Saturday, September 28, 2013

शून्य व्याजदराचे जागतिक गुपित !





पैसा कोठून येतो, कसा तयार होतो, याच्या मुळाशी न गेलेली माणसे अर्थव्यवस्थेवर आज कब्जा करून बसलेली आहेत, त्यामुळे जागतिक आर्थिक पेचप्रसंग कसा संपणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे शिक्षण घेतलेले तरुण सरकारमध्ये सनदी अधिकारी, माध्यमात तज्ञ आणि बँकांत अधिकारी म्हणून बसतात आणि नव्या आर्थिक संकटांना निमंत्रण देतात. भारतातल्या अर्थक्रांतीसारख्या ब्रिटनमधील ‘पॉझीटिव्ह मनी’ ही चळवळ म्हणूनच पैशाचा वेगळा विचार करण्याचा आग्रह धरते आहे.


शून्य व्याजदरात वस्तूंची खरेदी करा, अशा जाहिराती केल्या जातात आणि आपल्याला खरोखरच शून्य व्याजदराने पैसे वापरायला मिळतात, असा ग्राहकांचा समज होतो. तो सणासुदीला खरेदी करतो आणि किमान ३ ते ७ टक्के व्याजाने कर्ज फेडतो. या व्यवहाराला शून्य व्याजदर असे म्हणणे ही फसवणूक आहे, त्यामुळे यापुढे अशा योजना करता येणार नाहीत आणि कार्डाद्वारे खरेदीवरही अतिरिक्त शुल्क लावता येणार नाही, असा आदेश रिझर्व बँकेने गेल्या बुधवारी (दि.२६) जारी केला. हा आदेश अतिशय स्वागतार्ह आहे. ज्या बँक व्यवस्थेत काळा पैसा पांढरा करण्याची ताकद आहे, त्या बँकिंग व्यवस्थेत बदलाची किती गरज आहे, हेही यानिमित्ताने समोर आले आहे.
ज्या ब्रिटिशांनी आपल्याला ही बँकिंग व्यवस्था दिली त्या ब्रिटनमध्ये सध्या काय चालले आहे, हे यानिमित्ताने पाहिले असता धक्का बसतो आणि आपण या लोकांचे अनुकरण का करत आहोत, असा प्रश्न पडतो. पाश्चिमात्य पद्धतींचे प्रतिनिधीत्व करणारी अमेरिका आणि ब्रिटन हे दोन्ही देश आर्थिक पेचप्रसंगात पोळून निघाले असून त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना अजूनही दिसत नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पैसा बँकेत निर्माण होतो, असा समज त्यांनी करून घेतला आहे. पैसा त्यांनी रियल इस्टेट आणि भांडवली बाजारात फिरवला आणि उसाच्या चिपाडासारखा पिळून काढला. चिपाडात अजिबात रस राहिला नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अख्या जगाला त्यात ओढले आणि आजचा जागतिक आर्थिक पेचप्रसंग तयार झाला.

दोन वर्षांपूर्वी ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ नावाचे अमेरिकेत मोठे आंदोलन झाले. भांडवली बाजाराचे लाड थांबवा, अशी त्यांची मागणी होती. नफेखोरीला चटावलेल्या व्यवस्थेने त्या आंदोलनाची फारशी दखल घेतली नाही. मात्र प्रगत म्हणविणाऱ्या अशा सर्वच देशांतील नागरिकांच्या पायाखालील वाळू आता घसरू लागली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अर्थरचनेची वेगळ्या प्रकारची मांडणी करणारा एक गट ब्रिटनमध्येही उभा राहिला आहे. त्याचे नाव ‘पॉझीटिव्ह मनी’. ब्रिटनमधील काही मोजक्या लोकांनी ही चळवळ सुरु केली आहे. वाढत्या पैशीकरणाचा परिणाम पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर होतो आहे, त्यामुळे पैशांच्या व्यवस्थापनाविषयी बोललेच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ब्रिटनमध्ये सध्या काय चालले आहे, याची ‘पॉझीटिव्ह मनी’दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. त्यात म्हटले आहे, ब्रिटनमध्ये वैयक्तिक कर्जाची रक्कम आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च झाली आहे. १९२ दशलक्ष पौंड म्हणजे १५ हजार ६३० दशलक्ष रुपये इतके प्रचंड व्याज लोक दररोज भरत आहेत. ब्रिटनमध्ये आजमितीला २० लाख लोक रोजगाराच्या शोधात आहेत. पैशांच्या गोंधळातून जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी पैसा हे चलनवलनाचे माध्यम आहे, हे समजून घेऊन मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी लोकानी आणखी कर्ज काढावीत, याला सरकार प्रोत्साहन देत आहे! (जे आपल्याकडेही केले जाते आहे)

पक्क्या शहरी मुलाला आपण दूध कोठून येते, असा प्रश्न विचारल्यावर जसे तो दूध भैया देतो, असे उत्तर देतो, तसेच आज पैशांच्या बाबतीत झाले आहे. बँकेतील पैसा कसा तयार होतो, हे विद्यापीठीय शिक्षणात सांगितले जाते तेव्हा त्यांना बँक व्यवस्थेचे धडे दिले जातात. पण पुस्तकात सांगितली जाणारी बँक व्यवस्था ४० वर्षांपूर्वीच बाद झाल्याचा दावा ‘पॉझीटिव्ह मनी’ केला आहे. पैसा कोठून येतो, कसा तयार होतो, याच्या मुळाशी न गेलेली माणसे अर्थव्यवस्थेवर आज कब्जा करून बसलेली आहेत, त्यामुळे जागतिक पेचप्रसंग कसा संपणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आणि असे शिक्षण घेतलेले तरुण सरकारमध्ये सनदी अधिकारी म्हणून, माध्यमात तज्ञ, आणि बँकांत अधिकारी म्हणून बसतात आणि नव्या आर्थिक संकटांना निमंत्रण देतात. त्यामुळे पेच सोडविणे तर दूरच पण नवनवे पेच निर्माण करण्याचे पाप ते करतात, असा दावा ‘पॉझीटिव्ह मनी’केला आहे. आश्चर्य याचे वाटते की जगाची आर्थिक व्यवहारांची राजधानी मानल्या गेलेल्या लंडन - ब्रिटनमध्ये हे मत व्यक्त होते आहे.

अर्थव्यवस्थेत भांडवलनिर्मिती आणि त्यासाठी कर्जपुरवठा अपरिहार्य आहे, याविषयी दुमत नाही, मात्र कर्ज हे संपत्ती निर्माण करणारे व्यवसाय आणि उद्योगांना दिले गेले पाहिजे.प्रत्यक्षात बँकांनी ‘निर्माण’ केलेले कागदी किंवा इलेक्ट्रोनिक ८७ टक्के पैसे हे कर्जाच्या रूपाने रियल इस्टेत आणि भांडवली बाजारात टाकण्यात आले. फक्त १३ टक्के कर्ज व्यवसाय आणि उद्योगांना देण्यात आले. त्याचाच परिपाक म्हणजे आजचे गेल्या ८० वर्षांतील सर्वात मोठे आर्थिक अरिष्ट होय. सामान्य माणूस अधिकाधिक गरीब होतो आहे, घरांच्या किंमती सारख्या वाढतच आहेत आणि जगात बेरोजगारी वाढतेच आहे, हा या उरफाट्या अर्थरचनेचा धडधडीत पुरावा आहे.

‘पॉझीटिव्ह मनी’च्या वेबसाईटवर एक तीन मिनिटांची फिल्म असून तीत एक १० वर्षांची मुलगी आज पैसा कसा तयार होतो आहे आणि तो कसा तयार झाला पाहिजे, हे जगाला सांगते आहे. आर्थिक पेचप्रसंगाला कारणीभूत ठरलेल्या बँकांना पैशांचे चलनवलन करण्याचे अधिकार कसे बहाल केले जाऊ शकतात, असा सडेतोड प्रश्न तिने विचारला आहे. पैशांची निर्मिती माणसांच्या श्रमातूनच झाली पाहिजे आणि पांढऱ्या पैशांचीच निर्मिती जगाला पुढे नेऊ शकेल, असेही तिने त्यात म्हटले आहे. जागतिक नेत्यांनी आणि अर्थतज्ञ म्हणविणाऱ्यानी जे काम केले पाहिजे ते काम करण्याची वेळ एका १० वर्षांच्या मुलीवर आली आहे, अशी चपराक बसावी हा त्याचा हेतू आहे.
आपल्या देशात नवा विचार पाश्चिमात्याकडून घेण्याची सवयच जडली आहे. खरे तर या महाकाय देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी याच देशातला अर्थक्रांतीसारखा वेगळा विचार करण्याची गरज आहे. सुदैवाने आपल्याकडे काही तज्ञाचे लक्ष त्याकडे गेले असून नजीकच्या काळात भारत आपले वेगळेपण त्याद्वारे सिद्ध करेल, अशी आशा करू यात. (www.arthakranti.org)

No comments:

Post a Comment