Wednesday, February 3, 2010

कशासाठी ?...हातांसाठी...

मला काम द्या, एखाद्या किसानाचे, माळ्याचे ज्यामुळे माझा अभिमान वाढेल खडकाळ जमिनीला नंदनवन बनविण्याचे अखंड अथक परिश्रम करून, फक्त एवढेच म्हणा,
अत्यंत चिकाटीने
तू तुझे काम केलेस........

प्राच्य विद्येचे अभ्यासक,भाषाशास्त्रविषयक सिध्दांताचे बीज रोवणारे सर विल्यम जोन्स यांच्या या ओळींची आठवण आज होण्याचे कारणच तसे आहे. अठराव्या शतकात होउन गेलेल्या जोन्स यांनी हातांना कामाची मागणी केली होती, आज अमेरिकेतला अत्याधुनिक आणि भारतातला आधुनिक समाज एकविसाव्या शतकात पुन्हा कामाचीच मागणी करतो आहे. अमेरिकेचे बराक ओबामा असोत, महाराष्ट्राचे अशोक चव्हाण,राज ठाकरे असोत किंवा टिंबक टू देशाचे कोणी प्रमुख असोत... लोकांच्या हाताला काम देणे , हीच आज त्यांच्यापुढील चिंता आहे. परप्रांतीयांची घुसखोरी, भाषेची अस्मिता,भुमिपुत्रांना न्याय, आउटसोर्सिंग.. अशी नावे काहीही द्या... हे सर्व शब्द वेगळे वाटत असले तरी ते लोकांच्या हातांना काम मागत आहेत.

मुंबईतील टॅक्सीचालकांना मराठी आलेच पाहिजे, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला की नाही ,हे आता सांगता येणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी दुस-याच दिवशी शब्दांची कसरत करून त्याचा इन्कार केला आहे. तर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावरून त्याच्याशी भाषेची अस्मिता जोडली आहे. बाकींच्यांनी हात पोळतील म्हणून गप्प राहणे पसंत केले आहे. आता असे नवेनवे मुद्दे समोर येत आहेत. कारण मुळ मुद्दयाला हात लावण्याची कोणाची हिमंत नाही.मुळ मुद्दा आहे हातांना काम मिळण्याचा आणि त्याविषयी क्रांतिकारी बदलांना सामोरे जाण्याचा. जगाच्या विकासाची दिशा हल्ली अमेरिकेकडे तोंड करून ठरविण्यात येते, त्या अमेरिकेतही अध्यक्ष बराक ओबामा यांना पहिला अर्थसंकल्प मांडतांना ‘भुमिपुत्रां’च्या हातांना काम देण्यास प्राधान्य द्यावे लागले. जागतिकरण असेच चालू ठेवले तर ते अमेरिकेच्या हिताचे नाही, असे बराक ओबामांनी विरोधी बाकांवर बसून म्हटले होते, पण आता खरोखरच जागतिकरणाचे चाक उलटे फिरवण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. तात्पर्य अमेरिकाच आपली आदर्श असली तरी लोकांच्या हातांना काम देणारा विकास हाच खरा विकास मानला पाहिजे.

महाराष्ट्रात किती उद्योग येत आहेत, दरडोई उत्पन्न किती वाढले आहे, नागरीकरण किती वेगाने होते आहे, किती उड्डाणपुल उभारले जात आहेत, वीजवापर किती वाढला आहे.. हे सर्व जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच रोजगारसंधी किती वाढल्या, हेही महत्वाचे आहे. विकासाच्या पाश्चिमात्य निकषांमुळे संपत्तीत झालेल्या वाढीलाच आपण विकास म्हणायला लागलो आहोत. त्या संपत्तीमध्ये आमच्या कोट्यवधी बांधवांचे मन आणि हात गुंतत नसतील तर त्याला विकास म्हणता येणार नाही.मन आणि हात गुंतले नाहीत म्हणून अस्मितेचे मुद्दे महत्वाचे ठरू लागले आहेत.

रोजगारासंबंधीचे फार वेगळे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसते आहे. ग्रामीण भागामध्ये शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. कारण शहरात चांगली मजुरी मिळत असल्याने ते शहरांकडे येत आहेत. शहरात मध्यम स्वरूपाची कामे करायला चांगली माणसे मिळत नाहीत कारण त्यांना तुलनेने चांगला मोबदला मिळत नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगार वाढतो आहे , पण ती कौशल्ये असणारे उमेदवार नाहीत, कारण त्याप्रकारचे शिक्षण महाग झाले आहे. ज्यांनी ती मिळवली ती माणसे इतका पैसा मिळवत आहेत की इतरांना आपल्या जगण्याची लाज वाटावी. संपत्ती आणि रोजगाराची निर्मिती होते आहे मात्र ती ‘भुमिपुत्रां’ च्या वाट्याला येत नाही. कारण त्यांची भाषा, त्यांची कौशल्ये जीवनाचा अर्थव्यवहार पुर्ण करण्यास समर्थ नाहीत.याचा अर्थ अस्मितेचा मुद्दा करायचाच असेल तर तो आपल्या भाषेत अर्थव्यवहार होतील, असा करावा लागेल. रोजगार देणारी कौशल्ये भुमिपुत्रांना द्यावी लागतील.

‘जग एक झाले आहे’ असे आपण म्हणतो , त्याची अशी विचित्र प्रचिती सध्या येवू लागली आहे. महाराष्ट्रासारख्या... विकसनशील राज्याचे प्रश्न आणि ‘अतिप्रगत’ अमेरिकेचे प्रश्न सारखेच. त्यांनाही हातांना काम हवे आहे आणि आम्हालाही। तेथेही भुमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि येथेही। तेथेही सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि येथेही। याचे प्रमुख कारण असे आहे की भांडवलशाहीने जगात प्रचंड संपत्ती निर्माण केली आहे मात्र जगातील बहुजन भांडवलदारांच्या नफेखोरीचे केवळ साधन झाला आहे. ना त्याच्या वाट्याला रसरशीत जीवन आले ना सर्वांच्या हातांना काम मिळाले। महाराष्ट्राची आकडेवारी सांगते की ते एक ‘श्रीमंत’ राज्य आहे... पण मग त्या ‘श्रीमंती’मध्ये आमची भाषा, आमची संस्कृती बसत नाही। मग ही कसली आली आहे ‘श्रीमंती’?
‘मानवी समाजात सर्व प्रकारच्या अतिरेकात संकट नेहमीच दबा धरून बसलेले असते’ असे म्हणतात. तसे काहीसे आमच्या समाजाचे होते आहे. भाषा, संस्कृतीच्या आक्रमणाने १२ कोटींच्या या समाजाला दुबळे करून सोडले आहे. एकजूट करून या आक्रमणाविरूध्द लढण्याची त्याची क्षमता क्षीण होत चालली आहे. एकमेकांविषयीची संवेदना व्यवहारवादाशीच जवळीक साधायला लागली आहे. मग अधिकाधिकांच्या हातांना काम मिळाले पाहिजे , हा मुद्दा महत्वाचा न ठरता नफेखोरी महत्वाची ठरते. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हा इशारा देवून ठेवला आहे. त्यांनी नेहमीच हातांना काम हा प्राधान्यक्रम महत्वाचा मानला. शिक्षणातही त्यांनी ‘जीवन शिक्षणाचा’च आग्रह धरला. त्यात मातृभाषेला महत्व देण्यास सांगितले. त्या ‘जीवनशिक्षणा’पासून आपण दूरदूर पळत राहिलो आणि आता पुन्हा त्याच चौकात येवून पोहचलो. जेथे जगभर जीवनशिक्षण आणि पर्यायाने हातांसाठी कामाची मागणी होत आहे....या मुळ विषयाला आपण जोपर्यंत प्रामाणिकपणे हात घालत नाही तोपर्यंत अगतिकता अपरिहार्य आहे आणि त्यामुळेच अस्वस्थताही। ही अस्वस्थता नेते बोलून दाखवताहेत त्यापेक्षा कितीतरी पट बहुजनांमध्ये आहे, हे वेळीच लक्षात घ्यावे लागेल.

2 comments:

  1. छान लिहिले आहे.आवडला लेख.
    gangadharmute.blogspot.com

    ReplyDelete
  2. बुध्दीला काम हवे
    विचाराला भान हवे
    मनाला छंद हवा
    शरीराला व्यायाम हवा
    सारेच जर रिकामे
    तर कोण पुसणार कुणाला
    दे दान
    विसर स्वतःला
    घे झाकून समाजात
    घे लेखणी
    कर लिखाण
    घे वसा
    हाच वारसा

    see my blog
    http://subhashinamdar.blogspot.com/2010/02/blog-post_2393.html

    ReplyDelete