Tuesday, September 7, 2010

अर्थपूर्ण जीवनाचा अनर्थाशी संग !

जीवनाचा वेग वाढत चालला आहे, त्यामुळे धावपळ वाढली आहे. वेग वाढला कारण ज्याने तो वाढविला तो स्पर्धेत पुढे पळताना दिसतो आहे आणि जो पुढे पळतो आहे त्याला इतरांपेक्षा अधिक आर्थिक लाभ होतो आहे. आर्थिक प्राप्ती वाढलीच पाहिजे कारण जगण्यासाठीच्या बहुतांश गरजा त्यातून भागतात. त्या भागविण्यासाठी किती पैसा लागतो, या प्रश्नाचे निश्चित उत्तर देता येत नाही. खरे म्हणजे देता आले पाहिजे पण प्रत्येकाच्या गरजांची इतकी भिन्नता आपण मान्य केली आहे की अब्जाधीशही आपल्याकडे पुरेसा पैसा आहे, हे मान्य करत नाही. त्याला कोणीतरी त्यापेक्षा श्रीमंत माणूस दिसायला लागला की पैसे कमावण्याच्या स्पर्धेत तो नव्याने भाग घ्यायला लागतो. आज अब्जाधीशाची ‘भूक’ जेथे भागत नाही, तेथे खालच्या उत्पन्नगटातील समूहाची ‘भूक’ भागण्याचा संबंध कोठे येतो ?
भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत या संदर्भाने एक फार चांगले वाक्य आहे. ते आधुनिक समाजाच्या भूकेला चपखल लागू पडते. ते असे आहेः ‘ गेल्या पाच हजार वर्षांत कोणती महानगरं टिकली आहेत ? महानगरं उद्ध्वस्त व्हायला कुर्‍हाडी न् रथ कशाला लागतात ? ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो. शिवाय कच्चा माल येणं थांबलं, पाणी बंद झालं, पेट्रोल,गॅस संपले, व्यापार कोसळला, निसर्गाचा कोप, नदीनं पात्र बदललं, की हे फुग्यासारखे फुटतात. फाऽट, फाऽट...’ स्वतःला खाणारा असा एक नागरी समाज आपल्या आजूबाजूला सतत तयार होतो आहे की काय, असा प्रश्न वर्तमानात प्रत्येक क्षणी पडायला लागला आहे. न भागणारी ‘भूक’ अशी सर्वव्यापी व्हायला लागली आहे.
आधी पोटापाण्याच्या प्रश्नांसाठी झटणारी माणसं ते प्रश्न थोडे बाजूला पडले की जीवनात स्थैर्य शोधायला लागतात. स्थैर्य मिळालं की जीवनाचा अर्थ शोधायला लागतात. जीवनाचा अर्थ म्हणजे नेमके काय, हे मात्र स्पष्ट करणं अवघड आहे. त्याची व्याख्या करता येत नाही, कारण जीवनाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. पेच असा आहे की प्रत्येकाचा जीवनाचा अर्थ वेगळा असला तरी तो केवळ वैयक्तिक प्रयत्नांनी साध्य होत नाही. त्याला स्वतःसोबतच परिसराची, समूहाची आणि निसर्गाची साथ मिळावी लागते. आधुनिक समाज स्वतःला सोडून पुढील तीनही घटकांना विसरला आहे, असे सध्याच्या सार्वजनिक जीवनाकडे आणि संभ्रमित माणसांच्या टोळ्यांकडे पाहिल्यावर म्हणावे लागते.
आधुनिक म्हणविणार्‍या सध्याच्या नागरी समाजाने आपले आयुष्य किती वेदनामय करून घेतले आहे , हे गेल्या आठवड्यातील एका दिवसाचे वर्तमानपत्र वाचल्यावर अधिक अधोरेखित झाले. या घटनांची नोंद ही एका दिवसाची असली तरी हे वर्तमान आपण दररोजच वाचतो, हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल.म्हणजे ‘आज’ चा ‘काल’ दररोजच होत असतो. त्या दिवसाच्या वर्तमानात पाकिस्तानच्या पुरस्थितीतील भुकेल्यांची कहाणी होती. एकीकडे कोटयवधी रूपयांची करचुकवेगिरी उघडकीस आली होती तर दुसरीकडे करांच्या ओझ्याने वाकलेल्या नागरिकांना प्राप्तिकरात नव्या बदलांचे आमिष केंद्र सरकारने दाखविले होते. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाऊ इच्छिणार्‍या पाच न्यायाधीशांनी परीक्षेत कॉपी केली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर सेवेतून निलंबित होण्याची वेळ आली होती. शहरात प्रचंड रोगराई वाढल्यामुळे रूग्णालये कमी पडताहेत, अशी वेळ या समुहावर आली होती. दोन शहरे जोडण्यासाठीच्या महामार्गांवर लुटमारीच्या घटना वाढल्याची नोंद त्याच दिवशी होती. याच नागरी समाजात कसेबसे जीवन कंठणार्‍या अपंग उद्योजकांना आपल्या मालावर व्हॅट कर नको म्हणून मागणी करण्याची वेळ आली होती. त्याच प्रकारचा नागरी समाज चीन देशामध्ये जगतो, तेथे एका महामार्गावरील वाहतुककोंडी म्हणे महिनाभराने सुटणार होती. जगाच्या दुसर्‍या टोकाला त्याच प्रकारच्या कोंडीने नागरीक दररोज परेशान झाल्याची बातमी त्याच पानांवर होती. एका महापालिकेने आपल्या हद्दीबाहेरून येणार्‍या रूग्णांसाठी जादा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे एका गावातील रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी कामावर येत नसल्याने तेथील शिपाईच ते चालवत होता ! आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका नगरात सुट्या पैशांची चणचण निर्माण झाल्याचे वृत्त होते. तेथील बँकेला म्हणे पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याने सुटी नाणी आणायची भीती वाटत होती. मला वाटते वानगीदाखल एवढया घटना पुरेशा आहेत. ‘जगाचा आरसा’ असे आपण माध्यमांना म्हणतो. कालच्या जगाची म्हणजे पर्यायाने आजच्या जगाच्या आरशात नागरी समाज असा असुरक्षित, भांबावलेला, तणावग्रस्त असा दिसतो आहे.
दररोजच्या या नोंदीमध्ये काय दिसते पाहा... अंतिमतः जीवनाचा अर्थ शोधायला निघालेला हा समूह आपल्या परिसरातील अभावग्रस्त परिस्थितीने परेशान झाला आहे. ज्यांच्या जीवनातील भौतिक अभाव संपला आहे, ती माणसेही पुढ्च्या काही प्रलोभनांसाठी वखवखली आहेत. जेथे आपण वेग वाढविला आहे, असे वाटायला लागले होते, तेथे असुरक्षितेने ग्रासले आहे. वाढलेल्या रोगराईतून आपली सुटका नाही, या चिंतेने त्याचा ताबा घेतला आहे. आपल्यातील दुर्बलांना जगण्याचे साधन दिले पाहिजे, याविषयी दुमत नसलेल्या या समाजात त्यासाठी अधिक काही करण्याची वेळ येते तेव्हा मात्र एकमतासाठी झटावे लागते. याच आधुनिक समाजावर हद्दीतले आणि हद्दीबाहेरचे रूग्ण असा भेद करण्याची नामुष्की आली आहे. त्या नगरापासून जवळच असलेल्या गावात तर रूग्णांवर आपला जीव रूग्णालयातील शिपायाच्या हवाली करण्याची वेळ आली आहे. सुट्या पैशांची चणचण निर्माण होण्याच्या घटनेने तर आधुनिक समाजाच्या अंगावरील राहिलीसुरली वस्रही काढून टाकली आहेत. आमच्या आधुनिक समाजाचा दररोजचा दिवस असा उगवतो आणि असाच मावळतो, मग यात जीवनाचा अर्थ आपण कसा शोधणार आहोत ?
या सर्व वर्तमानाचा मी एक अर्थ घेतला तो म्हणजे माणूस ज्या रस्त्याच्या शोधात निघाला होता, तो हा रस्ता खचितच नव्हे. काहीतरी गडबड आहे, एवढे नक्की. ही जी गडबड आहे, तिचा विचार आपण या ‘अर्थपूर्ण’ मध्ये करणार आहोत. केवळ गडबडीची चर्चा करून थांबणार नाही, तर जगाचे व्यवहार शक्य तितक्या प्रामाणिक, संवेदनशीलतने झाले पाहिजेत आणि माणूसपणाची प्रतिष्ठा कोणत्याही ‘इझम’ मध्ये जपलीच पाहिजे , असे ठामपणे वाटणार्‍या सर्वांच्या मनात नेमके काय दडून बसले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे.
संपादक म्हणून काम करताना एका सज्जन माणसाने मला एक प्रश्न विचारला होता. ‘जगात घडणार्‍या वाईटच घटना जणू माध्यमे एकत्र करतात, असे अनेकदा वाटते. खरे तर जीवन सुसहय व्हावे यासाठी प्रयत्नशील असणारी कितीतरी माणसे आपल्या आजूबाजूला आहेत. ती एकांडे शिलेदार म्हणून काम करत आहेत. त्यांची मात्र माध्यमे ठळक दखल घेत नाहीत. त्यांचे काम समाजासमोर आणत नाहीत, असे का ? ‘ मी त्या क्षणाला काही उत्तर देऊ शकलो नाही. मात्र माझ्या मनातून त्या वाचकाचा प्रश्न जातच नव्हता. पण मी लगेचच अशी माणसे शोधायला सुरवात केली. अशी खूप माणसे आपल्या आजूबाजूला आहेत, हे लगेच लक्षात आले. माध्यमांमध्ये व्यावसायिकतेला महत्व देण्याच्या नावाखाली काय होते आहे, हे दिसतच होते. मात्र त्यात आपण काय करू शकतो, हे लक्षात येत नव्हते. एक दिवस ते लक्षात आले. मी ‘उकल’ नावाचे सदर लिहायला सुरवात केली. आपले दररोजचे जीवन अर्थपूर्ण करणार्‍या माणसांना समाजासमोर आणण्याची संधी मी घेतली आणि त्या सज्जन माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आपण सर्वच जण अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात आहोत. वैयक्तिक जीवन आणि त्या पाठोपाठ सार्वजनिक जीवन अर्थपूर्ण करण्याची आज गरज आहे. ही गरज पूर्ण कशी करता येईल, तसा प्रयत्न करणारी कोणती माणसं आहेत, जगातल्या कोणत्या व्यवस्थांनी जीवन अर्थपूर्ण करण्याच्या वाटा शोधल्या आहेत, त्यांच्या कोणत्या पावलांवर पाऊल टाकले तर जीवन अर्थपूर्ण होण्यास मदत होईल, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ‘अर्थपूर्ण’ हा प्रवास आहे.

No comments:

Post a Comment