Monday, September 19, 2011

श्रीमंत देशातील सुटाबुटातील गरीब!


समृद्ध होत चाललेल्या देशाची समृद्धी आमच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दिसलीच पाहिजे. समृद्धीची बेटे उभी राहाण्यास हरकत घेण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक सेवांचा दर्जाही ‘श्रीमंत’ झाला पाहिजे. सुटबूट घालणारी माणसे आपला निम्माअधिक वेळ घराबाहेर व्यतित करतात आणि याच कमी दर्जाच्या सेवा त्यांना वापरव्या लागतात. याचा अर्थ तेही आपला ‘स्वार्थ’ साधण्यास कमी पडतात. तेही या श्रीमंत देशातील सुटाबुटातील गरीब लोक झाले आहेत!


पुण्यात ज्या भागात नवश्रीमंतांची वस्ती निर्माण झाली, त्या बाणेर-हिंजवडी भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका समारंभानिमित्त जाण्याची वेळ काही दिवसांपूर्वी आली. कोणाही माणसाने हरकून जावे, असे ते हॉटेल आहे. त्या हॉटेलमधील गर्दी पाहून आनंद झाला. इतक्या मोठ्या संख्येने अशा हॉटेलमध्ये येणे आपल्यातील श्रीमंतांना परवडते तर! अन्नपदार्थ छान होते, सजावट छानच होती, उत्साही वातावरण तयार झाले होते. हे सर्व समाधान घेवून बाहेर पडलो आणि जे दृश्य पाहिले, त्याने हॉटेलमध्ये मिळालेला सगळा आनंद शोषून घेतला. हॉटेलच्या गेटनंतरचा महामार्गापर्यंतचा रस्ता इतका भयानक होता, की खाल्लेले अन्न बाहेर पडावे. मोठा झटका बसल्यास एखादयाची पाठ, मान दुखावी. एखाद्या महागड्या गाडीचे मोठया खड्ड्यात नुकसान व्हावे. असे का व्हावे? असा प्रश्न मनात घोळायला लागला आणि लगेच त्याचा उलगडाही झाला. नंतर लक्षात आले की ही तर आमबात आहे. श्रीमंत होत चाललेल्या भारतातील आपण गरीब लोक आहोत!

गेल्या काही वर्षांत आपल्या देशातील संपत्ती वेगाने वाढली आहे. गेले किमान एक दशक असलेला विकासवाढीचा दर ही त्याची साक्ष आहे. चीननंतर याप्रकारचा विकासदर गाठणे भारतालाच शक्य झाले आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये (भ्रष्टाचाराच्या आकड्यांपासून) ही वाढ दिसायला लागली आहे. अपवाद एक क्षेत्र आहे. ते आहे सार्वजनिक क्षेत्रातील सेवा. सार्वजनिक क्षेत्रातील सेवासुविधांचा दर्जा मात्र कमालीचा घसरला आहे. फोर्ब्जच्या यादीतील भारतीयांची संख्या वाढली, देशातील कोट्यधीश वाढ्ले, विमानप्रवास करणार्‍यांची आणि क्रेडिटकार्ड वापरणार्‍यांची संख्या वाढली, महागड्या शाळा आणि हॉस्पीटले वाढली, याप्रकारची आकडेवारी माध्यमांमध्ये येत नाही, असा दिवस सापडणार नाही. पण मग सार्वजनिक सेवांचा दर्जा का घसरला आहे?

लक्षात असे येते की या सेवा आता श्रीमंत माणसे वापरतच नाही. मात्र कोणी कितीही श्रीमंत असला तरी सार्वजनिक रस्त्यांवर यावेच लागते, गाडी कितीही भारी असली तरी त्याच रस्त्यावरून चालवावी लागते. आपण राहतो, त्या शहरापासून कितीही फटकून राहाण्याचा विचार केला तरी त्या शहरतील प्रदूषणापासून सुटका होत नाही. हे जे लोकशाहीतील अपरिहार्य अवलंबित्व आहे, यातून कोणाची सुटका नाही तर!

औरंगाबाद शहरातील सव्वाशे जणांनी एकाच वेळी मर्सिडीज बुक केल्या आणि एकाच दिवशी या शहरात एवढ्या मोठ्या संख्येने मर्सिडीज येण्याचा विक्रम झाला, त्यावेळी ती एक राष्ट्रीय बातमी झाली. 12-13 लाखाच्या शहरात खरोखरच ही नवलाई होती. मात्र आता त्या मर्सिडीज शहरात चालवाच्या तर चांगल्या रस्त्यांचा पत्ता नाही. मर्सिडीज चालविण्याचे समाधान मिळणार कसे? मनात प्रश्न आला की मर्सिडीज विकत घेण्यासाठी इतके जण एकत्र येवू शकतात, तर शहरातल्या सोयी वाढण्यासाठी का एकत्र येवू शकत नाही? औरंगाबादेत मागणी असूनही शहर बससेवा नीट चालू शकत नाही. जी गत औरंगाबादची तीच जळगावची. येथे तर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची तयारी गेली 8-10 वर्षे सुरू आहे. नाकापेक्षा मोती जड घालण्याचा अट्टाहास नडला आणि साधे विमानतळही होऊ शकले नाही. जळगाव शहर व्यापारी शहर आहे, श्रीमंत शहर आहे, सोन्याचा व्यापार करणारे, नगदी पिकांचे शहर आहे, पण म्हणून त्यात काही वेगळेपण आहे का, असे विचाराल तर नन्नाचा पाढा. तेथेही रस्त्यांची तीच अवस्था. तीच गत नाशिकची. सुवर्णत्रिकोण म्हणून नाशिकच्या विकासाचा बोलबाला सुरू आहे, मात्र शहर फिरताना तसा अनुभव येत नाही. आपला मतदारसंघ म्हणून भुजबळसाहेबांनी नाशिक, येवला, लासलगाव भागात जे झुकते माप टाकले,( जे राज्याचे नेतृत्व करताना अपेक्षित नाही) ते सोडले तर नाशिकमध्ये समृद्धीची बेटे दिसतात, मात्र सर्वसामान्य माणसाच्या सुविधांची हेळसांडच दिसते. खरेतर भारतातल्या प्रत्येक शहराची अवस्था हिच आहे. एकीकडे समृद्ध बेटे तयार करून त्याच्या बाहेर जावेच लागू नये, असे प्रयत्न देशातील सत्ताधारी आणि श्रीमंत करताना दिसतात, मात्र त्यांना एक ना एक दिवस सार्वजनिक रस्त्यांवर यावेच लागते. या रस्त्यांवरचे जे दुःख आहे, ते त्यांच्याही वाट्याला कधीतरी येतेच.

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन घोडागाडीतून एकदा फिरायला निघाले. जाता जाता त्यांना रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली जीर्ण कपड्यातला माणून पोटाशी पाय घेवून थंडीने कुडकुडताना दिसला. लिंकन यांनी गाडी थांबविली. आपला वुलनचा ओव्हरकोट त्याच्या अंगावर पांघरला. समाधानाने दोघांनी एकमेकांकडे पाहिले. घोडागाडी सुरू झाल्यावर कोचमनने अध्यक्षांना विचारले, ‘साहेब, तुम्हीच म्हणालात की प्रत्येक माणून स्वार्थी असतो. मग आपण आपला कोट त्या माणसाला का देवून टाकला?’ त्यावरचे लिंकनचे उद्गार मोठे मार्मिक आहेत. लिंकन म्हणाजे, ‘ त्या माणसाला तसेच कुडकुडत सोडले असते, तर मला झोप आली नसती. आता मला शांत झोप येईल. मला शांत झोप यावी या स्वार्थापोटी मी त्याला माझा कोट पांघरला.’ स्वार्थच रक्तात असलेल्या अमेरिकेकडूनच या गोष्टी भारतीय समाजाने शिकल्या पाहिजेत, असे मला अजिबात वाटत नाही, मात्र आज देशाची समृद्धी जनजीवनात दिसलीच पाहिजे, हा आपलाच स्वार्थ असे आमच्या देशातील समृद्ध बेटांना का वाटत नाही?

समृद्ध होत चाललेल्या देशाची समृद्धी आमच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दिसलीच पाहिजेसमृद्धीची बेटे उभी राहाण्यास हरकत घेण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक सेवांचा दर्जाहीश्रीमंतझाला पाहिजे. सुटबूट घालणारी माणसे आपला निम्माअधिक वेळ घराबाहेर व्यतित करतात आणि याच कमी दर्जाच्या सेवा त्यांना वापरव्या लागतात. याचा अर्थ तेही आपलास्वार्थसाधण्यास कमी पडतात. तेही या श्रीमंत देशातील सुटाबुटातील गरीब लोक झाले आहेत!

1 comment:

  1. फारच अचूक आणि हटके निरीक्षण नोंदवल आहे...

    ReplyDelete