Tuesday, August 17, 2010

केवळ युनिकोड नव्हे, ‘मराठी युनिकोड’

मराठी फॉण्टच्या आणि की-बोर्डच्या गदारोळात आणखी फॉण्ट्स आणि की-बोर्डची गरज आहे काय, याचे उत्तर ‘नाही’ असेच असायला हवे. मात्र जगातल्या पंधराव्या क्रमांकाच्या आणि एका उत्कृष्ट भाषेच्या वाटयाला जी अवहेलना आली आहे, ते पाहता ती गरज आहे, असेच म्हटले पाहिजे. संगणकात मराठी भाषा वापरातील सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, ती सोप्या पद्धतीने वापरता आली पाहिजे, मराठी भाषेचे स्वत्व अबादित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, संगणकात वापरताना ती कोठेही कमी पडता कामा नये आणि हे स्वीकारण्यासाठी मराठीजनांना मोठा आर्थिक भुर्दंड पडायला नको, या चार गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत, याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. हे चारही निकष पुर्ण करणारा फॉण्ट आणि कीबोर्ड आपल्याला हवा आहे. मराठी भाषेच्या व्यवहारातील आणि पर्यायाने संगणकातील वापरावर ज्या मर्यादा आल्या आहेत, त्याची कारणे म्हणजे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. सरकार, मराठी भाषाविकासाचे निर्णय घेणारे धुरीण आणि ती वापरणारे मराठीजन यांची स्थिती एक हत्ती आणि सहा अंधांसारखी झाली आहे. कोणाला व्याकरण कळते तर संगणक कळत नाही, संगणक कळतो तर भाषा कळत नाही आणि ज्यांना वापर करायचा ते वेगवेगळे प्रयोग करून परेशान झाले आहेत. या प्रवासात मराठी भाषेचे न भरून येणारे नुकसान होते आहे.

आता प्रश्न असा आहे की या अडथळयांवर मात करणारा काही मार्ग आहे का ? हो , आहे आणि मराठी समाज आणि सरकारने त्याचा शक्य तितक्या लवकर अवलंब केला पाहिजे. ‘शोध मराठीचा’ या संशोधनाने अलिकडेच शोधून काढलेला ‘मराठी युनिकोड’ (केवळ युनिकोड नव्हे ) हा त्यावरचा मार्ग निश्चितपणे ठरू शकतो.
वर ज्या चार निकषांचा उल्लेख केला, ते चारही निकष ‘मराठी युनिकोड’ने पुर्ण केले आहेत. त्यामुळे तो महाराष्ट्र सरकार, मराठी विकासासाठी काम करणार्‍या सरकारी अनुदानित संस्था, शाळा- महाविद्यालये आणि सर्वच मराठीजनांनी स्वीकारण्याची गरज आहे. मराठी भाषेला यापुढे संगणकात वावरावेच लागणार आहे आणि त्यासाठी हे निकष पुर्ण करणारे फॉण्ट आणि की-बोर्ड स्वीकारावेच लागणार आहेत, हे या विषयातील तज्ञांनी समजून घेतले तर मराठी भाषेसमोरची आव्हाने पेलणे सोपे होणार आहे.

‘मराठी युनिकोड’ हे चार निकष कसे पुर्ण करतो, हे आता आपण पाहू. संगणकात मराठी भाषा वापरातील सर्व अडथळे दूर झाले पाहिजेत, हा पहिला निकष आहे. मायक्रोसॉफ्ट्ने युनिकोड दिला, याचा अर्थ संगणकात मराठीसारखी भारतीय भाषा वापरण्यातील अडथळे त्यांनी त्यांच्या दृष्टीने दूर केले. याचा अर्थ त्यांनी काही भारतीय भाषांची मोट घातली आणि त्याला युनिकोड नाव दिले. त्यांनी तंत्र म्हणून जे अडथळे दूर केले , त्याबद्द्ल त्यांचे आभार मानून ‘मराठी युनिकोड’ पुढे जातो. ( मायक्रोसॉफ्ट्चा युनिकोड महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकात ‘ऑन’ असलाच पाहिजे, इतका साधा नियम करायला मात्र आमच्या महाराष्ट्र सरकारला आणि मराठीच्या नावाने गळे काढणार्‍यांना वेळ नाही!)

मराठी सोप्या पद्धतीने संगणकात वापरता आली पाहिजे, हा दुसरा निकष आहे. मराठी लेखन ‘बाराखडी’ या सुत्रातून सहजतेने शिकता येते, हे लक्षात घेवून स्वर आणि व्यंजनांना की-बोर्डवर स्थान देण्यात आले आहे. संगणक इंग्रजांनी बनविले आणि त्यांनी ‘क्‍वेर्टी’ कीबोर्ड आपल्याला दिला. त्याचा वापर करून तो 90 टक्के फोनेटिक करण्यात आला आहे. तो इतका सोपा आहे की मराठी टाईप न करणारा माणूसही सहजपणे टाईप करायला लागतो. जोडाक्षरे टाईप करायला अवघड वाटतात, ती जोडाक्षरेही खूपच सोपी करण्यात आली आहेत.

मराठी भाषेचे स्वत्व अबादित ठेवून ती जगाशी जोडली गेली पाहिजे, हा तिसरा निकष आहे. सध्या मराठी अक्षरे टाईप करताना सतत तडजोडी करा किंवा मराठीची मोडतोड करा अशी जणू सक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे भाषेचे नुकसान होते, हे लक्षात घेतले पाहिजे.‘मराठी युनिकोड’ मध्ये 100 टक्के मराठी टाईप करता येते. दुसर्‍या भाषेच्या कुबडया त्यासाठी घ्याव्या लागत नाहीत. तरीही ती जगाशी जोडली जाते कारण इंग्रजी की-बोर्ड आणि मराठी याचा सुवर्णमध्य त्यात साधण्यात आला आहे. इंग्रजी बोलता न आले तर शाळांमध्ये मुलांना चटके देणार्‍या लाचार मनोवृत्तीच्या समाजात हा सुवर्णमध्य अपरिहार्यच म्हणावा लागेल.

संगणकात वापरताना मराठी भाषा कोठेही कमी पडता कामा नये, हा तिसरा निकष आहे. ‘मराठी युनिकोड’ मध्ये फाईल, फोल्डर यांना मराठीत नावे देणे शक्य होते, तसेच ईमेल. वेबवर आणि इंग्रजी भाषा वापरली जाते अशा सर्व ठिकाणी मराठी वापरता येते. थोडक्यात संगणकात मराठी वापराचे दालन 100 टक्के खुले होते.

‘मराठी युनिकोड’ चे सूत्र स्वीकारण्यासाठी मराठीजनांना मोठा आर्थिक भुर्दंड पडायला नको, हा चौथा निकष आहे. आता हे सूत्र 100 ते 200 रूपयांना उपलब्ध आहे. सरकारने पुढाकार घेतला तर ते मराठीजनांना मोफतही उपलब्ध करता येवू शकते. मराठी भाषा विकासासाठी हा पुढाकार अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारने या कारणी कोटयवधी रूपये खर्च केल्याचे सांगण्यात येते. हा प्रश्न मुळातूनच संपविण्याची संधी ‘मराठी युनिकोड’ च्या माध्यमातून आली आहे.

भाषाविकासाची गाडी संगणकाचे इंजीन लावल्याशिवाय आता पुढे जावू शकत नाही. मराठीच्या संगणकातील वापरात एकसूत्रता आणण्यासाठी तरूणवर्ग आसुसला आहे. इंग्रजी वापरणारा वर्ग वेगाने वाढत चालला असून त्याला सोप्या पद्धतीने मराठी वापरायची आहे, तर संगणकक्रांतीला मुकलेल्या आधीच्या पिढीलाही संगणक वापरायचा आहे. इंग्रजी आणि मराठीत शिक्षण घेणार्‍या मुलांना आता संगणकाच्या मदतीने मराठी शिकायची आहे. परदेशातील मराठी मुलांनाही मराठी सोपेपणातून आत्मसात करायची आहे. या सर्वांसाठी ‘मराठी युनिकोड’ शिवाय पर्याय नाही.
प्रश्न आहे हा विषय समजून घेण्याचा आणि शक्य तितक्या लवकर त्याची अमलबजावणी करण्याचा !
( अधिक माहितीसाठी www.shodhamarathicha.com /www.soppimarathi.com )

यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Thursday, June 10, 2010

मार्केटिंगचे ‘फिरंगी फटके’

बाजारात सध्या अनेक लढाया सुरू आहेत. या लढाया काय थराला जावू शकतात, याचे एकएक नमुने पाहायला मिळत आहेत. भारतात सध्या मोबाईल फोनची चलती असून ती ‘कॅश’ करण्यासाठी किमान डझनभर कंपन्या एकमेकींशी स्पर्धा करत आहेत. मोबाईल ही या दशकात जणू जीवनावश्यक वस्तू झाली आहे. आगामी काही वर्षांत तिचा महागाई निर्देशांकांच्या निकषांमध्ये समावेश झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच मोबाईल सेवेच्या मार्केटिंगवाले एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत.

मार्केटिंगच्या या कुरघोडीमध्ये नैतिकतेचे भान कसे हरवत जाते, हे जाहिरातींमध्ये आपण दररोज पाहात आहोत. असेच एक ताजे उदाहरण समोर आले असून आता या स्पर्धेत कोणीच मागे राहायला तयार नाही आणि कोणालाच त्याच्या परिणामांशी काही देणेघेणे राहिलेले नाही, हेच त्यातून उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांत मोबाईल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांनी ग्राहकांवर एसएसएमचा मारा चालविला आहे. या एसएसएमद्वारे अश्लील संदेश पाठवून पैसा कमावणे आणि सेवेची ‘लोकप्रियता’ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी बीएसएनएल कंपनीही या स्पर्धेत उतरली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी कंपन्यांनी मार्केटिंग करताना नैतिकता सोडू नये, अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा बर्‍यापैकी पाळली जात होती. मात्र त्यांना खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यास भाग पाडण्यात आले आणि खाजगी कंपन्या ज्या प्रकारचे मार्केटिंग करतात, त्या प्रकारचे मार्केटिंग करण्याची एकप्रकारची मुभा देण्यात आली.

माणूस, संस्था, संघटना आणि कंपन्यांमध्ये मार्केटिंग हा परवलीचा शब्द झाला आहे. ते करताना तुम्ही समाजाच्या भल्याचा, प्रामाणिकपणाचा विचार करता की नाही, हा विचार गौण ठरायला लागला. व्यवहारात प्रत्येक ‘निर्मात्या’ला दुकान मांडून बसावे लागते, हे मान्यच करावे लागते. मात्र जेव्हा तो व्यवहार इतरांच्या नुकसानावर, दुसर्‍याच्या फसवणुकीवर बेतला जातो, तेव्हा मात्र त्याचा निषेध करणे अपरिहार्य ठरते.

बीएसएनएल आणि आयडिया या मोबाईल कंपन्यांनी पाठविलेल्या एसएसएमचा समोर आलेला मुद्दा या प्रकारच्या मार्केटिंगशी संबंधित आहे. बीएसएनएलने ग्राहकांना एसएसएमद्वारे पाठविलेल्या लिंक उघडल्यानंतर महिलांची अर्धनग्न छायाचित्रे दिसतात, असे लक्षात आले. या सगळया प्रकाराला कंपनीने ‘फिरंगी फटका’ असे नाव दिले आहे ! या ‘फटक्यांची’ अनिमेशन दरमहा 30 रूपयांना दिले जात आहेत. आयडिया या मोबाईल कंपनीनेही याच प्रकारचे एसएसएम पाठविले आहेत.

मार्कैटिंगचा आणखी एक धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला. अश्लील एसएसएमवरून पुण्यात वाद उभा राहिल्यानंतर आयडिया सेल्युलर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत मुखर्जी यांनी जो खुलासा केला आहे, तो पाहिल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात येईल. त्यांचा खुलासा शब्दशः असा- ‘अश्लील एसएसएम आयडिया सेल्युलरने पाठविलेला नाही. सर्व मोबाईल कंपन्यांना विपणन सेवा पुरविणार्‍या बंगरूळूरमधील एका कंत्राटदाराने तो पाठविला आहे. त्याबाबत पोलिस चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी विनंती कंपनीतर्फै पोलिसांना करण्यात आली आहे.’ याचा अर्थ असा होतो की आपल्या कंपनीच्या नावावर गेलेल्या एसएसएमची जबाबदारी आता ही आणि इतर कोणतीच कंपनी घेणार नाही ! सेवेचे असे तुकडे तुकडे पाडले की जाब कोणाला विचारायचा हे कोणालाच कळत नाही. आणि हा विषय मागे पडतो. काही दिवसांनी पुन्हा पुर्वीसारखेच सर्व सुरू होते. विमा आणि बँकांनीही याच प्रकारची नीती अवलंबली आहे. माल विकताना पायघड्या आणि सेवेचा मुद्दा आला की सेवेपेक्षा करामतींवर भर असा जणू प्रघातच पडतो आहे.

मार्केटिंगच्या शिक्षणात नेमके काय सांगितले जाते, ते शोधले पाहिजे. मात्र त्या शिक्षणात अलिकडच्या काळात नैतिकता गुंडाळून ठेवा आणि माल खपवा अशा मंत्राचा बोलबाला होताना दिसतो आहे, असेच म्हणावे लागेल. आपले उत्पादन चांगले आहे, हे कंपन्याना एकतर पुरेसे वाटत नाही किंवा त्यांची भूक एवढी वाढली आहे की हाव सुटत नाही. चांगले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी नाना क्लृप्त्या कराव्या लागतात, हे पुर्वापार चालत आले आहे. त्याविषयी तक्रार असण्याचे कारण नाही आणि तसा अधिकारही कोणाला नाही. मात्र ज्यावेळी प्रलोभनाच्या सीमारेषा ओलांड्ल्या जातात, त्यावेळी त्याची दखल घ्यायलाच हवी. विशेषतः ज्यामुळे समाजस्वास्थच बिघडण्याची शक्यता आहे, त्याविषयी सरकार आणि समाजधुरीणांनी बोललेच पाहिजे. ते तसे बोलण्याचे , त्यासंबंधीचा निर्णय घेणे टाळले जाते आहे की काय, हेही तपासण्याची वेळ आली आहे.

मार्केटिंगचे टोक गाठून समाजाला आणि विशेषतः गरीबांना कसे वेठीस धरले जाते, याचे अमेरिकन समाजातील एक उदाहरण अतिशय बोलके आहे. अमेरिकेत ज्यावेळी घरे विकली जात नव्ह्ती त्यावेळी बँका आणि वित्तसंस्थांनी ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखवून घरे घ्यायला लावली . लाखो लोकांनी घरे घेतली, मात्र त्यांना खर्चाची तोंडमिळवणी करता येईना . कर्जे थकली. ती इतकी थकली की घरांची जप्ती मोहिम हाती घेण्यात आली. जप्त केलेल्या घरांची संख्या प्रचंड वाढली आणि घरांच्या किमंती कोसळल्या. या अनैतिक व्यवहारातून जागतिक मंदीने जन्म घेतला. अमेरिकन समाजासोबतच सारे जग मंदीत होरपळून निघाले. मार्केटिंगच्या अतिरेकामुळे जागतिक समाजच अडचणीत आला. ही केवळ आर्थिक होरपळ होती, असे आपल्याला म्हणता येत नाही. अशा आर्थिक संकटांमध्ये समाजावर सामाजिक, सांस्कृतिक परिणाम होतात. मार्केटिंग करणार्‍याने त्याचे काम चोख बजावले, आता त्याच्या परिणामांशी आम्हाला काही देणेघेणे नाही, ही किती चुकीची भूमिका आहे, हे म्हणूनच समजून घेतले पाहिजे.

बीएसएनएल आणि आयडिया या मोबाईल कंपन्यांनी पाठविलेल्या अश्लील एसएसएम किंवा लिंकचा विचार या संदर्भाने केल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात यावे. आमच्या मार्केटिंगचा समाजावर आणि विशेषतः मुलांवर काय परिणाम होतो, याच्याशी आमचे देणेघेणे नाही , असे म्हणणार्‍यांची संख्या वाढत गेली की सगळा समाजच अशा विकृतींनी पोखरून निघतो. त्या विकृतींचा त्रास तर होतो मात्र ती थांबविण्यासाठी स्पर्धेला लगाम लावणे नको वाटते, हे समाजाच्या निकोप वाढीचा विचार करता चांगले लक्षण नव्हे.

यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Friday, April 23, 2010

जखमेवर मीठ चोळणा-या ‘सर्कशी’

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या तसेच आर्थिक असमानतेचे टोक गाठलेल्या देशासाठी अर्थक्रांती ही नवी संकल्पना सुचवूनही आता एक दशक उलटून गेले. औरंगाबादचे एक उद्दोजक श्री. अनिल बोकील यांनी ही संकल्पना मांडली आहे. म्हटले तर ती अतिशय साधी आहे. सध्या सर्व नागरिक प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ३३ प्रकारचे कर भरतात, त्याएवजी दोनच प्रकारचे कर भरतील. त्यातला एक सीमाशुल्क आणि दुसरा ‘व्यवहार कर’. साधारण २००० किंवा ५००० रूपयांवरील रोखीचे व्यवहार होणार नाहीत, असा कायदा करण्यात येईल. एक हजार आणि पाचशेसारख्या मोठ्या नोटांची व्यवहारात मग गरज राहणार नाही, त्यामुळे त्या रद्द करण्यात येतील. थोडक्यात बँकेमार्फत आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येईल. व्यवहारकराद्वारे जमा होणा-या निधीचे वाटप केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येईल, अशी ही संकल्पना आहे. आपल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून अनेक उच्चपदस्थांनी या संकल्पनेची वाहवा करून झाली, मात्र प्रत्यक्षात त्यासंदर्भात ठोस काही होताना दिसत नाही. या संकल्पनेची आठवण या महिन्यात फार तीव्रतेने झाली.

त्याचे एक प्रमुख कारण आयपीएल नावाची सर्कस. या सर्कशीवर भारतवाशी १५ हजार कोटी रूपये उधळतो, या प्रकारची जी भयानक आकडेवारी समोर आली आहे आणि त्यानंतर प्राप्तिकर खात्याचे जे छापासत्र सुरू आहे, ते होय. घरी खायला दाणे नसलेल्या माणसाने नशा करून झिंगण्यासारखे हे आहे. संपत्ती- पैशाचा हा जो उतमात चालला आहे, ते व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावामुळे आपण रोखू तर शकत नाही, मात्र ज्या भ्रस्ट व्यवस्थेने हे घबाड त्यांच्या हातात दिले आहे, ती व्यवस्था तर दुरूस्त करू शकतो. त्या दुरूस्तीचा तर्कसंगत मार्ग शोधायचा झाल्यास आपल्याला अर्थक्रांती संकल्पनेची आठवण ठेवावीच लागते.

श्री. अनिल बोकील यांनी दिलेले एक चांगले उदाहरण मला आठवते. त्यांच्या मोलकरणीने आगाउ पैसे मागितल्यावर त्यांनी दोन वेळा हातउसणे पैसे दिले आणि तिस-या वेळी मात्र तिचा पगार बँकेतून करायला सुरूवात केली. दोन वर्षांनंतर जेव्हा तिला मोठ्या कर्जाची गरज पडली तेव्हा ते तिला जामिनदार राहिले शिवाय बँकेतून पगार केल्यामुळे तिची पत तयार झाली आणि त्या प्रमाणात बँकेने तिला कर्ज मंजूर केले. बँकव्यवहार वाढल्यामुळे एका सामान्य नागरिकाच्या आयुष्यात झालेला हा क्रांतिकारी बदल ठरला. सांगण्याचा मुद्दा हा की १२० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला अशा बदलांची गरज


आहे. ते होत नाहीत म्हणून आयपीएल आणि त्यासारख्या शेकडो सर्कशी सामान्य माणसाच्या जखमेवर दररोज मीठ चोळत आहेत.

सरकारने अनेक उपाय योजूनही नक्षलवादी चळवळीला मिळणारा स्थानिक नागरिकांचा पाठिंबा कमी होताना दिसत नाही, यातच सर्व काही आले. नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागात कवडीमोल जीवन जगणा-या नागरिकांना हा देश आणि ही व्यवस्था आपली वाटेनाशी झाली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात असे कोणाला वाटले असते तर ते समजण्यासारखे होते. मात्र ६० वर्षांनी लाखो लोकांच्या मनात तीच भावना राहते, याच्या कारणांचा विचार करावाच लागणार आहे. जेव्हा एक व्यवस्था म्हणून काही नवी रचना करावी लागेल, त्यावेळी अर्थक्रांतीची संकल्पना मान्यच करावी लागते. वाईट याचे वाटते की इकडे आयपीएलसारख्या सर्कशी आणि दुसरीकडे व्यवस्थेने नाकारलेल्यांची संख्या वाढतेच आहे.

ही दरी दैनंदिन व्यवहारात कशी काम करते आहे, याचे एक उदाहरण येथे दिले पाहिजे. आपण शहरातला एखादा गजबजलेला रस्ता नजरेसमोर आणू यात. आपल्याला असे दिसते की भारीतली भारी कार, बस, रिक्षा, दुचाकी, सायकल, हातगाडी आणि पादचारी त्याच रस्यावरून जात असतात. साहजिकच प्रत्येकाची गती वेगळी आहे. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. थोडक्यात एकाच रस्यावरून २०-२५ प्रकारची वाहने चालली आहेत आणि आपल्याला त्या रस्त्यावर शिस्तबध्द वाहतूक हवी आहे... मग ती आणण्यासाठी त्यातले जे गरीब आहेत त्यांना त्या रस्त्याबाहेर काढण्याचा मार्ग आपण निवडला आहे. ज्याच्याकडे अतिशय मर्यादित साधने आहेत, त्यांना या शिस्तीचा जाच होतो आहे, पण त्याच्याशी सरकारला काही देणेघेणे नाही. मग तो नियम तोडायला लागतो, त्यालाच आपण बेशिस्त म्हणतो. पण ज्यांनी आर्थिक शिस्त तोडली आहे, त्यांनी ती तोडल्याबद्दल शिक्षा होतेच, असे नाही. आयपीएलच्या बोलींचे आकडे पाहिल्यावर ही विसंगती कोणाच्याही लक्षात येईल. कमी काळात इतका प्रचंड पैसा कोणाकडे कसा येउ शकतो, यासाठी संशोधनाची गरज नाही.

चांगले जगणे आणि हौसमौज सर्वांनाच हवी आहे, त्यात बाधा आणण्याची कोणाची इच्छा नाही आणि तसे ते बरोबरही नाही. मात्र एका देशाचे नागरिक म्हणून नाते निर्माण व्हायचे असेल तर प्रत्यक्ष नवनिर्मिती करणा-यांच्या वाट्याला येत असलेली अवहेलना रोखायलाच हवी.शेतीत धान्य पिकविणारा शेतकरी, शरीरकष्टाची कामे करणारा मजूर यांच्या वाट्याला आज जे जिणे आले आहे, त्याकडे पाहता ही चांगली व्यवस्था आहे, असे
म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. कोट्यवधी रूपयांची माया जमविणा-या बहुतेकांनी ती किती भ्रष्ट मार्गांनी जमविलेली असते, हे एखाद्या प्रकरणाने जगासमोर येते. त्यामुळेच आयपीएलकडे त्या नजरेने पाहिले जाते आहे, हे आश्चर्य नव्हे.


जगात गरीब देश आणि श्रीमंत देश असा भेद आता राहिला नाही, आता गरीब देशातले श्रीमंत आणि श्रीमंत देशातील श्रीमंत एकीकडे आणि गरीब देशातले गरीब आणि श्रीमंत देशातले गरीब – अशी जगाची फाळणी झाली आहे, असे जे म्हटले जाते, त्याचीच प्रचिती येवू लागली आहे. ही दरी कमी करण्याची जबाबदारी अर्थातच पहिल्या जगाची आहे. कारण त्यांना चांगले जगायचे असेल तर इतरांनाही जगू देण्याचे औदार्य त्यांना अंगी बाणावेच लागेल. नाहीतर जवान स्फोटांमध्ये मरत आहेत, स्टेडियमच्या शेजारी स्फोटके सापडत आहेत आणि रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे, ही सर्व परिस्थिती या वाढत्या दरीनेच निर्माण केली आहे. ती आटोक्यात न आणल्यास सर्वांनाच जीव वाचवत वाचवत जगावे लागणार आहे.

यमाजी मालकर , ymalkar@gmail.com

Thursday, April 15, 2010

वेग हा जुलमी गडे !

गेल्या दोन तीन दशकांत जग जितक्या वेगाने बदलले, तितके ते पुर्वीच्या शंभर वर्षांत बदलले नाही, असे म्हणण्याची पध्दत आहे. खरे म्हणजे जग म्हणजे जगातला माणूस काळानुसार बदलतच येथपर्यंत पोहचला आहे. एक मात्र खरे की जगाचा वेग या दोन तीन दशकात प्रचंड वाढला आहे. पुर्वीही जगाला वेग होताच मात्र तो असा माणसाच्या नसानसांत भिनला नव्हता. या वाढत्या वेगाचे परिणाम शहरात दिसतात तसेच ते ग्रामीण भागातही दिसायला लागले आहेत.
वाढत्या वेगाचे परिणाम प्रवासात अधिक दिसतात. लोकलने प्रवास करणारे मुंबईकर त्याचा दररोजच अनुभव घेत आहेत. मात्र माझ्यासारख्या मुंबईबाहेरच्या माणसाला याचे फार कुतुहल वाटते. उदा. लोकलमधील सुरवातीच्या डब्यांमध्ये बसायचे की शेवटच्या, हे ठरते ते लोकलमधून उतरल्यावर कोठे जायचे आहे, त्यावर. म्हणजे दादरा चढायला लागू नये, किंवा पायी चालण्यात वेळ जावू नये, हा विचार लोकलमध्ये बसतानाचा करायचा, हे अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. नाहीतर बाहेरून आलेला माणूस आपल्याला गाडीत प्रवेश मिळाला, यातच समाधान मानतो. परवा मुंबईत जे पाहिलं, ते स्टेशनांवरचं नेहमीचं दृश्य आहे, त्याचंही मला कुतुहल वाटलं. दोन मिनिटे आधी निघणारी गाडी आली म्हणून उभ्या गाडीतील माणसं पटापटा त्या आधी जाणा-या गाडीत जावून बसली ! या दोन मिनिटांना पुर्वी आपल्या आयुष्यात हे स्थान नव्हते.
ग्रामीण भागातीलही मानसिकता वेगामुळे कशी बदलत चालली आहे, याची शेकडो उदाहरणे आता पाहायला मिळत आहेत. तेथील स्थानकांवरही असे प्रसंग दिसत आहेत.गावांत ‘काळ्यापिवळ्या’ जीपने सर्रास प्रवासी वाहतूक चालते. तेथे आपली गाडी आधी भरावी यासाठी तिचे इंजिन चालू ठेवले जाते. परवा तर पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर हे दृश्य मी पाहिले. बस कोल्हापूरकडे जाणार होती आणि त्या दिशेने जाणा-या चार तरी बस उभ्या होत्या. प्रवासी मात्र एकाच गाडीत बसत होते, ज्या गाडीचे इंजिन चालकाने चालू करून ठेवले होते ! ‘चलतीका नाम गाडी’. जी गाडी लगेच निघणार तीच गाडी सर्वांना हवी होती.
आता बस पाहिली जाते ती ‘ मेगा हायवे’वरून जाणारी. जी बस हायवे सोडून खाली उतरते, ती कोणालाच नको आहे. त्यामुळे ही ‘ मेगा हायवे’ ही अक्षरे गाड्यांच्या पाट्यांवर ठळक अक्षरात विराजमान झाली आहेत. तब्बल ३०० किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये काम संपवून परत घरी मुक्कामी येणा-यांची संख्या वाढत चालली आहे. पुर्वी वर्दळीच्या मार्गांवर चार- पाच किलोमीटरवर धाब्यांसमोर गाड्या उभ्या दिसायच्या. आता नुसतेच धाबे दिसतात. तेथे थांबणा-या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्याचेही कारण वाढता वेग हेच आहे. वेग वाढण्यासाठीच रस्ते चांगले झाले आणि त्याचा पुरेपूर वापर प्रत्येकाला करायचा आहे. मेगा हायवेला अडथळा होउ नये म्हणून गाव आले की प्रचंड उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हायवेवरील त्या गावाची ओळखच पुसली जाणार आहे. मात्र जीवनाच्या वाढत्या वेगात ते अपरिहार्य ठरले आहे.
या वेगाचा आणखी एक फार खोल परिणाम ग्रामीण भागात होतो आहे. महामार्गावरील गावे वाढत चालली आहेत. मूळ गाव जर महामार्गापासून आत असेल तर महामार्गाच्या कडेने वस्ती वाढत चालली आहे. महामार्गाच्या ‘वाटेने’ सोयीसुविधा येतात आणि ‘आत’ असलेल्या गावात त्या पोहचायला वेळ लागतो, त्यामुळे हायवेच्या आजूबाजूच्या जागा भरत चालल्या आहेत.
या वाढत्या वेगात वंगण ओतले ते मोबाईलने. मी निघालो, मी निम्म्या रस्त्यावर पोहचलो, आता गाडीतून उतरलो, आता रिक्षा मिळाली, आणि हे काय .. मी आपल्या घराच्या दारातच आहे, अशी जणू येण्याजाण्याची कॉमेंट्री करण्याची सुविधाच या यंत्राने दिली आहे. पत्रव्यवहाराची जागाही मोबाईलने घेतली. येण्याजाण्याची कॉमेंट्री केली जाते तेथे सुखदुःखाच्या गोष्टींसाठी आता प्रत्यक्ष भेटण्याची वाट कोण कशाला पाहील ?
संवाद साधण्यासाठी, निरोप देण्यासाठी जो कालावधी लागत होता, तोच संपुष्टात आला आहे. हे चांगले की वाईट हे ठरविण्याला किंवा त्याची चर्चा करायलाही आता मानवी समूहांना वेळ नाही. कारण या बदलांमध्ये आणि वेगात प्रत्येकजण ओढला जातो आहे.
कधीकधी वाटते, वेग म्हणजे जणू जागा पटकावण्याची स्पर्धा आहे. ज्याने वेग वाढविला त्याने जागा पटकावली. अर्थात हे तत्व तर पुर्वीपासूनच आहे. मात्र गेल्या अर्धशतकात जागा पटकावण्याचा हा वेग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये जसे ज्यांना जागा मिळत नाही , त्यातले काहीजण दोन बाकांच्या मध्ये जाउन उभे राहतात., म्हणजे कोणी सहप्रवासी आधी उठला तर ती जागा आपल्याला मिळावी.आणि उभे राहण्याची ही जागाही वेगानेच मिळवावी लागते.
जगातले खरे बदल हे विज्ञान, यंत्र आणि तंत्रातले बदल आहेत. ते आधी होतात आणि माणूस त्यानुसार बदलतो, असे म्हटले जाते. आणि जे खरेच आहे, याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. पण या बदलांनी माणूस इतका वेगवान करून टाकला आहे की तो वेग हेच जणू जगणे आहे, असा एक भ्रम तयार होतो आहे. या वेगाने आणखी एक ‘देणगी’आपल्याला दिली आहे, ती म्हणजे गतिमान अस्थैर्याची. म्हणजे खूप काही घडते आहे आणि त्या घडण्याचे अस्तित्व किती काळासाठी आहे, हे कोणालाच सांगता येत नाही. स्थैर्यासाठी सुरू झालेला प्रवास संपल्यासारखा वाटतो, पण घडीभरच. लगेच दूरचे क्षितीज दिसायला लागते, माणसे त्यादिशेने झेपावतात, आणि मग प्रवासाचे टप्पे मोजायला सुरवात करणा-यालाही शांत बसवत नाही. त्यालाही त्या स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. वाढत्या वेगाने हे जे गतिमान अस्थैर्य दिले आहे, त्याच्याविषयी जगातील माणसांनी कधीतरी एकमेकांशी बोलले पाहिजे. हितगुज केले पाहिजे.. पण हा ‘कधीतरी’ नावाचा काळ वर्तमानात कधी येणार आहे, हे कोण सांगू शकणार आहे ?

यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Friday, April 2, 2010

गाव का झिजते आहे ?

जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत भारत आणि इंडिया अशी आपल्या देशाची फाळणी झाली, याविषयी आता कोणाचे दुमत राहिलेले नाही.या फाळणीविषयी चिंता व्यक्त केली जात नाही, असा एकही दिवस जात नाही. देशातील संपत्तीत या दोन दशकांत किती वाढ झाली, असाच विचार केला तर आपला देश खूप श्रीमंत झाला आहे, मात्र त्या संपत्तीच्या वितरणाचा विचार केला तर ही फाळणी किती भयंकर आहे, हे लक्षात येते. शहरातले चित्र कळायला तुलनेने सोपे आहे, मात्र ग्रामीण भागात नेमके काय घडते आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळेच ‘गांव झिजते आहे’ हे अंबाजोगाईत राहणा-या डॉ. द्वारकादास लोहिया यांचे पुस्तक मला महत्वाचे वाटले. (प्रकाशक- सतिश आणि छाया काकडे, आशिव, ता. औसा, जि.लातूर) जागतिकीकरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके काय होते आहे आणि काय व्हायला हवे, हे समजून घ्यायचे असेल तर त्या परिसरात राहून आपली निरीक्षणे नोंदवणारांची संख्या वाढली पाहिजे.

डॉ. द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या पत्नी डॉ.शैला लोहिया हे दाम्पत्य ‘मानवलोक’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली २७ वर्षे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई भागात काम करतात.या अनुभवाची जोड या निरीक्षणांना मिळाली असल्याने या पुस्तकाचे मोल अधिक आहे.गावांची स्थिती विशेषतः अर्थव्यवस्था कशी खंगत चालली आहे, हे तर डॉ. लोहियांनी विशद केले आहेच, पण हे थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे, हेही मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच तुलनेने श्रीमंत राज्यात पुण्यामुंबईबाहेर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेणा-यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.

महात्मा गांधी खेड्याकडे चला असे का म्हणत होते आणि ग्रामस्वराज्याच्या त्यांच्या कल्पनांमध्ये काही बदल करून पण आज त्याच कशा महत्वाच्या आहेत, हे कळायला या पुस्तकामुळे मदत होते. जागतिकीकरणाच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात या कल्पना प्रत्यक्षात किती उतरतील, हे प्रश्नचिन्ह या दशकातही कायम राहील, मात्र हे बदलले पाहिजे, असे मानणारे धुरीण सत्तेवर आल्यावर त्यांना याच कल्पनांचा विस्तार करावा लागणार आहे, हे निश्चित.

‘गाव झिजत आहे’ या पुस्तकातील काही कल्पना अशा आहेतः सरकारी कर्मचारी गावातच राहण्यासाठी त्यांना गावात स्वस्त घरे देण्याची व्यवस्था करावी. महिलांच्या बचत गटाचा विस्तार होउन त्यातून त्यांच्याच पतसंस्थांची निर्मिती झाली पाहिजे. शेती हा व्यवसाय किंवा उद्योग आहे, हे लक्षात घेवून त्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा आधिकार असला पाहिजे. जल, जंगल आणि जमीन यावर समस्त गावक-यांची मालकी असली पाहिजे. गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे, यासाठी गावातले व्यवहार वाढले पाहिजेत. याचा अर्थ ग्रामीण जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज डॉ. लोहिया व्यक्त करत आहेत.

पुस्तकात २१ प्रकरणे आहेत. त्यांची नावे जरी पाहिली तरी आपल्याला त्या विषयांच्या महत्वाची कल्पना येते. उदा. गावातला नोकर गावात, गुळाचे गु-हाळ तसे साखरेचे साखराळ, एक कुटुंब- एक उत्पन्नाचे साधन, बोअरचे पाणी पिण्यासाठी- पावसाचे पाणी शेतीसाठी, तर आत्महत्या थांबतील, यंत्रे आली- जनावरे कमी झाली,गावचा धर्म –शेजार धर्म , नारी के सहयोग बिना हर गाव सुना है.. ,गावकुसातील संसाधनांची चोरी, महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ.

गाव का झिजत आहेत, याचे खूप चांगले विश्लेषण या पुस्तकात आले आहे. त्यातल्या काही नव्या गोष्टी अशाः ‘महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ’ या प्रकरणात नोकरदाराची पगारवाढ आणि शेतीमालाची थेट तुलना करून ही तफावत लक्षात आणून दिली आहे. यात एका ठिकाणी म्हटले आहे, ‘ कच्चा माल तयार करणारा आणि पक्का माल तयार करणारा यांच्या उत्पन्नातील तफावत मला दिसते आहे. ही तफावतदेखील शेतक-याच्या आत्महत्यांना कारणीभूत होते आहे.म्हणून शेतक-यांच्या उन्नतीसाठी आणि समृध्दीसाठी महागाईचा निर्देशांक काढण्याची पध्दत बदलावी लागेल.’ दुसरी एक गोष्ट अशी आहेः ‘ साखर विक्रीची पध्दत बदलली पाहिजे. ती पध्दत पिठाच्या गिरणीसारखी असावी.पिठाच्या गिरणीत ग्राहक ज्वारी किंवा गहू घेवून जातो.गिरणीमालक त्याचे दळण दळून पीठ तयार करून देतो. त्याला दळणाचे पैसे दिले जातात. साखरेचा कारखाना ही पिठाची गिरणी समजावी. साखरेच्या उता-याप्रमाणे त्याने घातलेल्या उसाच्या मोबदल्यात त्याला साखर मिळावी.’

डॉ. लोहिया जे म्हणतात ते लगेच पटते आणि मग आपण विचार करतो खरोखरच असे बदल आता आपल्या देशात होतील? जागतिकीकरणाने ‘अपमार्केट’कडे जाणारी मानसिकता घडवली आहे. ती मानसिकता सांगते, शहरात चला. ती सांगते आता ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, हेच तत्व बरोबर आहे. मुलांचे चांगले शिक्षण शहरांतच होते, शेजारधर्माने नव्हे तर स्पर्धेने प्रश्न सुटतात. हाताने होणा-या कामांपेक्षा यंत्रांनी होणारी कामे चांगली होतात. गावातल्या प्रश्नांपेक्षा महानगरांतले प्रश्न महत्वाचे आहेत कारण ते सोडविल्यामुळे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होतात. सरकारीपेक्षा खासगीकरण चांगले. सगळ्यांचे लक्ष असे ‘अपमार्केट’ कडे आहे. ‘अपमार्केट’ कडे पाठ फिरवून हे परिवर्तन घडविण्याची इच्छाशक्ती आपल्या समाजात दिसते आहे काय?

मग लक्षात येते की आजच्या मानसिकतेत या कल्पनांचा विचार करायला तयार होईल अशी परिस्थिती आज दिसत नाही. जागतिकीकरणाने गतिमान अस्थैर्याचा जो शाप आम्हाला दिला आहे, त्यामुळे आमचे विचारच गोठून गेले आहेत. आता आम्ही एकतर्फीच विचार करू शकतो. सर्वसमावेशक विचारांची शक्तीच आम्ही गमावली आहे. आम्ही आमच्या ‘अजेंड्या’वर इतकं प्रेम करायला लागलो आहोत की त्यामुळे दुस-यांचे गळे कापताना आमचे हात अडखळत नाहीत. उलट त्या गळेकापू स्पर्धेचे आम्ही समर्थन करतो. या परिस्थितीत डॉ. लोहिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे पाहिले तर मनात निराशा दाटून येते.पण त्या प्रश्नांकडे पाठ फिरवूनही आम्ही आनंदाने जगू शकत नाही. त्यामुळेच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. ती परिस्थिती समोर आणण्याचे काम डॉ. लोहिया यांनी चोख बजावले आहे. आता ‘भारता’सहच ‘इंडिया’ला पुढे जायचे आहे, असे ज्यांना ज्यांना वाटते , त्यांनी ही विसंगती दूर करण्यासाठी झटायचे आहे.

Thursday, March 25, 2010

शुध्द मराठी दाखवा , बक्षीस मिळवा !

एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की ‘ ........... दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची पध्दत आहे. प्रस्थापित नियमांनुसार मराठी भाषा पाहावयाची असेल किंवा वाचावयाची असेल तर सध्या तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगल्यावरील नाव पाहा, दुकानावरील फलक पाहा, मराठीप्रेमासाठी काम करणा-या संस्था संघटनांचे फलक किंवा मुखपत्र पाहा, शाळा - महाविद्यालयांतील सूचनाफलक, वर्तमानपत्र, पुस्तके , सरकारचे निवेदन पाहा.... कुठलाही मराठी मजकूर पाहा, वाचा आणि प्रस्थापित नियमांनुसार तो शुध्द आहे का, हे तपासा. शंभर टक्के शुध्द मजकूर तुम्हाला सापडला तर सांगा.. . तो सापडण्याची शक्यता नाही. त्याचे पहिले कारण आमच्या भाषेला व्यवहारात तेवढे महत्व राहिलेले नाही. त्यामुळे ती भाषा अशुध्द लिहीली तरी फार फरक पडत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे काय शुध्द आणि काय अशुध्द याचा इतका गोंधळ आम्ही घातला आहे की एखाद्याने ठरवले तरी तो शंभर टक्के शुध्द लिहूच शकत नाही.

एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की, ते ओळखण्याची आणखी एक खूण आहे. ती म्हणजे त्याची भरपूर चर्चा करायला लोक सुरूवात करतात. त्यासंदर्भाने काही कृती करावयाची सोडून बाकी सर्व करावयाचे. मराठी संदर्भात सध्या तेच चित्र दिसते आहे. मराठीच्या नावाने एकाएवजी १०-१२ संमेलने घेतली जात आहेत. अधिवेशने होत आहेत राजकारण केले जाते आहे. राजकीय घोषणा केल्या जात आहेत . मात्र ज्या भाषेविषयी हे सर्व चालले आहे, ती भाषा त्यामुळे तसूभरही पुढे सरकत नाही, त्याचे काय करायचे ? जगातल्या आठ हजार भाषांमध्ये पंधराव्या आणि आपल्या देशातल्या चौथ्या क्रमांकाच्या मराठी भाषेविषयी प्रेम आहे, असे अनेक जण म्हणतात, मात्र तिच्यासाठी ठोस काही करण्याची वेळ आली की पुढे काही घडत नाही.

हे आज सर्व आठवण्याचे कारण उद्यापासून पुण्यात सुरू होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साहित्य संमेलन उत्सवी असावे, याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यात भाषाविकासाविषयी काहीच होउ नये, हे पटण्यासारखे नाही. नाही म्हणायला काही संमेलनांमध्ये भाषाविकासावर चर्चा झाली आहे, मात्र ती वर्तमानपत्रांच्या पानांच्या पुढे गेली नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. बरे, वर्षभर त्यासंबंधीचे काही प्रयत्न साहित्य संस्थांनी केले असते, तर तेही समजून घेता आले असते. तसे जे काही प्रयत्न झाले, ते इतके तोकडे होते की मराठी भाषेचा विकास तर दूरच, पण मराठी भाषा व्यवहारातून कमी कमी होत गेली आहे.

आजची मराठी भाषा कोठे आहे याचा विचार केल्यावर पुढील गोष्टी लक्षात येतात. मराठीचा सरकारी कामकाजात आणि व्यवहारातील वापर कमी कमी होत चालला आहे. संगणकामध्ये मराठी भाषा वापरावीच लागणार आहे, मात्र त्यासाठी योग्य फॉण्ट आणि अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘मराठी भाषा’ हा विषय मराठी आणि इंग्रजी शाळांमधील एक अवघड विषय ठरतो आहे. एवढेच नव्हे तर तो विषयच नको, अशी भूमिका काही शाळा घेउ लागल्या आहेत. मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे हे मराठी समाजातही कमीपणाचे मानले जाउ लागले आहे. मराठी शुध्दलेखन नियमांच्या दहशतीमुळे मराठी आनंदाने लिहिणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

मराठीवर ही वेळ का येते आहे, याची कारणे शोधताना असे लक्षात येते की मायबोलीसाठी सातत्याने काही करण्याची गरज होती, ते केले गेलेले नाही. काळानुसारचे बदल स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळे काळाशी ती सुसंगत राहिली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे देवनागरी स्वीकारताना मराठी भाषेतील जेवढा भाग संस्कृतसारखा वावरू शकतो, त्या भागाला (तत्सम) संस्कृतचे नियम लावले गेले आणि उरलेला भाग ‘देशी’मराठी म्हणून (तत्भव) जाहीर केला गेला. त्यामुळे मराठीची मराठीतच फाळणी झाली. याचा परिणाम आसा झाला की मराठी व्याकरण आणि शुध्दलेखन मराठी समाजावर लादण्यात आले. मराठीची उपजत आणि मूलभूत प्रवृत्ती लक्षात न घेता हे केले गेले. मराठी सर्वसामान्य समाजामध्ये शुध्दलेखनाची दहशत निर्माण करण्याचे काम नियमांनी केले.
मायबोली असणा-या माणसाला आपलीच भाषा अवघड का वाटावी ? मात्र दीर्घकाळ हा अन्याय सर्वसामान्य मराठी माणूस सहन करतो आहे.

या सर्व परिस्थितीचा परिणाम असा झाला की नियमानुसार शुध्द लिहिता येत नाही आणि अशुध्द लिहून मानहानी सहन होत नाही, म्हणून मराठी लिहिणेच अनेकांनी सोडून दिले. आमच्याच बोली भाषा अशुध्द ठरल्या. एकप्रकारे मराठी समाजाचे विघटन सुरू झाले. इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आक्रमण हे नंतरचे विषय आहेत, आधी आमची भाषा आम्ही देवनागरी स्वीकारताना अवघड का केली, काळानुसार का बदलली नाही, आणि संगणकाचा वापर इतका वाढला असताना एकच फॉण्ट वापरण्याचा संकल्प का केला गेला नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

या संदर्भात मराठीवर प्रेम करणा-या संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वांना एकत्र बांधून संगणकाचा वापर वाढल्याच्या कारणाने क्रांतिकारक बदलांची तयारी ठेवावी लागणार आहे. ‘शोध मराठीचा’ या संस्थेने यासंदर्भात मांडलेला ‘नवा प्रस्ताव’ निश्चित विचार करण्यासारखा आहे. या प्रस्तावाचे एक कलम असे आहेः मोडी लिपीसारखाच देवनागरीत मराठीने ‘एक वेलांटी- एक उकार’( दीर्घ वेलांटी आणि –हस्व उकार ) या सहजसुलभ तत्वाचा स्वीकार गद्द लेखनात करावा आणि शुध्द-अशुध्दतेच्या पेचातून मराठी समाजाची सुटका करावी. अशा ज्या ज्या कल्पना मांडल्या जात आहेत, त्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे. परंपरा कुरवाळणा-यांना हा प्रस्ताव आततायीपणाचा वाटतो. खरे सांगायचे तर मराठी इतकी मागे पडते आहे की, तशाच बदलांशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. असे अनेक प्रस्ताव आहेत आणि त्त्यातील काहींच्या स्वीकारतूनच सर्वसामान्य मराठी माणसाचा मनसोक्त मराठी वापरण्याचा मार्ग खुला होणार आहे.

जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वतःहून आणि अनेकदा रेट्यापोटी आम्ही अनेक बदल स्वीकारले आहेत. ते का स्वीकारले, याचे आम्ही समर्थनही करतो आहोत. तसाच विचार भाषेसंदर्भातल्या बदलांचाही करावाच लागणार आहे. तो आपण वेळीच केला नाहीतर जगातील एक श्रेष्ठ भाषा मारून टाकल्याचे पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही.


यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Saturday, March 20, 2010

Maharashtra Times

जागतिक मराठी दिनी 'मराठी एडिटर' हा नवा फॉण्ट आला आहे. आता मराठी भाषेतून कोणताही संगणकीय व्यवहार सहज करता येईल, असे तो शोधणा-या शुभानन गांगल यांना वाटते. या नव्या प्रयोगाच्या निमित्ताने... - यमाजी मालकर

....

मराठी तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।। या समर्थ रामदासांच्या प्रेरणेमुळे मराठी समाजाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले स्वराज्य उभारले. 'समान भाषा-समान संस्कृती' हा विचार पुढे बनारस काँग्रेसनेही (१९०६) उचलून धरला. एकप्रकारे एकभाषी राज्याची ती पूर्वसूत्रीच ठरली. भाषा हे जनतेला संघटित करण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे ओळखून लॉर्ड कर्झनने एकभाषा राज्याची कल्पना धुडकावली होती. भाषेचे दुबळेपण समाजाचे कसे विघटन करू शकते. याचा अनुभव आपण आज घेत आहोत. भाषेचे राजकारण केले जाते आहे. तिच्या नावाने उत्सव साजरे केले जाताहेत. मात्र, जगाच्या आठ हजार भाषांमध्ये १५ वी आणि भारतात पाचव्या क्रमांकावर असलेल्या मराठीच्या भवितव्याची चिंता करण्याची वेळ आपल्यावर आली नाही, असा एक दिवस जात नाही. तिचा व्यवहारातील वापर कमीकमी होत चालला आहे. या पेचप्रसंगावर मात करण्याचा काही मार्ग आहे काय?

मराठी भाषेचा गेली २५ वषेर् सखोल अभ्यास करणारे मुंबईचे शुभानन गांगल गेली काही वषेर् मराठी ही जगातील सर्वश्ाेष्ठ भाषा आहे, हे शास्त्रीय पद्धतीने सांगत आहेत. नव्या काळानुसार शास्त्रीय निकषांवर मराठी भाषेच्या स्वरूपात काही बदल करण्यासाठी 'शोध मराठीचा' या संस्थेमार्फत ते प्रयत्नशील आहेत. या संशोधनाचा व्यवहारात उपयोग व्हावा आणि मराठीचे हे श्ाेष्ठत्व जागतिक मराठी समुदाय आणि सर्वसामान्य मराठी माणसांपर्यंत पोहचावे. या दृष्टीने एक मोठी घटना गेल्या जागतिक मराठी दिनी (२७ फेब्रुवारी) घडली. गांगल आणि मी-असे एकत्र येऊन आम्ही मराठी जगताचा पहिला 'मराठी एडिटर' त्या दिवशी वेबवर प्रसारित केला. आज तेरा हजारांहून अधिक जण त्याचा वापर करत आहेत. हा मिळालेला प्रतिसाद त्याच्या उपयोगितेची साक्ष देतो आहे.

श्ााव्य, मौखिक, लिखित आणि संगणकीय या चारी पद्धतीतून ज्या भाषेला व्यवस्थित वावरता येईल, तीच भाषा आधुनिक युगात टिकणार आहे. हे सर्व 'मराटॅ एडिटर' साध्य करणार आहे, असे म्हटल्यावर अनेकांचा लगेच विश्वास बसणार नाही. मात्र, हे तंत्र समजून घेतल्यावर आपल्या भाषाविकासाचे सूत्र सापडल्याचा आनंद सर्वांना होईल. अशी आम्हाला खात्री वाटते.

सर्वप्रथम 'मराठी एडिटर' म्हणजे काय, हे समजून घेऊ. वेबजगतातील संवादात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला 'ऑनलाईन एडिटर' मुळे फॉण्ट उपलब्ध होतो आणि त्याद्वारे जोडलेल्या सर्वांना त्याच समान फॉण्टमधून टाईप करता येते. एरवी मराठीत टाईप करण्यासाठी फॉण्ट विकत घ्यावा लागतो. 'मराठी एडिटर'वर तो मोफत मिळतो. पण त्यावरून आपण ज्यांना ज्यांना मेल करतो. त्या सर्वांना हा फॉण्ट लगेच मोफत उपलब्ध होतो. एवढेच नव्हे तर त्यांचा संगणकही मराठीत कामे करण्यासाठी सज्ज होतो. ही या 'मराठी एडिटर'ची खरी किमया आहे. दुसऱ्याकडे हा फॉण्ट नसेल म्हणून मजकुराचे चित्र करून (पीडीएफ) पाठविण्याची गरजच राहत नाही. म्हणजे मेलसोबतच तो त्याला मिळतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर इंग्रजी फॉण्टसारखाच संगणकातून वावरणारा मराठी फॉण्ट 'शोध मराठीचा' संशोधनाने आणला आहे. एका पणतीने दुसरी, दुसरीने तिसरी आणि ऑनलाईन लाखो पणत्या पेटवून मनसोक्त मराठीचा वापर करा, असे आम्ही त्याला म्हणतो. मराठीचा मनसोक्त आणि १०० टक्के शुद्ध वापर या 'एडिटरवर' आपण करू शकतो. त्यामुळे हा मराठी जगतासाठीचा पहिला 'मराठी एडिटर' ठरतो.

'मराठी एडिटर'चे आणखी वेगळेपण असे की, संगणकाचा कसाही आणि कितीही विकास झाला तरी त्यात वापरला जाणारा फॉण्ट कधीही कालबाह्य ठरणार नाही. दुसरे म्हणजे, सध्या 'नाव आणि ईमेल' या गोष्टींतून ओळख आता तयार होते आहे. या एडिटरवर त्याच ईमेलमधून मराठी वापरता येते आहे. तिसरे म्हणजे, इंग्रजी आणि मराठी की बोर्ड यात फोनेटिक सार्धम्य ठेवल्याने भाषांच्या जागतिकरणात मराठीचा प्रसार आणि विकास जोमाने होणार आहे. इंग्रजी वापराची अपरिहार्यता लक्षात घेता एक कळ दाबली की या एडिटरवर टाईप करता येते. शिवाय तेथेच की-बोर्ड लगेच पाहता येतो. थोडक्यात मराठी समाजाच्या सर्व मूलभूत संगणकीय गरजा 'मराठी एडिटर' द्वारे भागविण्यात येत आहेत.

संगणकाची आज्ञावली आणि रचना इंग्रजीत असल्याने इतर भाषांच्या वापरावर आपोआपच मर्यादा आल्या आहेत. मराठीत तर शेकडो फॉण्टमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मराठीच्या मनसोक्त वापरावर मर्यादा आल्या. त्यामुळेच समाजाच्या आथिर्क, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी इंग्रजीचा आधार घेणे कमप्राप्त ठरले. जगातील पंधराव्या क्रमांकाच्या भाषेवर ही वेळ आली, ही काही भूषणावह गोष्ट नव्हे. 'मराठी एडिटर' ने हे व्यवहार मराठीतून करण्याची सोय उपलब्ध केली आहे.

याचा अर्थ संगणकात मराठीचा वापर सुलभ नाही. म्हणून मराठी मागे पडते. हे म्हणण्याची नामुष्की आता आमच्यावर येणार नाही.

मराठी माणसांनी तो का वापरावा? केवळ मराठी भाषेच्या प्रेमापोटी वापरण्याऐवजी तो कुटुंबाच्या संवादाच्या गरजा भागविण्यासाठी वापरला पाहिजे. त्यातून आपल्याला आणि मराठी भाषेलाही प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. मराठी भाषा इंग्रजीपेक्षा बऱ्याच बाबतीत सरस आहे. हे 'शोध मराठीचा' संशोधन का म्हणते, हे 'मराठी एडिटर' वर दिलेल्या 'शोध मराठीचा' संशोधन या मजकुरात आपल्याला मिळेलच. संगणकीय विकासात इंग्रजीच्या मर्यादा लक्षात येवू लागतील, तेव्हा मराठीला पर्याय उरलेला नसेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

मराठीला आपल्या मूळ सार्मथ्यावर उभे करायचे असेल तर इतर भाषांच्या आधाराने मराठी लिहिण्याऐवजी शंभर टक्के मराठीत लिहिण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. ते 'मराठी एडिटर'ने साध्य केले आहे. मराठी समाजाला सर्वत्र चालणाऱ्या फॉण्टची गरज आहे. ती गरजही 'मराठी एडिटर'ने पूर्ण केली आहे.

फॉण्टची वैशिष्ट्ये

* तो कधीही कालबाह्य ठरणार नाही.

* मायक्रोसॉफ्टच्या Words, excel वगैरे तसेच page maker, photoshope या अॅप्लीकेशनमधून विरूप (distorted) होत नाही.

* गुगल, याहू हॉटमेलच्या पहिल्या पानावर चालतो.

तो इंटरनेटवरून डाऊनलोड करता येतो.

* तो कमीतकमी जगा व्यापतो. त्यामुळे तो सहज जातो आणि 'व्हायरस'च्या नावाखाली रिजेक्ट होत नाही.

* फोनॅटिक की बोर्डमुळे वापरणे सोपे. ९४ चाव्यांमुळे वेगात टाईप करता येते.

* प्रिंटरच्या सर्व अॅप्लिकेशनमध्ये तो व्यवस्थित चालतो.