Tuesday, July 12, 2011

मूळ बदलांसाठीच्या लढाईचे धाडस कोण करणार ?






देशातील अलिकडच्या काळातील घटनांनी ‘अर्थक्रांती’ ला फार मोठे बळ दिले आहे. सर्वांच्या गाड्या वेगाने पळतात आणि ‘अर्थक्रांती’ चा स्वीकार न केल्यामुळे पुढे जावून पंक्चर होतात, असे चित्र दिसायला लागले आहे आणि पुढेही काही काळ हेच चित्र दिसत राहणार आहे. ‘अर्थक्रांती’ च्या प्रस्तावांना खोडता तर येत नाही आणि स्वीकार करायचा तर मूलभूत बदलांचा स्वीकार करण्याचे धाडस नाही, असा हा पेच आहे.






दररोजची वर्तमानपत्रे वाचली आणि दूरचित्रवाणीवरील बातम्या ‘पाहिल्या’ की वाटते, जग क्षणाक्षणाला बदलते आहे ! असे वाटते - आज आहे, ते उद्या राहणार नाही. माणसे, यंत्र, कार्यालये, सरकारे, व्यवस्था ..... सगळे काही बद्लत चालले आहे. या बातम्यांकडे जरा लक्षपूर्वक पाहिले की लक्षात येते असेच पूर्वी कधीतरी वाचले आहे. हेच पूर्वी कधीतरी पाहिले आहे. आज जे वाचतो आहे, त्याचे काही शब्द तेवढे नवीन आहेत. मांडणी नवीन आहे. काही माणसांचे चेहरे नवीन आहेत, मात्र आशय तोच आहे. काहीतरी बदलणार याचा ‘बँडबाजा’ कोणीतरी वाजवितो आहे एवढेच.. कधी कधी तर आज ‘जिंदाबाद’ म्हणणारी माणसे काल ‘मुर्दाबाद’ करताना आणि काल ‘जिंदाबाद’ करणारी माणसे आज ‘मुर्दाबाद’ करताना दिसली आहेत. बदलाच्या या हाका इतक्या कानठ्ळ्या बसविणार्‍या आहेत की आपण सामान्य माणसे त्यावर विश्वास ठेवायला लागतो. काही क्षण हुरळून जातो. त्या आवाजात आपला आवाज मिसळण्याचा प्रयत्न करतो. अमंगळ जावो आणि सर्वांचे कल्याण करणारे मंगल येवो, अशी प्रार्थना करतो. काही दिवस निघून जातात, जगण्याच्या लढाईत आपण हरवून जातो. आणि पुन्हा त्याच हाका पुन्हा ऐकायला येतात. तोपर्यंत बदलासाठी आपण इतके आसुसलेलो असतो की आपण याच बदलासाठीच्या आवाजाला एकदा साद दिली होती, हेही विसरून जातो. मग लक्षात येते की बदलाच्या ‘बँडबाजा’ने जगण्याच्या लढाईची तीव्रता काही संपत नाही, उलट ती अधिकच तीव्र होत जाते आहे. वेळ अशी येते की काही सकारात्मक बदलेल यावरचा विश्वासच उडून जातो.


चूक ‘बँडबाजा’ वाजविणार्‍यांची तर आहेच, पण आपलीही आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बदलासाठी मुळातून काहीतरी बदलावे लागते, हेच आपण विसरून गेलो आहोत. लढाई लढायचीच आहे तर मुळातून काही बदलण्याची लढाई लढावी लागणार आहे. परिस्थिती बदलली पाहिजे, व्यवस्था बदलली पाहिजे, अशी अपेक्षा आपण करतो आहोत. आपल्याला वाटते, माध्यमांमध्ये एवढे धूमशान चालले आहे, म्हणजे काहीतरी बदलतच असणार की ! अगदी काहीच बदलत नाही, असे नाही. मात्र लढाई जिंकल्याची हाकाटी पिटविण्याच्या लायकीचे हे बदल नाहीत, एवढे नक्की.

राजधानीत आणि नंतर देशभर गेले काही दिवस जे चालले आहे, ते असेच त्याच त्याच धून वाजविणारे बँडबाजे आहेत. याची प्रचिती एका वर्षभरात देशाला येईलच. देशाची व्यवस्था बदलायची म्हणजे काही माणसे आळीपाळीने बदलत राहायची, असे काहीजण मानायला लागले आहेत. वाईट कोणाला म्हणायचे? राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि आता मनमोहनसिंग... ही काय वाईट माणसे आहेत? माणसे बदलून व्यवस्था बदलत असती तर देशात आजचे हे ओंगाळवाणे चित्र दिसले नसते. जीवन जगण्याचा संघर्ष एवढा तीव्र झाला नसता. उद्या काय होईल, या भीतीने माणसे हबकून गेली नसती. सामान्य माणूस मूलभूत सुखसोयींपासून आजही वंचित आहे, ही नामुष्की स्वीकारण्याची वेळ आपल्यावर आली नसती. महागाईचा राक्षस गाडून टाकल्याच्या बाता मारताच त्या राक्षसाने पुनःपुन्हा आपले अस्तित्व दाखवून दिले नसते. या आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत देशात मानवी जीवनाची अप्रतिष्ठा क्षणोक्षणी अनुभवास आली नसती.


समाधानाची गोष्ट अशी की आपल्यातल्याच काही शिलेदारांना मुळातून बदलाचे हे महत्व कळू लागले असून दररोजच्या झगमगाटापासून दूर राहून त्यांनी खर्‍या बदलांची पेरणी सुरू केली आहे. ज्या सर्वसामान्य माणसासाठी हा बदल आहे, त्याला सोबत घेवून ही माणसे आणि त्यांच्या संस्था मूलभूत बदलाची कास धरत आहेत. नव्या प्रश्नांचा अभ्यास करून त्या प्रश्नांची नवी उत्तरे शोधत आहेत. येत्या दोनचार वर्षांचाच विचार करण्यापेक्षा पुढील दोनचार दशकांचा विचार करुन पुढील पिढीसमोर त्यांचे खरे भवितव्य ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या व्यवस्थेने सर्वांना ग्रासले आहे, त्या व्यवस्थेत सकारात्मक मात्र मूलभूत बद्ल करून माणसांना मानवी प्रतिष्ठेचे जीवन देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आम्ही आमचे शिक्षण, आरोग्य, शेती आणि एकूणच आयुष्याला थिगळे लावण्याचा जो प्रघात पाडला आहे, त्याला फाटा देवून मूळ प्रश्नांना भिडण्याचे धाडस दाखविण्याची वेळ आता आली आहे. असा विचार करणारे आपण एकटे नाहीत, याची सर्व सुजाण नागरिकांना जाणीव व्हावी आणि अंतिमतः देशातल्या 121 कोटी जनतेला शांत, समृद्ध, आणि प्रामाणिक जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करणारी अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या पाच प्रस्तावांची चळवळही (www.arthakranti.org) अशाच कळीच्या प्रश्नांना उत्तरे देणारी चळवळ आहे.

अलिकडच्या घटनांनी ‘अर्थक्रांती’ ला फार मोठे बळ दिले आहे. सर्वांच्या गाड्या वेगाने पळतात आणि ‘अर्थक्रांती’ चा स्वीकार न केल्यामुळे पुढे जावून पंक्चर होतात, असे चित्र दिसायला लागले आहे आणि पुढेही काही काळ हेच चित्र दिसत राहणार आहे. ‘अर्थक्रांती’ च्या प्रस्तावांना खोडता तर येत नाही आणि स्वीकार करायचा तर मूलभूत बदलांचा स्वीकार करण्याचे धाडस नाही, असा हा पेच आहे.

1 comment:

  1. अर्थक्रांती झाली तरच व्यवस्थेचा डोलारा समतोल साधेल. अन्यथा भूक आणि शिळ अन्न यातील दुरावा वाढतच जाईल.

    ReplyDelete