Monday, April 2, 2012

पाण्यासारखा पैसा की पैशासारखे पाणी ?



पैसा आणि संपत्ती (पाणी ) आमच्याकडे प्रचंड आहे, मात्र असुरक्षितता त्यापेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या हातातील (पाणी) पैसा सोडायला कोणी तयार नाही. जमेल त्या मार्गाने त्याचा साठा वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. त्याचे परिणाम इतके भयंकर आहेत की नवनिर्मितीचे ‘एम’ टॉनिकचीच (जीवनावश्यक पाणी) अनेकांना मिळेनासे झाले आहे. आणि त्यासाठीचा संघर्ष जणू नळावरील पाणी मिळविण्याच्या, खरे तर त्यापेक्षाही खालच्या पातळीला पोहचला आहे.

काळ बदलतो म्हणजे नेमके काय होते, याचा अनुभव सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येतो आहे. निसर्गाने ज्या बहुमोल गोष्टी मानवाला दिल्या आहेत, त्या जणू आपली जहागिरी आहे, असे मानून माणसाने त्यांचा उपभोग घेतला आणि आज तर त्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वाढत्या ‘पैशीकरणा’ मुळे माणसाला आपण पैशाने सर्वच गोष्टी विकत घेवू शकतो, असे वाटायला लागले आहे. जीवनच ज्यावर अवलंबून आहे ते पाणी, ज्याचा साठा संपणार आहे, मात्र तसा विचारही माणूस करू शकत नाही, असे इंधन, दैनंदिन जीवनात ज्या शिवाय आता आपले गाडे पुढे सरकवू शकत नाही अशी वीजनिर्मिती आणि त्यासाठी लागणारा कोळसा, स्वप्नातील घरे बांधण्यासाठी लागणारी वाळू आणि जगातील निर्मितीचा मूळस्तोत्र आसलेला सूर्यप्रकाश... ही अशी काही कळीची उदाहरणे. ज्या काही सुखसोयींचा उपभोग माणूस घेतो आहे, त्याच्या मुळाशी निसर्गाची निर्मिती आहे, हे विसरून चालत नाही. मात्र आज माणूस पैशावर प्रेम करतो आहे आणि त्याच्या अतिरेकामुळे आपल्याच जीवनात त्याने प्रचंड विसंगती वाढवून घेतली आहे. काळ या अर्थानेही आज खूप बदलला आहे.
एकेकाळी म्हणण्याची पद्धत होती की ‘पाण्यासारखा पैसा’ खर्च केला. आज तसे म्हणता येत नाही. आज पूर्वीच्या पाण्याच्या उपलब्धतेचा विचार केला तर ‘पाण्यासारखा’ पैसा खर्च होतो आहे, मात्र पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसायला लागल्यामुळे पैशासारखे पाणी वापरायची वेळ आली आहे. याचा अनुभव पाण्याचे वरदान लाभलेल्या पुण्याला गेल्या पंधरा दिवसापासून येतो आहे. हा अनुभव वेगळ्या अर्थाने महत्वाचा वाटतो. त्या अनुभवाची चर्चा म्हणूनच आज येथे आपण करणार आहोत.
महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले आणि पुण्यात अचानक पाणीटंचाई निर्माण झाली. ही टंचाई म्हणजे बिघाडाचा परिणाम असेल म्हणून पुणेकरांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र आठ दिवसांत त्यात काहीच फरक पडत नाही, हे पाहिल्यावर सगळेच हवालदिल झाले. दररोज भरपूर पाणी मिळणार हे जे गृहीतक होते, त्याला पहिल्यांदा धक्का बसला. पुण्याच्या समाजजीवनावर त्याचा काय परिणाम झाला पाहा. १. पुण्यातील लोक पाण्याची चर्चा करू लागले. २. मोठ्या सोसायट्यांमध्ये टॅकरने पाणी विकत घेतले जाऊ लागले. ३. नोकरदारांना पाणी भरण्यासाठी स्वतंत्र माणसांची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे वयस्कर, छोट्या मुलांचे आणि घरकाम करणाऱ्या सेवकांचे महत्व वाढले. ४. पाण्याचा साठा वाढविला पाहिजे म्हणून टब, बकेट यांचा खप अचानक वाढला. ५. पाणी येण्याच्या वेळा अनिश्चित झाल्यामुळे घरातील नळ चालू राहू लागले, ज्यामुळे कोणाचे नळ चालू राहिले, यावरून सोसायटीमध्ये भांडणे सुरु झाली. ६. पाणी सोडणारा दुर्लक्षित सेवक किंवा वॉचमन एकदम महत्वाचा माणूस झाला. ७. पराभूत उमेदवार आणि पुढील निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उमेदवारांना आंदोलनासाठी विषय मिळाला. ८. पाण्याची किंमत नेमकी किती म्हणजे एक टँकर किती रुपयांना याविषयीचे वाद सुरु झाले. ( तो पुण्यात ५०० ते १५०० रुपयांना मिळतो.) ९. टँकरला लॉबी जागी झाली. पुण्यात अधूनमधून पाणीटंचाई निर्माण होण्याचे ‘महत्व’ त्यांना लक्षात आले. १०. पुण्याची बेसुमार वाढ करताना पायाभूत सेवासुविधामध्ये पाण्याच्या स्रोताचे महत्व नाकारता येणार नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, हा संदेश धुरीणांपर्यंत गेला.
प्रश्न पुण्याचा पाणीप्रश्न मांडण्याचा नाही. कारण पुण्याला जेवढे पाणी मिळते, त्याच्या निम्मेही पाणी बाहेरील अनेक शहरांमध्ये मिळत नाही. त्यामुळे पुण्याच्या पाणीप्रश्नाला कुरवाळण्याचे काहीच कारण नाही. प्रश्न आहे, अशावेळी एका समृद्ध म्हणून गणल्या गेलेल्या शहरातील समाज नेमका कसा वागतो? लक्षात असे येते की तो फार वेगळा वागत नाही. तो प्रचंड असुरक्षित होऊन जातो. तो त्यातून साठेबाजी सुरु करतो. तो एकमेकांशी भांडायला लागतो. काहीजण त्यातच व्यवसायाच्या संधी शोधायला लागतात. तो आपल्या घरापुरता, मग झालाच तर सोसायटीपुरता विचार करायला लागतो. हा विचार यासाठी करायचा की पाण्यासारख्या नैसर्गिक साधनांबाबत हे पेच भविष्यात वारंवार उभे राहणार आहेत. अति पैशीकरणात जसा पैशांच्या व्यवहारांचा आपण विचका करून ठेवला तसाच विचका आपण पाण्यासारख्या जीवनावश्यक साधनांचाही करून बसू की काय अशी भीती वाटते.
असुरक्षितता माणसाला कशी स्वार्थी आणि अविचारी बनविते, याचे उदाहरण पाण्याच्या आणि संपत्तीच्या वापराला अगदी चपखल लागू पडते. जेव्हा दोन दिवसातून एकदा पाणी येणार असते, तेव्हा आपण किमान तीन दिवसांचा साठा करून ठेवतो. दररोज पाणी येणार असे माहीत असल्यास फारसा साठा करत नाही. आणि २४ तास पाणी येणार असे माहीत असल्यास आपण अजिबात साठा करत नाही. ज्याला जेवढे पाणी हवे, तेवढेच तो वापरतो, म्हणजेच सर्वांना पाणी मिळते. कोणाकडे किती साठा आहे, या गोष्टी मुबलकतेमध्ये महत्वाच्या ठरत नाही.
आपल्या देशातील पैशांच्या व्यवहारांचे नेमके हेच होते आहे. पैसा आणि संपत्ती (पाणी ) आमच्याकडे प्रचंड आहे, मात्र असुरक्षितता त्यापेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या हातातील (पाणी) पैसा सोडायला कोणी तयार नाही. जमेल त्या मार्गाने त्याचा साठा वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. त्याचे परिणाम इतके भयंकर आहेत की नवनिर्मितीचे ‘एम’ टॉनिकचीच (जीवनावश्यक पाणी) अनेकांना मिळेनासे झाले आहे. आणि त्यासाठीचा संघर्ष जणू नळावरील पाणी मिळविण्याच्या, खरे तर त्यापेक्षाही खालच्या पातळीला पोहचला आहे.

No comments:

Post a Comment