Sunday, December 11, 2011

असुरक्षिततेचा भारतीय ‘सोनेरी पिंजरा’


जगाच्या पाठीवर एवढी अस्थिरता निर्माण झाली आहे की सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते आहे. ही असुरक्षितता दोनचार वर्षांपुरती असती तर समजण्यासारखे होते, मात्र भारतात ही असुरक्षितता दशकानुदशकांची झाली आहे. त्यामुळेच आपल्याला अन्न, वस्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य देणार्‍या गुंतवणुकीपेक्षा तिजोरीतील दागिने अधिक सुरक्षित वाटायला लागले आहेत. असुरक्षिततेमध्ये आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

पुण्यात परवा एक आजीबाई भल्या पहाटे ठाण्याला निघाल्या होत्या. बसमध्ये बसताना त्यांच्या लक्षात आले की दागिने असलेली पर्स दिसत नाही. त्या पर्समध्ये साडे तीन लाखांचे सोन्याचे दागिने होते. आजीबाईंनी नंतर बरीच धावपळ केली मात्र दागिने काही सापडले नाहीत. ज्या असुरक्षितेतून बाहेर पडण्यासाठी आजीबाईंनी सोन्याचे दागिने बाळगले होते, त्याच दागिन्यांनी आजीबाईंच्या आयुष्यात पुन्हा असुरक्षितता निर्माण केली आहे.

खरे म्हणजे अशा घटना या खंडप्राय देशात दररोज घडताहेत. वैयक्तिक जीवनातील या घटनांना किती महत्व द्यायचे म्हणून आपण त्या सोडून देतो, मात्र अशा छोट्या घटनांनीच त्या त्या कुटुंबांचे आयुष्य बदलून जाते. ज्या दिवशी या आजीबाईंची घटना घडली, त्याच्या दोनच दिवस आधी दोन फार महत्वाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. एक बातमी अशी होती. भारतीयांकडे सध्या 950 अब्ज डॉलरपेक्षा अधिक म्हणजे सुमारे 47 हजार 500 अब्ज रुपयांचे सोने आहे. हा आकडा म्हणजे आपल्या देशांतर्गत उत्पन्नाच्या(जीडीपी) 50 टक्के इतका प्रचंड आहे! दुसर्‍या बातमीत विदर्भ मराठवाडयात ज्या कापसाला ‘पांढरे सोने’ म्हटले जाते, त्या कापसाचे आणि सोन्याचे भाव यांची गेल्या 40 वर्षांची तुलना करण्यात आली होती. 40 वर्षांत कापसाचे भाव पंधरा पट वाढले तर सोन्याचे भाव दिडशे पट वाढले, हे त्या बातमीत स्पष्ट करून सांगण्यात आले होते. 1972 साली सोन्याचा भाव 202 होता, तो आज 29000 आहे तर कापूस त्यावर्षी 275 होता, जो आज प्रतिक्विंटल 4,200 रूपये आहे.

जगातील वाढत्या असुरक्षिततेचे दुष्ट्चक्र आपल्या आयुष्याला कसे व्यापून राहिले आहे, याचे एक सोपे उदाहरण येथे दिले पाहिजे. ज्या गावांमध्ये दररोज नळाला पाणी येते, त्या घरांमध्ये फारतर दोन दिवसांचे पाणी साठवून ठेवले जाते, मात्र ज्या गावांमध्ये चारपाच दिवसातून एकदाच पाणी येते, तेथील नागरिक सुरक्षितता म्हणून आठ दिवसांचे पाणी भरून ठेवतात. पाण्याच्या अनियमिततेमुळे स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. मात्र यातून एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. तो असा की प्रत्येकजण जास्तीत जास्त पाणी साठवतो, त्यासाठी मोठ्मोठी भांडी बाळगतो, पाणी आले की साठविलेले पाणी फेकून देतो आणि पाणी आपल्याच टाकीत जास्त पडावे यासाठी नवनव्या क्लुप्त्या करतो. परिणाम- त्या गावातील पाण्याचा साठा लवकर संपतो किंवा त्याची नासाडी होते. सर्वच नागरिक पाण्याच्या उपलब्धतेविषयी असुरक्षित होतात. आता येथे फक्त पाण्याच्या ऐवजी पैसा आणि संपत्तीचा विचार केला की जगात आणि आपल्या देशात काय गोंधळ सुरू आहे, हे आपल्या लगेच लक्षात येईल.

विचार करा की गेल्या काही वर्षांत आपल्या देशातील संपत्ती प्रचंड वाढली आहे. आपल्याकडील डॉलरच्या साठ्याने याच दशकात उच्चांक प्रस्थापित केले आहेत. (आता त्याला पुन्हा ओहोटी लागली आहे) पायाभूत सुविधा वाढल्या आहेत. काही लोकांच्या हातात चांगला पैसा खेळतो आहे. सर्व क्षेत्रात एक ‘बूम’ येवून गेली आहे. निर्यातीतही देशाने नवे विक्रम केले आहेत. तरीही आज भारतात आर्थिक क्षेत्रात ‘ट्रॅफिक जॅम’ झाले आहे. असे होण्याचे कारण काय असेल असे वाटते तुम्हाला?

एक कारण तर आपल्याला माहीतच आहे. तेलाच्या किंमती आपल्या हातात नाहीत. आपण 100 डॉलर कमावले तर त्यातले 30 डॉलर तर आपल्याला तेलावरच खर्च करावे लागतात. दुसरे कारणही आपण जाणतो. आपल्याला विकासासाठी भांडवल कमी पडते, त्यामुळे आपण परदेशी कर्ज घेतो. त्याचा हप्ता तर आपण फेडलाच पाहिजे. बाकीही बरीच कारणे आहेत. मात्र सोनेही त्याचे एक कारण आहे. भारत हा सोन्याचा चीननंतरचा सर्वात मोठा आयातदार देश असून जगातील 11 टक्के सोने भारतात आहे. देशातील 92 टक्के सोने आयातीद्वारेच देशात येते. त्यामुळे त्यासाठी देशाचा परकीय चलनाचा साठा खर्च होतो.

आता हे दुष्टचक्र काय आहे पाहा. आपल्या देशाला सर्वाधिक गरज आहे ती खेळत्या भांडवलाची. पायाभूत सुविधा, उद्योगधंदे, शेती आणि सामाजिक योजनांसाठी पैसा कमी पड्तो आहे. देशाच्या करंट खात्यातील तूट वाढत चालली आहे आणि इकडे सोन्यातील आपल्या देशाची गुंतवणूक वाढ्त चालली आहे. याचा अर्थ असा की गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिक श्रीमंत झाले. त्यांनी सोने खरेदी केले, मात्र सोने ही अशी गुंतवणूक आहे, जी संपत्तीमध्ये वाढ करते, मात्र ती आभासी असते. कारण भारतातीयांनी घेतलेले सोने सहसा विकले जात नाही, त्याचे दागिने केले जातात. अगदी टोकाच्या अडचणीच्या वेळीच ते वापरले जाते. पण तोपर्यंत त्यात प्रचंड भांडवल अडकून पडते. जीडीपीच्या 50 टक्के किंमत व्हावी, इतके भांडवल आज सोन्यात अडकले आहे.

पेच बघा कसा आहे. 121 कोटी भारतीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी देश भांडवलाच्या शोधात आहे. मात्र घराघरात ते अडकून बसले आहे. आमचे सर्व श्रम आम्ही या महागड्या धातूत रूपांतरीत केले आहेत. ज्याचा आमचे जीवनमान सुधारण्यासाठी तसा काही उपयोग नाही. पण जगाच्या पाठीवर एवढी अस्थिरता निर्माण झाली आहे की सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते आहे. ही असुरक्षितता दोनचार वर्षांपुरती असती तर समजण्यासारखे होते, मात्र भारतात ही असुरक्षितता दशकानुदशकांची झाली आहे. त्यामुळेच आपल्याला अन्न, वस्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य देणार्‍या गुंतवणुकीपेक्षा तिजोरीतील दागिने अधिक सुरक्षित वाटायला लागले आहेत. असुरक्षिततेमध्ये आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

‘सोनेरी’ आकडेवारी

- खाणींमधून 2006 पर्यंत काढण्यात आलेले सोने – 1,58,000 टन.

- अलिकडील काही वर्षे सोन्याचे वार्षिक उत्पादन – 2,500 टन.

- भारतात दागिन्यांच्या माध्यमातून असलेले सोने – 18,000 टन.

- 2010 या वर्षात भारतात विकले गेलेले सोने – 963.1 टन

- भारतीयांच्या एकूण बचतीतील सोन्याचा वाटा – 8 टक्के

- भारतीयांकडे आज असलेल्या सोन्याची किंमत – 47,500 अब्ज रुपये.

No comments:

Post a Comment