पुढील काळात कमी होत जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची संख्या न वाढविता खातेदार वाढविणे बँकांना शक्य होणार आहे.

या बदलात एक धोका आहे, तो म्हणजे बँका ठेवींच्या प्रमाणात कर्ज देवू शकल्या नाहीत तर बँकेला नफा होण्याऐवजी तोटयाला सामोरे जाण्याची वेळ येवू शकते. कारण ठेवींवरील व्याज वाढले की कर्ज महाग होणे अपरिहार्य आहे. आधीच महाग झालेली कर्जे घ्यायला लोक घाबरत आहेत. त्या परिस्थितीत बचत खात्यावर अधिक व्याज देण्याच्या या स्पर्धेला बँका कशा सामोर्‍या जाणार, हा प्रश्नच आहे. अर्थात सामान्य म्हणजे आळशी खातेदारांनी तूर्तास अधिक परताव्याच्या गुंतवणुकीची जोखीम घेण्याऐवजी आपली जास्तीत जास्त रक्कम आपल्या बचत खात्यावर किंवा बँकठेवींमध्ये ठेवून निश्चिंत होण्याचे हेच दिवस आहेत.

No comments:

Post a Comment