Monday, March 18, 2013

चला, ‘तोडपाणी’ करणाऱ्यांना धडा शिकवू !





राजकारणात विरोधात म्हणजे खासगी जीवनात वैमनष्य असण्याचे कारण नाही, हे तर सर्वांनाच कळते, मात्र गेले काही वर्षे ज्या ‘सेटलमेंट’ किंवा ‘साटेलोटे’ किंवा ‘तोडपाणी’ सुरु आहे, त्या समन्वयाला जगात तोड नाही. त्याचाही आता इतका अतिरेक झाला आहे की कोणीतरी कोणाच्या तरी शेपटावर पाय ठेवणार आणि त्यातून निवडणुकीपूर्वी बऱ्याच भानगडी बाहेर येणार. सामान्य माणसाने आता अशा भानगडीच्या भेंडोळ्या तयार करून ढोंगी नेत्यांना फेकून दिले पाहिजे.





आधी स्पष्ट केले पाहिजे की देशातील आजचे सर्व प्रश्न राजकीय नेत्यांमुळेच आहेत, हा भ्रम सर्वसामान्य भारतीय माणसाने मनातून काढून टाकला पाहिजे. राजकीय नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे, मात्र आपण त्यांची जागा घेतली किंवा आज फुरफूर करणारे नेते सत्तेवर आले म्हणजे क्रांतीकारी बदल होण्याची शक्यता नाही. परिस्थीतीच अशी येवून ठेपली आहे की आजच्या जटील प्रश्नांची सोपी उत्तरे मिळण्याची शक्यता राहिलेली नाही. या परिस्थितीचे वर्णन एका मित्राने फार सोप्या शब्दात केले आहे. तो म्हणाला की घरात आता इतके ढेकूण झाले आहेत की एखाददुसऱ्या फवाऱ्याने ते नष्ट होणार नाहीत. फवारा मारला की ते आत दबा धरून बसतात आणि फवाऱ्याचा परिणाम संपला की पुन्हा बाहेर मुक्तसंचार करतात. त्याच्या मते देशाचेही आता तेच झाले आहे. अशावेळी ढेकूण लपण्याच्या सर्व जागा जाळूनच टाकाव्या लागतात. म्हणजे तोच जालीम उपाय ठरतो!
बापरे.... म्हणजे देश जाळायचा की काय ? अगदी तसे नाही, पण आता जालीम उपाय केल्याशिवाय जनतेचे म्हणजे आपले प्रश्न सुटणार नाहीत, या निष्कर्षाप्रत जाणती माणसे आली आहेत. लाचखोरी, काळा पैसा, दहशतवाद, निकृष्ठ प्रशासन आणि दारिद्र्य हे आपल्या देशासमोरील कळीचे प्रश्न मानले तर त्यावर काही एका दिवसात उत्तर मिळणार नाही, हे सर्वांनाच कळते. या प्रश्नांची उत्तरे दीर्घकालीन आहेत, याचेही आपल्यापैकी बहुतेकांना भान आहे. तरीही कधीकधी असे वाटते की झटपट न्याय मिळाला पाहिजे. देशात आमुलाग्र बदल झाला पाहिजे. म्हणूनच काही लोक अण्णा हजारेंना साथ देतात, काही जण रामदेवबाबा आता काय करणार याची वाट पाहतात तर काही जण केजरीवाल कोठे आहेत, याचा शोध घेतात. या तिन्हीही नेत्यांची आंदोलनांनी अर्धविराम घेऊन आता बराच कालावधी लोटला आहे. आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या थेअरीने जायचे तर आता त्या ऐतिहासिक आंदोलनांचे विस्मरण होण्याइतका काळ तर निश्चितच उलटून गेला आहे. पण मग करायचे काय ?
देश बदलला पाहिजे, मात्र सामान्य भारतीय माणूस हतबल आहे. यातूनच एका नवीन मार्गाचा शोध नुकताच लागला आहे. मला वाटते, आता जुने सर्व मार्ग सोडून सर्वांनी हाच मार्ग राजमार्ग करून टाकला पाहिजे. तो मार्ग असा की काही चतुर राजकीय नेत्यांनी आतापर्यंत जनतेत फूट पाडून जनतेला जसे झुलवत ठेवले, तसे आता जनतेने राजकीय नेत्यांच्या भांडणात सतत तेल ओतत राहिले पाहिजे. कारण ते जोपर्यंत भांडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या भानगडी बाहेर येत नाहीत. आताचे राजकारण, अर्थकारण हे सामान्य माणसापासून इतके दूर गेले आहे की त्यातील त्याला काहीच कळेनासे झाले आहे. एका पहेलवानापुढे तितकाच तुल्यबळ पहेलवान उभा केल्याशिवाय सामना निकाली होण्याची सुतराम शक्यता राहिलेली नाही. घडणाऱ्या घटनांमध्ये नेमके राजकारण कोणते, समाजकारण कोणते, अर्थकारण कोणते आणि नेमका विकास कशाला म्हणायचा, हेच कळेनासे झाले आहे. एक गोष्ट पक्की आहे, ती म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
राजकारणात विरोधात म्हणजे खासगी जीवनात वैमनष्य असण्याचे कारण नाही, हे तर सर्वांनाच कळते, मात्र गेले काही वर्षे ज्या ‘सेटलमेंट’ किंवा ‘साटेलोटे’ किंवा ‘तोडपाणी’ सुरु आहे, त्या समन्वयाला जगात तोड नाही. त्याचाही आता इतका अतिरेक झाला आहे की कोणीतरी कोणाच्या तरी शेपटावर पाय ठेवणार आणि त्यातून निवडणुकीपूर्वी बऱ्याच भानगडी बाहेर येणार. सामान्य माणसाने आता अशा भानगडीच्या भेंडोळ्या तयार करून ढोंगी नेत्यांना फेकून दिले पाहिजे.
तात्पर्य – भानगडी करणाऱ्या नेत्यांना आपल्या या ‘कटा’ची कल्पना न देता त्यांच्यात जुंपवून देणे. सर्व भानगडी बाहेर आल्याशिवाय ‘सेटलमेंट’ होणार नाही, याची काळजी घेणे. विशेषत: दुसऱ्याकडे कशी प्रचंड संपत्ती, बंगले, जमीन आणि महागड्या गाड्या आहेत आणि त्यामुळे तोच कसा मोठा नेता आहे, यावरून त्या दोघांचाही जळफळाट होईल, असे वातावरण मतदारसंघांत तयार करणे.
(देश आणि समाजातील विधायक बदलांसाठी राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांची क्षमा मागून)


हजारो अनुत्तरित प्रश्नांतील काही प्रश्न
- माझे होर्डिंग लावल्यास याद राखा, असे अजित पवार आणि राज ठाकरेही म्हणाले होते, त्याचे काय झाले?
- टोलनाके बंद करणार, असे राज ठाकरे अनेकदा म्हणाले होते, त्याचे काय झाले?
- स्वच्छ प्रतिमेच्या भारतीय जनता पक्षावर आपल्याच नेत्यांच्या भ्रष्टाचाराविषयी गुळमुळीत भूमिका घेण्याची वेळ का आली आहे ?
- दुष्काळात महागडे लग्न समारंभ आणि पार्ट्या करणारे नेते सर्वच राजकीय पक्षात कसे? विशेषत: त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये त्यांचा भरणा अधिक का ?
- नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात कोणत्या देशहिताच्या प्रश्नावर चर्चा झाली असेल ?
- ‘तोडपाणी’ केले असते तर ‘कोहिनूर मिल’ खरेदी केली असती, या एकनाथ खडसे यांच्या राज ठाकरे यांच्या आरोपाचा नेमका अर्थ काय घ्यायचा ?
- सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनाच शेकडो एकर जमीन कशी विकत मिळते ?
- औरंगाबादमधील शिवसेना- भाजप युती आणि नाशिकमधील मनसे- भाजप युती यात आणि त्यांच्या कारभारात नेमका काय फरक आहे ?


No comments:

Post a Comment